Friday, September 17, 2010

मुलायम आवाजाचा भीमसेन

पु. ल. देशपांडे यांनी पंडित भीमसेन जोशी यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा हा संपादित भाग...

 
पु.ल. : आतापर्यंत अनेक वेळा भेटलो आहोत आपण, परंतु तुम्हाला भेटल्यावर मला न चुकता कसली आठवण होत असेल, तर पहिल्यांदा तुमची माझी भेट झाली त्या क्षणाची; आणि प्रत्यक्ष झाली नाही, तर ती तुमच्या सुरांतून झाली. आणि मग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो. पस्तीस-छत्तीस वर्षं झाली असतील. एचएमव्ही स्टुडिओमध्ये मी गेलो होतो. तिथं तुमचं त्या वेळेला एक रेकॉडिर्ंग चाललेलं होतं. मला आठवतं की, ते कानडी गाणं होतं.

ते ऐकल्याबरोबर मी त्या रेकॉडिर्ंग बूथमध्ये उभा राहिलो. तिथे जी. एन. जोशी होते. त्यांना म्हटलं, ''कोण आहे हा?'' ते म्हणाले, ''धारवाड, गदग वगैरे भागातून तरुण मुलगा आलेला आहे, आणि त्याचं नाव भीमसेन जोशी आहे.'' त्या वेळी तुमच्या आवाजातील मुलायमपणा आणि तुमचं भीमसेन हे नाव या दोन्ही गोष्टी मला विसंगत वाटल्या. तुम्ही हे गाणं अतिशय सुंदर गायलं होतं. तर त्या गाण्यानं आपल्या गप्पागोष्टींची सुरुवात करू या.  


भीमसेन : (गातात)

पु.ल. : वा, वा, वा.... पस्तीस वर्षं झाली. तुम्हीही साठी ओलांडली आहे. मी तर केव्हाच ओलांडलेली आहे, पण तुम्ही साठी ओलांडूनसुद्धा पस्तीस वर्षांपूवीर्चं तुमच्या गळ्याचं तारुण्य तसंच आहे, आणि त्यामधली जी कोवळीक आहे ती या क्षणालासुद्धा तशीच राहिली आहे. ही काय जादू आहे मला कळत नाही. तुम्हाला गाण्याचा हा ध्यास खूप लहानपणी लागला, नाही का?

भीमसेन : हो. म्हणजे तसं आपल्याला माहीतच आहे, की आमच्याकडं जुन्या काळातील माणसं होती. घरात संध्याकाळी दिवे लागले की माझी आई गायची. देवदासाचं भजन वगैरे म्हणायची. ती इतकी गोड गायची की, त्यामुळेच सुरुवातीला मला गाण्याचा नाद लागला.

पु.ल. : बहुतेक गवयांची हीच कथा आहे. त्यांच्यावर गाण्याचे पहिले संस्कार झाले, ते त्यांच्या आईच्या गाण्याचे झाले. आणि ते जे संस्कार झाले त्याच्यामागे एक जिव्हाळासुद्धा होता. या दोन्हींमुळे ते गाणं अतिशय गोड वाटत होतं. अशा प्रकारचं गाणं ऐकत-ऐकत तुम्ही मोठे झालात...

पण मला सांगा, की आपल्याला आता गाण्याचा ध्यास घ्यायलाच पाहिजे किंवा गाणं शिकलंच पाहिजे. किंवा गवई व्हायलाच पाहिजे, असं तुम्हाला वाटावं अशी एखादी घटना घडली की आणखी काही झालं?

भीमसेन : घटना म्हणजे, तुम्हाला माहीत आहे की, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन...' आमच्याकडं एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखं पेपरमध्ये वगैरे येत नव्हतं. शाळा सोडून मी तिथं जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकलं की, असं वाटायचं, अशा प्रकारचं गाणं मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला.

आमच्या वडिलांची एवढीच इच्छा होती, की आधी थोडं तरी शिक्षण घ्यावं, निदान ग्रॅज्युएट तरी व्हावं. पण मला काही धीर नव्हता. मी म्हटलं, हे काही जमत नाही. मी पळून गेलो.

पु.ल. : तुम्ही लहान होतात. काय वय होत तेव्हा?

भीमसेन : बारा-तेरा वर्षांचं.

पु.ल. : बारा-तेरा वर्षांचं? तुम्ही गेलात ते गदगहून निघालात आणि धारवाडला आलात?

भीमसेन : हो. धारवाडहून पुण्याला आलो. पुण्याहून मंुबईला गेलो.

पु.ल. : म्हणजे कुठं जायचं. ते माहीत नव्हतं.

भीमसेन : माहीत नव्हतं, पण ग्वाल्हेर वगैरे असं मनात होतं. तिथपर्यंत पोहोचलो.

पु.ल. : तुम्ही हाल काढत ग्वाल्हेरपर्यंत गेलात, ते मला माहीत आहे. गाडीचा प्रवास करत करत खिशातील पैसे संपले की गाडीत गाणं म्हणायचं. लोकांना वाटायचं, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असूनसुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे. आणि त्या काळी तुम्ही चतुराईनं रेल्वेला बरंचसं फसवून विदाऊट तिकीट ग्वाल्हेरपर्यंतचा प्रवास केलेला आहे.

भीमसेन : हो. दोन-तीनदा जेलमध्येसुद्धा जाऊन आलोय.

पु.ल. : तिथंसुद्धा तुम्ही, मला वाटतं, तो जो शिपाई होता, त्याला गाणं ऐकवल्यावर त्यानं तुम्हाला सोडलं.

भीमसेन : काय आहे, गाण्याचे शौकीन भेटले की, आपला पुढचा प्रवास सुखकर व्हायचा.

पु.ल. : तुम्हाला गुरू कुठं भेटले?

भीमसेन : तिथं मी असा हिंडत-हिंडत गेलो. मी पंजाबमध्ये जालंदरला पोहोचलो. तिथं 'आर्य संगीत विद्यालय' आहे. तिथे त्या काळातील भक्त मल्होत्रा नावाचे ध्रुपद गायक होते. ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडं मला एका मिल ओनरनं ठेवलं. म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हतं. ते म्हणाले, ''काही हरकत नाही. तू गाणं शिकत जा.'' आणि मी तिथं शिकायला सुरुवात केली. शे-दीडशे ध्रुपदं शिकलो त्या वेळेला. तिथं 'हरी वल्लभका मेला' भरायचा. तिथं आपल्याकडचे सगळे गायक यायचे. वामनराव, नारायणराव व्यास, विनायकबुवा. कोणी आलं की मी आपला तंबोरा घेऊन आहेच मागं उमेदवारीला. विनायकबुवांनी तिथं विचारलं, ''इथं काय करतोयस तू?'' मी म्हटलं, ''गाणं शिकायला आलोय.'' ''वेड्या, तुला माहीत नाही? तुझ्या गावाजवळच एवढी मोठी व्यक्ती आहे, सवाईगंधर्व. त्यांच्याकडं जा तू.'' मग तिथून गाडी परत फिरली.

पु.ल. : म्हणजे 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' म्हणतात तसं. मग रामभाऊंनी सुरुवात कशी केली?

भीमसेन : ते परीक्षा बघत होते. कारण माझ्यासमोरच दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथं पाण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणं वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचं. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो. कारण पंजाबमध्ये ते सगळं होतं ना.

मी पहाटे चारला उठत होतो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचं. पन्नास-साठ घागरी पाणी आणायचं. मग तंबोरा घ्यायचा. मग त्यानं सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरीसुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंदामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.

पु.ल. : तुमच्या गाण्यामधलं जे वैशिष्ट्य मला जाणवतं ते असं की, तुमचा स्वर जो आहे ते आ-काराचं गाणं आहे. हा आ-कार तेजस्वी लावला पाहिजे हे तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की...

भीमसेन : नाही. ते तो तसा लावत नव्हते. ते सांगायचे. माझ्यावरती जे गायक आहेत, त्यांचे हे परिणाम आहेत. हा स्पेशल म्हणजे माझ्यावर केशरबाईंचा प्रभाव आहे. आमच्या वेळेला माईक वगैरे काही नव्हतं. आमचे गुरू थिएटरमध्ये विदाऊट माइक ऐकलेले आहेत मी.

पु.ल. : मी रस्त्यावरूनसुद्धा ऐकलेले आहेत. हजार लोकं पुढं बसलेले आणि गुरुजी गाताहेत. तर हे जे सगळं तुम्ही रियाज करत करत केलंत, हे किती वर्षं चाललेलं होतं?

भीमसेन : जवळजवळ पाच-सात वर्षं मी रियाज केला. थोडंसं यायला लागल्यानंतर मी अठरा-अठरा तास रियाज करत होतो.

पु.ल. : रियाज करताना रागांचा रियाज कसा करायचात?

भीमसेन : एक राग घेऊन, त्यातलं जे आपल्याला येत नाही ते गायचं.

पु.ल. : मला तुम्ही सांगा की, तान वगैरे घेताना तुम्ही हे लिहून करता की नोटेशन घेऊन त्या नोटेशनच्या अंदाजानं तान घेता?

भीमसेन : नोटेशन्स असतात, पण ती मनात.

पु.ल. : ते मनातलं नोटेशन वेगळं.

भीमसेन : एक राग घेऊन, त्याची प्रॅक्टिस करायची. काही कलावंतांचा रियाज म्हणजे हाच असतो. हल्ली रियाज आणि बैठकीचं गाणं एकच झालंय.

पु.ल. : 'घराणं' या विषयावर तुमचं काय मत आहे?

भीमसेन : माझं स्वत:चं काय आहे की, मी डेमॉक्रॅटिक आहे. म्हणजे मी कुठल्याही घराण्याचा हट्ट धरत नाही. आपली तयारी पाहिजेच. स्वतंत्र घराणं पाहिजेच. कारण आई-वडिलांशिवाय मुलगा होत नाही. आताची गोष्ट सोडून द्या. गुरूंनी जेवढं शिकवलंय तेवढं जर लोकांपुढे ठेवलं, तर ती पोपटपंची होते. मग आपलं काहीतरी वैशिष्ट्य पाहिजे. मी तर सगळ्या घराण्यांची भट्टी करून आपल्यात मिसळून घेतली आहे.

पु.ल. : तुमच्या गाण्याचं वैशिष्ट्य असं वाटतं, की तुमचा जो मूळ पाया आहे, त्या पायाला कुठंही धक्का न लावता तेव्हाच्याच इमारतीत जी रचना तुम्ही केलीत, त्याच्यामध्ये नावीन्य आहे. जुन्या घोड्याला शिंगं काढून म्हणायचं, की मी नवा घोडा काढला, असं ते नावीन्य नाही.

भीमसेन : त्याचं घोडेपण टिकवून, म्हणजे किराण्याला जे अभिप्रेत आहे, की स्वरांची आराधना करत करत जाणं, हे ठेवून मी त्याच्यावर पुष्कळ नवीन केलं. माझ्या भाषेत म्हणायचं तर प्रत्येक कलावंत हा चोर आहे. मोठा चोर आहे. त्याच्यात कोणी लहान असतो, कोणी मोठा असतो, पण असं केल्याशिवाय स्वतंत्र गायक होऊ शकत नाही.

पु.ल. : आता मला हे सांगा की, तुमची पहिली बैठक कुठं झाली?

भीमसेन : म्हणजे कर्नाटकात की पुण्याला?

पु.ल. : पुण्याला.

भीमसेन : अरे, तुमच्याच घरामध्ये गायला बसलो होतो. तुम्ही आणि ते गोडबोले होते.

पु.ल. : हो, आठवतंय मला. त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमधली बैठक सुरू केलीत, त्या वेळेला लोकांपुढे गाताना आपल्याला काय काय करायला पाहिजे, याचा विचार करून तुम्ही गाण्यामध्ये काही अदलबदल केलेत का?

भीमसेन : नाही. असं काही नाही. बदल वगैरे काही विशेष केलेले नाहीत मी. जे तेव्हा गात होतो, ते अजूनही गात आहे. मुख्य एवढंच की, त्याला वेळेचं बंधन वगैरे पाळतो. उगीच आपलं आपल्याला येतंय म्हणून तास-सव्वातास गायचं, ही फॅशनच होऊन गेलीय. लोक म्हणतात, अरे हा राग यांनी तासभर पिसला. आता ते पिसणं नकोच.

पु.ल. : तुमच्या असंख्य मैफली नाना तऱ्हेच्या श्रोत्यांसमोर झाल्या, पण भीमसेन, मला असं वाटत की, तुम्ही इकडले असे पहिले गवई होता की, ज्यांनी बंगालमध्ये श्रोता मिळवला.

भीमसेन : एकदम असं शास्त्र वगैरे त्यांना कळत नाही, पण ते जे कान आहेत, ते सुरेल गाणं ऐकणाऱ्यांचे आहेत, आणि कलावंताला ते देव मानतात.

पु.ल. : सुराला स्वभाव अथवा भावना नसतात. त्याला आर्तता असते. तुमच्या गाण्यात जी आर्तता आहे, ती जास्तीत जास्त प्रतीने तुमच्या गाण्यात आहे.

भीमसेन : आणि पहिल्यापासून माझा स्वभाव आहे, की मी कुठल्याही तऱ्हेचं गाणं कमी प्रतीचं मानत नाही. ठुमरी असो, गझल असो किंवा भजन असो, सूर पक्का पाहिजे.

( परचुरे प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या 'सुजनहो!' या पुस्तकातून साभार.)
 

Friday, August 6, 2010

आणि सरकारी पण हसले...

 

माझा किस्साही असाच...
कोथरुड प्रभाग क्षेत्रीय कार्यालय, स्वप्नशिल्प च्या शेजारी...
अस्मादिक गेले तिथे एका दुपारी...माझ्या मुलीचं जन्म नोंदणी पुस्तक आणायला. दुपारची वेळ जरा अंमळ कार्यालयात डोळ्यावर जास्त दिसत होती.
मी: (खिडकीपाशी) : जरा जन्म नोंदणी सर्टीफिकेट हवे आहे.
ती: (खिडकीपलीकडुन) : हा फॉर्म भरा..(मी तिथेच भरतो...एक्टाच होतो लाईनमधे चक्क..)
मी: घ्या..
ती: १० कॉप्या कशाला हव्यात?
मी: पैसे किती लागतील?
ती: १५ रुपये प्रती ..म्हणजे १५० रु. द्या..(मी पैसे देतो)..थोडं थांबावं लागेल..
मी: किती वेळ?
ती: ५-१० मिनटं...
आतापर्यंत लाईनमधे ८ एक मंडळी जमा झालेली..माझ्यामागे....सगळीच चुळबुळ करत होती...
अर्धा तास झाला तरी ही बया काय सर्टीफिकेट देईना...मग विचारलं तर म्हणाली प्रिंटर चालत नाहीये...थांबा..
त्यांचा साहेब येतो..ते सगळे उभे वगैरे राहतात..आम्ही मख्खासारखे (त्यांच्यासारखे) चेहेरे करुन त्यांच्याकडे पहातो.
साहेबः काय झालं? इतकी गर्दी का आहे?
ती: प्रिंटर चालत नाये?
साहेबः (आम्हाला) : थांबा ..सिश्टीमला प्रॉब्लेम आहे...
माझ्याबराच मागचा (आता लाईन जवळ जवळ ४० झालेली आहे) : काय झालय हो?
मी (जोरात बोंबलुन): काँप्युटर आणि प्रिंटर तापायला ठेवले आहेत. वाईच थांबा...क्षणभर शांतता आणि सायबासकट आख्खं सरकारी पण कधी नव्हे ते धो धो हसलं...
-वा
कोण म्हणतं सरकारी नाय हसणार?
मी पुरता बदला घेणार...
सरकारी हसणार निश्चीत...
इती वा वाक्यम...

Thursday, May 20, 2010

मैं तो फकिर कलंदर हूँ।


अभिजात संगीतकलेतील धृपद शैली आणि विशेषत: त्यातली आलापचारी हा आत्मविद्येचा आगळा आणि वेगळा लोभसवाणा आविष्कार आहे. लययोगाची ती एक हृदययंगम कला आहे. धृपद ही भारतीय संगीत परंपरेतील आद्य सुव्यवस्थित संगीतप्रणाली आहे. हिचा उगम छंद-प्रबंध गायकीपासून ते थेट सामवेदापर्यंत जाऊन पोचतो. आलापचारीमध्ये मुक्त गायन आणि बंदिशीमध्ये बंधनयुक्त गायन असा सर्वोत्तम समन्वय धृपद शैलीत साधला गेला आहे. देव-देवतांच्या स्तुतीच्या बंदिशी सुरुवातीला संस्कृत भाषेमध्येच असत. संगीत ही एक योगसाधना आहे, अध्यात्म साधना आहे, ईश्वरप्राप्तीचे माध्यम आहे अशी भारतीय संस्कृतीची संगीताकडे पाहण्याची दृष्टी होती. ध्रुव बाळाप्रमाणे अढळ श्रुतिंचा शोध, अढळ स्वरांचा शोध, अढळ अशा राग आणि आत्मभावाचा शोध घेण्यासाठी, संगीताची जी शैली निर्माण झाली, तिला म्हणूनच ध्रुवपद किंवा ध्रुपद असे नाव पडले.
या अभिजात ध्रुवपद संगीत परंपरेला, गेली ५०० वर्षे ज्यांनी जतन करून ठेवले त्या डागर घराण्यातील एकोणिसाव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजे उस्ताद सईदुद्दिन डागर. महान ध्रुपदिये अल्लाबंदेखाँसाहेबांचा नातू आणि उस्ताद हुसेनुद्दिनखाँ (बाकाजी) साहेबांचे सुपुत्र. डागर घराण्याचा ज्ञात मूळ पुरुष, बाब गोपाळदास हे हिंदू ब्राह्मण होते. त्यांची गुरुपरंपरा थेट स्वामी हरिदासजीपर्यंत पोचते.
हुसेनुद्दिनखाँसाहेब अलवारचे महाराज जयसिंग यांच्या दरबारी ‘गुणीजनखान्याचे प्रमुख’ या पदावर होते. सईदुद्दिनसाहेबांचा जन्म अलवारचा. चौथ्या वर्षी मातृवियोग. देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या हिंदु-मुस्लिम दंगलीनंतर वडिलांना अलवार सोडावे लागले. बाकाजी जयपूर, दिल्ली अशी मजल-दरमजल करीत शेवटी १९५० मध्ये कलकत्त्याला स्थिरावले.
छोटय़ा सईदची स्वर-साधना वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच सुरू झाली होती. सुरुवातीला एक-दोन तासांचा रियाझ आता आठ-दहा तासांपर्यंत चालू झाला होता. पहाटे  चारला बाकाजी सईदला शिकवायला सुरुवात करीत. षड्जसाधना, मंद्रसाधना, स्वर-स्थाने पक्की करणे, छोटे स्वरालंकार, श्रुतिज्ञान असे हळूहळू शिक्षण सुरू होते. एक पलटा पक्का करण्यासाठी सईदला ११०० मण्यांची माळ, ११ वेळा ओढावी लागत असे. माळा पूर्ण झाल्या नाहीत तर जेवण मिळत नसे.
मेरखंड पद्धतीच्या ५०४० तानांचा रियाझ हा जवळ जवळ सहा वर्षे चालला होता. त्याखेरीज ४० दिवसांचे एक रियाझ-सत्र (चिल्ला) असायचे. या ४० दिवसांत कुठेही बाहेर जायचे नाही. आजारी पडण्याचीही परवानगी नाही. यामध्ये एक-एक स्वराच्या ठेहरावाला पक्के केले जायचे, रोजचे १०-१२ तासांचे असे अनेक ‘चिल्ले’ सईदकडून बाकाजींनी करून घेतले.
संगीत-साधना चालू असतानाच सईदुद्दिन शाळा कॉलेजात क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकी या खेळातही प्राविण्य मिळवत होता. शाळेत असताना दत्तू फडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तो पंकज रॉय, विजय मांजरेकर अशा धुरंधरांच्या संघांविरुद्ध क्रिकेट खेळला आणि १९६३ मध्ये बंगाल राज्याच्या हॉकी संघातही त्याची निवड झाली. पण त्याच वर्षी बाकाजींचे निधन झाले. सईदचा खेळ संपला आणि गाणेही संपले.
सईदुद्दिन पोरका झाला. त्याचे वडील, आई, मित्र, सखा, शिक्षक आणि गुरुही असलेले बाकाजी त्याला सोडून गेले होते. उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न भेडसावत होता. रविंद्रभारतीने बाकाजींच्या जागी सईदुद्दिनला नोकरी देऊ केली. पण हा कलंदर पण प्रामाणिक माणूस स्वत:लाच म्हणाला की, ‘मी अजून गुरू बनण्याच्या योग्यतेचा नाही’ आणि त्याने ती नोकरी नाकारली. पोट भरण्यासाठी, ३५ रु. मासिक पगारावर एका कारखान्यात नोकरी स्वीकारली. लोखंडाच्या पट्टय़ांना ड्रिलिंग मशीनवर भोक पाडणे, हे दिवसभराचे काम. त्या एकाकी घरात सईद पहाटेचा रियाझ करायचा; पण त्यात प्राण नव्हता. तो जणू बाकाजींबरोबर उडून गेला होता. कारखान्यात ड्रिलिंगचे काम करता करता बाकाजींची आठवण यायची. आपल्या ‘एकाकीपणाचा ‘एहसास’ व्हायचा. संगीतातील प्रगत ज्ञान आता यापुढे कसे मिळणार या विचाराने जीव व्याकुळ व्हायचा. ड्रिलिंगच्या लयीत चौताल सुरू व्हायचा. रस्त्यावरील स्वस्तातले काही खाऊन, रात्री आढय़ाकडे पाहात आयुष्यातील पोकळीचा विचार करावा तर मालकंस आठवायचा. ‘पूजन चली महादेव, हंसगमनी पार्वती’ ही बंदिश गातांना मालकंसमधल्या मध्यमाच्या श्रुति अचूक लागल्या नाहीत म्हणून बाकाजींनी भर मैफिलीत मारलेली थप्पड आठवायची. ‘पुन्हा चुकलो तर थप्पड मारायला तरी बाकाजी तुम्ही हवे होतात’ असे म्हणत, हमसून हमसून रडत सईदुद्दिन झोपी जायचा.
दोन-तीन वर्षे अशीच निघून गेली. ३५ रुपये पगारात भागेना. पैसे न भरल्याने घरात पाणी यायचं बंद झाले. वीज कापली गेली. घर सोडण्याची वेळ आली.
एका संध्याकाळी, अशाच विमनस्क स्थितीत सईदुद्दिन गंगेच्या काठावर बसला होता. दिवस मावळत होता, रात्र उगवणार होती. प्रकाश आणि अंधार एकमेकांना ओलांडण्याची ती कातरवेळ. मनात जगण्याबद्दल आणि गाण्याबद्दलही संपूर्ण अंध:कार दाटून आलेला. पण गंगेपल्याड क्षितिजावर, आकाशात रंगपंचमीचा खेळ सुरू होता. आकाशात रंग फुलत होते आणि सईदुद्दिन गात होता.
छुटत पिचकारी चहूँ ओर,
होरी खेलत राधा-कृष्ण रंगमहलमें
श्रीच्या भावश्रुतियुक्त पंचमाला स्वरांचा मुलायम स्पर्श झाला आणि क्षितिजावर चंद्राचा उदय झाला. सईदुद्दिनने त्याच वेळी ठरवले की कलकत्ता सोडायचे आणि गाणेही सोडायचे.
दुसऱ्याच दिवशी सईदुद्दिन लाहोरला निघून गेला. तिथे तीन रुपये रोजावर, रेल्वे मेल सव्र्हिसेस (टपाल खाते) मध्ये नोकरी मिळाली. पहाटे तीन वाजता रेल्वेच्या यार्डात जायचे, आगगाडीच्या डब्यातील टपालाच्या पिशव्या उचलून हातगाडीवर लादायच्या आणि दोन कि.मी. लांब ती हातगाडी ढकलत ढकलत रेल्वेच्या ऑफिसमध्ये न्यायची. हे काम दिवसातून पाच-सहा फेऱ्या मारीत करायचे. ‘जे संगीत मला जगवू शकत नाही, ते काय कामाचे?’ असा अविचार सईदुद्दिनच्या मनात पिंगा घालत होता. पण तरीही, पहाटेपूर्वीच्या अंध:कारात, हातगाडी ढकलतांना बैरागी भैरवाचे सूर मनात नकळत घुमत राहायचे. मनातल्या घोर निराशेला, भीषण भविष्याला बैरागी भैरवाचा ऋषभ चालवत राहायचा आणि तरीही ‘पुन्हा तुला तुझी वाट सापडेल, दिशा गवसेल, प्रकाश दिसेल’ अशी अंधुक आशा आणि दिलासा तोच बैरागी भैरव देऊन जायचा..
आणि ती दिशा मिळाली. वर्षभरानंतर, काकांनी पद्मभूषण उस्ताद रहिमुद्दिनखाँनी सईदला लखनौला बोलावून घेतले. संगीत शिक्षण पुन्हा सुरू झाले. काकांनी निषादाचे प्रकार आणि उपज अंग प्रामुख्याने शिकवले. १९६८ मध्ये ज्युनियर डागर बंधू-उस्ताद झईदुद्दिन व फैयाजुद्दिन यांनी सईदला दिल्लीला आपल्या घरी नेले आणि जवळ जवळ तीन वर्षे पुढचे संगीत शिक्षण दिले.
१९७० ते १९८०, उस्ताद सईदुद्दिनजी जयपूरच्या राजस्थान कॉलेजात संगीताचे प्राध्यापक म्हणून शिकवत होते. १५० रुपये पगारावर सुरू झालेली ही नोकरी १९८० मध्ये ३०० रुपये मासिक पगारावर पोचली. एव्हाना उस्तादजींचे लग्न झाले होते, दोन मुलेही होती. दहा वर्षांनंतरही नोकरीत कायम करीत नसल्याने, उस्तादजींनी नोकरी सोडून दिली आणि १९८० ते ८५ या पाच वर्षांत, दिल्लीला ज्युनियर डागर्स या आपल्या चुलत भावांकडे राहून ते संगीत अध्ययन आणि अध्यापन करीत राहिले.
बाबासाहेब गाडगीळ फौंडेशनच्या निमंत्रणावरून उस्ताद सईदुद्दिनजींचे १९८४ साली पुण्यात आगमन झाले. सुरुवातीला महिनाभर कार्यशाळेत १५०-२०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पण धृपद शैलीपेक्षा, समाजावरील ख्याल गायकीचा प्रभाव आणि स्वरसाधनेसाठी लागणारी कठोर मेहनत व चिकाटी यांच्या अभावामुळे ही संख्या हळूहळू रोडावत गेली. सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत, शिष्यांसाठी डागर गुरुजींचा स्वरयज्ञ चालू असायचा.
पुढची अनेक वर्षे गुरुजी, धृपदाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत राहिले. सांगली, सातारा, कोल्हापूर, परळी-वैजनाथ, आंबेजोगाई, जामखेड, मिरज, देगलूर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, चाळीसगाव, नांदगाव, नांदेड, वासर या आणि अशा अनेक लहान लहान गावातून, गुरुजी धृपदाच्या मैफिली आणि कार्यशाळा करू लागले, तेसुद्धा स्वखर्चाने, एसटीच्या लाल बसमध्ये, तानपुरा मांडीवर घेऊन रात्रंदिवस प्रवास करीत.
एकीकडे आर्थिक उत्पन्न कमी असल्या कारणाने हा माणूस आपले घर गृहस्थाच्या मर्यादेत चालवीत होता आणि दुसरीकडे स्वत:च्याच खिशाला तोशिष लावून, धृपद-धमाराचा प्रचार करण्यासाठी अविश्रांत आणि बेहद परिश्रम करीत होता.
पुण्याच्या ‘गानवर्धन’च्या, अशाच एका गुरुजींच्या कार्यशाळेत गानसरस्वती श्रीमती किशोरीताई आमोणकर उपस्थित होत्या. गुरुजींच्या स्वरातील ‘भावा’ला त्यांनी मन:पूर्वक दाद दिली. १९९३ साली, मुंबईत गानतपस्विनी श्रीमती मोगूबाई कुर्डीकरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा या मोठय़ा मनाच्या गानसरस्वतीने, उस्ताद सईदुद्दिनजींचे गाणे त्या दिवशी आवर्जून ठेवले. समारंभप्रसंगी त्या म्हणाल्या, ‘शास्त्रीय संगीताला आज रुक्ष व वाळवंटी रुप आले आहे, त्यात भावाचा मागमूसही दिसत नाही. अशा काळात, उस्ताद सईदुद्दिनजींचे भावपूर्ण आणि रसपूर्ण स्वरोच्चारण, हे प्रगल्भ रसिकाला आनंद देणारे आहे.’
मला आठवते, उस्तादजींची पारनेरच्या उत्सवातील मैफिल. उत्तररात्र सरूनही सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. तीनही तानपुरे एकाच सुरात आणि एकाच लयीत झंकारत होते. रात्री अडीच वाजता डागरजींनी ‘जोगिया’ गायला सुरुवात केली.
पहिल्या काही स्वरांतच जोगियाचे अंधुक रुप दिसायला सुरुवात झाली. जोगियाच्या एका भावश्रुतिच्या बिंदूपर्यंतचा स्वरांचा प्रवास सुरू झाला. जणू बिंदूतून निघून अनंतात विलीन होणाऱ्या रेषांचे चित्र-नृत्य सुरू झाले. प्रत्येक स्वराकृतीतून, आणि आप्तयुक्त स्वरातून नव्हे तर अतिसूक्ष्म श्रुतिंमधूनही जोगियाचा करुण रस प्रवाहित होत होता. जणू स्वरांच्या फुलांचे अलंकार माळून, भक्तीची एकतारी वाजवीत, मीरा कृष्णाला भेटायला निघाली आहे.
ते, त, ता, ना, री, न अशा अर्थहीन अक्षरांचा आधार घेऊन फक्त तानपुऱ्यांच्या झंकाराच्या साथीने, उस्तादजी करुण रसाला आळवीत होते. शब्दभाषेचा आणि तालभाषेचा कुठलाच हस्तक्षेप आता स्वरभाषेत होत नव्हता आणि म्हणूनच साहित्य किंवा ताल यामुळे मनात उमटणाऱ्या प्रतिमा, प्रतीके, पूर्वग्रह, अलंकार, उत्प्रेक्षा आणि पूर्वसंस्कार यांचा कुठलाच व्यत्यय रसास्वादात येत नव्हता. शुद्ध स्वरभाषेतून जोगियाचा अमूर्त भाव, सभागृहात मूर्त रुप धारण करत होता.
गुरुजींची कार्यशाळा ही संगीत साधकासाठी एक अद्भुत पर्वणी असते. बावीस श्रुतिंचा ‘मालिक’ असलेला तानपुरा ऐकणे, लावणे, छेडणे आणि त्या तानपुऱ्या‘बरोबर’ गाणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष गुरुजींकडूनच शिकण्यासारखे आहे.
मुखभंग किंवा हमिंगचा रियाझ, मंद्रसाधना, स्वरस्थानांचा अचूकपणा, ठेहराव, पलाटे, अलंकार या गोष्टी तर ते शिकवतातच; पण त्याहूनही अधिक, नादाचा उच्चार हा नाभी, हृदय, कंठ आणि शीर्ष या शरीरातील चार प्रमुख केंद्रातून वेगवेगळा किंवा संयोगाने कसा करायचा असतो, याचे प्रात्यक्षिकही ते दाखवतात. स्वरश्रुतिंवरील अलौकिक प्रभुत्व हे गुरुजींच्या गायकीचे वैशिष्टय़ आहे. एकाच स्वराची तीव्रतर, तीव्रतम आणि कोमल, कोमलतर व कोमलतम (सकारी) अशी सात रुपेच नव्हे तर त्याच स्वराची अधोमुखी व उध्र्वमुखी रुपेही गुरुजी गाऊन दाखवतात. रागभावाच्या अंतरंगाचा वेध घेताना, एकाच कोमल रिषभाच्या श्री, भैरव, तोडी अशा रागांमधील अचूक श्रुतिस्थानांचे गुरुजी दर्शन देतात. मालकंसचा ‘मध्यम’, श्रीचा पंचम, हमीरचा धैवत, ललितचा धैवत, चाँदनी केदारचा निषाद, देस किंवा मल्हारमधला काकली (किंवा गोपुच्छ) निषाद यांची अचूक स्वरश्रुतिस्थाने आणि लगाव ऐकतांना श्रुति धन्य होतात. भरत मुनींच्या बावीस किंवा पाश्र्वदेवाच्या सहासष्ट श्रुतिंहूनही अधिक, अशा ‘श्रुतिंच्या अनंत संभावना’ या डागरवाणीत जाणवू लागतात.
गोव्याच्या कला अकादमीने पाच वर्षांपूर्वी गुरुजींची कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या शेवटी मी गुरुजींना गझल गायची विनंती केली. गुरुजींनी गायला सुरुवात केली.
इलाहे आँसूभरी जिंदगी किसी को न दे
खुशीके बाद गमे-जिंदगी किसी को न दे
त्या थोर कलाकाराच्या मनातले वादळ त्या गझलमधून व्यक्त होत होते. १९९८ पासून गेली १२ वर्षे, गुरुजी वर्षांतून दोनदा, तीन-तीन महिने परदेशात जातात. पॅरिस, बेल्जियम, हॉलंड, जर्मनी इथे सर्व मिळून, गुरुजींचे ७०-८० परदेशी शिष्य आहेत. परदेशात मैफिलीही झाल्या आहेत. परंतु गुरुजींच्या मनात येत होते की, परदेशात मला शिष्य मिळणे हे मी माझे भाग्य समजू की, संगीताची आद्य जननी असलेल्या या भारत देशात, रसिक महाराष्ट्रात, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, गेल्या २५ वर्षांत माझ्याकडे ध्रुपदासाठी एकही शिष्य येऊ नये हे मी माझे दुर्भाग्य समजू? सूरमणी, गुरुमहात्म्य, स्वरगायत्री, स्वर-साधना रत्न, नाद-निधी, जीवनगौरव, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक पुरस्कार असे खूप मानसन्मान आयुष्यात मिळाले हा माझ्या साधनेचा सन्मान समजू? की आर्थिक सुबत्ता सोडून द्या; पण निदान आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होईल. एवढी बिदागी देऊन ठरवलेल्या मैफिली या माझ्याच देशात मला मिळू नयेत, हा मी अपमान समजू? वडिलांना आणि चुलत बंधूंना दिलेल्या वचनाला जागून, माझे संपूर्ण जीवन मी धृपद-धमाराच्या प्रसारासाठी समर्पित केले आणि एवढेच नव्हे तर विसाव्या डागर पिढीतील माझ्या मुलांनाही डागरवाणीच्या धृपद परंपरेचे शिक्षण देऊन, भारतीय अभिजात संगीताचा वारसा जतन करण्यासाठी घडवले ही खुशीची बाब मानू? की म्हातारपणीही अनिकेत असलेल्या आणि स्वत:लाच पुरेशा मैफिली आणि शिष्य नसलेल्या, माझ्या मुलांच्या भवितव्याचे काय याचा ‘गम’ बाळगू? हे परमेश्वरा, आर्थिक दुरावस्था आणि आयुष्यभराची आर्थिक विवंचना हा तू कलावंताला दिलेला शाप मानू?की अशा दुरावस्थेतून होणाऱ्या आंतरिक तगमगीतून व वेदनांतून फुलणारी कला,हा तुझा वर म्हणून स्वीकारू? कलासाधना म्हणजे सौंदर्याच्या, नाविन्याच्या, सखोलतेच्या उत्तुंगतेच्या आणि चैतन्याच्या नवनवीन रुपांचा शोध घेत राहाणे. उस्ताद सईदुद्दिन डागर म्हणजे धृपदासाठी समर्पित झालेले व्रतस्थ जीवन तर आहेच. पण अजूनही, वयाच्या एकाहत्तराव्या वर्षीही ते एक आत्मशोधक कलासाधक आहेत.
उस्ताद सईदुद्दिन डागर यांना ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, त्यांच्या व्रतस्थ संगीत साधनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत, ‘स्वरमाऊली’, ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ (विलेपार्ले), राजहंस (गोरेगाव) आणि व्हिलेज म्युझिक क्लब (कांदिवली) या मुंबईतील सांगितिक संस्थांनी त्यांना गौरवनिधी अर्पण करण्याचे ठरविले आहे.
तरल आणि प्रगल्भ जाणीव असलेल्या माझ्या वाचक मित्र-मैत्रिणींनो, एका व्रतस्थ स्वरयोग्याच्या गौरवनिधीसाठी, तुमचे धनादेश ‘उस्ताद सईदुद्दिन डागर गौरव समिती (saiduddin dagar gaurav samiti)  या नावाने  राजहंस प्रतिष्ठान,   ४ / ६५, भट बंगला, पेरु बाग, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३ येथे जरूर पाठवून द्या. संवेदनाक्षम मनाने आणि उदार हस्ताने.
‘हृदयातून जे उमटते आणि हृदयाला भिडते’ ते गाणे असे मानणाऱ्या उस्ताद सईदुद्दिन डागर यांच्या धृपद-धमार गायनात रागभावाचा रस-परिपोष असतो. त्यांची आलापचारी ऐकताना एका अखंड, प्रवाही आणि अथांग अशा नाद-ब्रह्माची अनुभूती येते. रागाच्या आकृतिबंधाच्या मर्यादेत राहूनही, त्यांच्या गायनातून भावपरिणाम, संवेदना, कल्पना आणि जाणीव विविध सौंदर्यपूर्ण रुपात एका विलक्षण समृद्धीने मनाला भेटत राहतात. गमक, उत्स्फूर्त, डगर, आंदोल, अनुरणनात्मक गुंजन, आसयुक्त मिंड अशा सौंदर्यपूर्ण स्वरोच्चरांनी सजवून, उस्ताद सईदुद्दिनजी फक्त रागाचा भाव आणि आशय श्रोत्यांना सादर करीत नाहीत तर संपूर्ण सभागृह, श्रोत्यांची व्यक्तिमत्त्वे, त्यांच्या अंतरात्मा या सगळ्यांना एकाचवेळी रागभावाने आवृत्त करतात आणि त्या स्वरमंत्रांनी भारून टाकतात. बंदिशीतील काव्यभाव आणि राग-भाव यांचे भान ठेवूनच ते आवश्यक तिथेच गमकाचा प्रयोग करतात आणि आड, बिहाड, कुहाड, दुगुन, चौगुन, सम, बिसम, अतीत, अनागत हे लयकारीचे प्रकारही मात्रांच्या गिनतीत न बांधता, भावाला पोषक अशी उपज अंगाने लयकारी करतात. ‘रस’ हाच संगीताचा आत्मा आहे असे मानणाऱ्या आणि गाणाऱ्या स्वरयोगी धृपादिये उस्ताद सईदुद्दिन डागर यांना ७० वर्षे पूर्ण झाली- त्या निमित्ताने.
सरकार याची दखल घेईल का?
३ नोव्हेंबर १९८८ च्या शासन क्रमांक १२८८/ प्रपन-९१/१९ या पत्रान्वये, गृहनिर्माण व विशेष सहाय्य, मंत्रालय यांच्याकडून शासनाच्या स्वेच्छानिर्णयानुसार करावयाच्या राखीव सदनिकांमधून, कलाकार या प्रवर्गातून सईदुद्दिन डागर यांना ८०० चौ. फू.ची सदनिका पुण्यात देण्याचा निर्णय कळविण्यात आला. शरद पवार मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर डागरांचे पुण्यात १५ वर्षे वास्तव्य नसल्याने ती सदनिका त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डागरांसारखे कलाकार, हे कुठलाही प्रांत किंवा राज्याच्या मर्यादेत सीमित होऊ शकत नाहीत. असे कलाकार हे राष्ट्रीय संस्कृतीचे आणि अस्मितेचे प्रतीक असतात. सरकारने अशा व्यक्तींच्या बाबतीत, १५ वर्षे वास्तव्याची अट शिथिल करायला काहीच हरकत नव्हती.
मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ८ जानेवारी १९९९ रोजी शासनाने पुन्हा डागर यांना पुण्यात सदनिका देण्याचा निर्णय कळवला. सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर, शासनाने डागर यांना महाराष्ट्र राज्य कला संचनालयातून ‘ते कलाकार आहेत’ असे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. तत्कालिन पुणे जिल्हाधिकारी रत्नाकर कुलकर्णी यांनी शासनाला कळविलेदेखील की, राष्ट्रीय  कीर्तीच्या डागर यांच्यासारख्या कलाकारांना असे प्रमाणपत्र आणण्यास सांगणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. परंतु आज २०१० सालापर्यंत उस्ताद डागरांना शासनाची सदनिका प्राप्त झालेली नाही.
आयुष्याच्या संध्याकाळी, अजूनही ‘अनिकेत’ असलेला हा थोर कलाकार, दर दोन-तीन वर्षांनी भाडय़ाची घरे बदलत, पुण्यात वास्तव्य करून आहे.
उस्ताद डागरच नव्हेत तर कला, क्रीडा, शिल्प, नाटय़, साहित्य आणि जीवनातील विविध क्षेत्रात असे समर्पित आणि व्रतस्थ जीवन जगणाऱ्या व्यक्तींना, सरकारने राखीव कोटय़ातून सदनिकाच नव्हे तर वयाच्या साठीनंतर निदान त्यांचा चरितार्थ आणि वृद्धापकाळातील आजारांच्या औषधांवरील खर्च भागेल एवढे निवृत्ती वेतन, सन्मानपूर्वक त्यांच्या घरी पोहोचेल अशी व्यवस्था करावी.
समाजातील अशा श्रेष्ठ, ललामभूत कलाकारांना किंवा व्यक्तींना आर्थिक परावलंबित्व आणि आर्थिक याचकत्त्व पत्करावे लागणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लांच्छनास्पद आहे.
समाज याचा विचार करेल का?
दूरदर्शनवरील नृत्य, नाटय़, संगीतावर आधारीत रिअॅलिटी शोजमधून निवडलेल्या गुणी कलाकारांना रोख व भेटवस्तूंमधून लाखो रुपये देण्याऐवजी, देशातील त्या त्या क्षेत्रातील ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अशा ज्येष्ठ कलाकारांकडे शिकण्यासाठी कमीत-कमी पाच वर्षांची शिष्यवृत्ती दिल्यास, समाजातील अशा ज्येष्ठ गुणीजनांना आर्थिक स्वास्थ्य प्राप्त होईल. आपापल्या कलेतील नवी क्षितिजे गाठता येतील आणि त्याचबरोबर नव्या पिढीमध्ये, अभिजात कलांची मूलतत्त्वे संक्रमित होऊन, राष्ट्रीय संस्कृतीचं रक्षण, जतन, विकसन आणि संवर्धन होईल.
ज्यांच्या हातात संपत्ती, सत्ता, संस्था आणि जाहिरात क्षेत्र आहे, त्या सर्वानी एकत्र येऊन, व्यापक जाणीवेतून विचार व कृती केल्यास, हे सहजसाध्य आहे.
उस्ताद सईदुद्दिन गौरव समिती
अध्यक्ष- डॉ. घनश्याम बोरकर
चिटणीस- सुहास कबरे
कोषाध्यक्ष- केशव परांजपे
सदस्य- १) पद्मश्री सुरेश आमोणकर, गोवा
२) दीपक प्रभुदेसाई, गोवा
३) विनय करंदीकर, पुणे
४) लक्ष्मीकांत पारनेरकर, पुणे
५) माधवराव खाडिलकर, मुंबई
६) श्री. सुरेश तळवळकर, मुंबई
७) पद्मश्री डी. के. दातार, मुंबई
८) चिन्मय बोरकर, मुंबई

Thursday, April 1, 2010

यशवंतबुवा जोशी
यशवंतबुवा जोशींच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकणाऱ्या कुणालाही ते धिप्पाड आणि थोराड अंगयष्टीचे असतील, अशी खात्री वाटेल. त्यांच्या गायनातील आक्रमकता रसिकाला जेवढी खिळवून ठेवते, तेवढेच त्यातील लालित्यही त्याला भावते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कुणाही रसिकाचा होणारा भ्रमनिरास बुवाही आनंदाने बघत असतात. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी बुवांना मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानने जाहीर केलेला चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार म्हणजे बुवांच्या सांगीतिक कारकीर्दीतील आणखी एक मानाचा तुराच मानायला हवा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ गाणेच करायचे असा हट्ट धरणारी यशवंतबुवा जोशींची शेवटचीच पिढी असावी. पुण्यात बालपणी हलाखीच्या स्थितीतही बुवांची इच्छा अभिजात संगीतात काही करण्याचीच होती. इचलकरंजीला मिराशीबुवांकडे त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली आणि ग्वाल्हेर गायकीतील खाचखळगे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वरांच्या महालाची रचना यांचे ज्ञान मिळवले. पण एवढय़ावर बुवांची सर्जनशीलता पुरी पडेना म्हणून मग त्यांनी आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गुरू जगन्नाथबुवा पुरोहित आणि गजाननबुवा जोशी यांच्याकडेही संगीताचे शिक्षण घेतले. ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन्ही घराण्यांची वैशिष्टय़े आपल्या गळय़ात उतरवताना आवश्यक असणारे कलात्मक भान बुवांकडे असल्यामुळेच त्यांनी स्वत:ची एक शैली निर्माण केली. जगन्नाथबुवांकडे गाणे शिकत असताना पं. राम मराठे, माणिक वर्मा, पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी अशी नंतरच्या काळात स्वनामधन्य झालेली कलावंतांची एक फळीच शिष्य म्हणून हजर असे. असे सर्जनशील गुरुबंधू मिळाल्यावर यशवंतबुवांचे गाणे आणखी फुलेल, यात नवल नव्हते. अप्रतिम खडा आवाज आणि आक्रमक शैली यामुळे यशवंतबुवा अल्पावधीतच रसिकप्रिय झाले. मैफलीला सुरुवात होताच पहिल्या चार आलापातच सगळी मैफल काबूत आणण्याची यशवंतबुवांची मिजास कुणालाही थक्क करायला लावणारी असे. बुवा काही वर्षांपासून प्रत्यक्ष मैफलीत गाणे करत नसले तरीही त्यांच्या मनात मात्र आजही तेच तडफदार आणि दमदार गाणे पाझरत असते. लयकारी, बोलबनाव, ताना यामध्ये बुवा अगदी माहिर मानले जातात. मैफलीमध्ये आवाज लागला नाही, असे बुवांच्या बाबत फारच क्वचित घडले असेल. त्यामुळे हमखास बहारदार मैफल करणारा कलावंत अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. बुवा जगन्नाथबुवांकडे त्यांच्याबरोबर शिकणारे राम मराठे, जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे सहाध्यायी म्हणजे बुवांचा जीव की प्राण असत. स्वरांची ही मैत्री इतकी सच्ची होती, की रामभाऊ मराठेंच्या व्यावसायिक मैफलीत ऐनवेळी तबलजी येऊ शकला नाही तर यशवंतबुवा अगदी प्रेमाने त्यांना उत्तम साथ करायचे. रामभाऊंनीही बुवांबरोबर साथ करताना आपले व्यावसायिक यश कधी मध्ये येऊ दिले नाही. बुवा जेवढे उत्तम कलावंत, तेवढेच उत्तम गुरूही आहेत. मैफली गवयांना शिष्य तयार करायला बहुधा वेळच मिळत नाही, परंतु बुवांनी जाणीवपूर्वक एक संपन्न अशी शिष्यपरंपरा तयार केली. आजच्या आघाडीच्या कलावंत आशा खाडिलकर, शोभा जोशी, ओंकार दादरकर, राम देशपांडे यांच्यासारखे शिष्य बुवांचे गाणे आजही ताजेतवाने ठेवत आहेत. बुवांच्या गाण्यात लगाव आग्ऱ्यासारखा असला तरी ग्वाल्हेरचे लालित्य ते स्वरास्वरांमधून लीलया दाखवतात. ते  जगन्नाथबुवांकडे शिकायला हजर झाले, तेव्हा ते बुवांना म्हणाले होते की, तुझ्या गाण्यात रग आहे, आता त्यावर एक  अनुस्वार द्यायला हवा बुवांनी मग आपल्या गाण्यात लालित्याचे जे रंग भरले, त्याने रसिक मंत्रमुग्ध होत असत. पुरस्कार, प्रसिद्धी याच्या मागे न धावता आयुष्यभर आनंदाचे झाड लावणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आजही स्वरांच्या दुनियेतच रममाण आहे.  उत्तम कलावंत आणि उत्तम गुरू म्हणून  संगीतक्षेत्राला माहीत असणाऱ्या यशवंतबुवांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कालिदास सन्मानानेही ते सन्मानित झाले आहेत. वयाच्या उत्तरार्धात का होईना, त्यांच्या कला कारकीर्दीची दखल घेतली गेली, हे भाग्याचे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सदर लेख बुधवार, ३१ मार्च २०१० च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, March 15, 2010

माझ्या मना बन दगड
हा रस्ता अटळ आहे!
अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय,
ज्ञानाशिवाय; मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव!
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्वास.
विसर यांना, दाब कढ;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
ऐकू नको हा आक्रोश,
तुझ्या गळय़ाला पडेल शोष.
कानांवरती हात धर,
त्यातूनही येतील स्वर.
म्हणून म्हणतो ओत शिसे;
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या, रडशील किती?
झुरणाऱ्या, झुरशील किती?
पिचणाऱ्या, पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो;
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे!
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर.
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात;
आणि म्हणतात, ‘‘कर िहमत,
आत्मा वीक, उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य;
स्मरा त्याला, स्मरा नित्य.’’
भिशील ऐकून असले वेद;
बन दगड, नको खेद!

बन दगड आजपासून;
काय अडेल तुझ्यावाचून;
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे नि:श्वास
मरणाऱ्यांना देतील श्वास?
आणिक दु:ख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे दु:ख तेच फार;
माझ्या मना कर विचार!
कर विचार : हस रगड;
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे!
अटळ आहे घाण सारी;
अटळ आहे ही शिसारी.
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल!

अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा; होतील भुते.
या सोन्याचे बनतील सूळ!
सुळी जाईल सारे कूळ.
ऐक टापा! ऐक आवाज!
लाल धूळ उडते आज;
याच्यामागून येईल स्वार;
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड;
माझ्या मना बन दगड!
घेता
देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.

हिरव्यापिवळय़ा माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी;
सहय़ाद्रीच्या कडय़ाकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेडय़ापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी.

देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे!

Tuesday, February 2, 2010

बैजु बावरा..
चित्रपटः बैजु बावरा
सालः १९५२
आवाजः स्व. रफी साहाब
पडद्यावरः भारत भुषण
गीतकारः शकील बदायुनी साहाब
नमस्कार मंडळी,

"ओ दुनियाके रखवाले" ...एकाच दरबारी कानड्यामधल्या गीतामधे आर्त दु:ख्खी स्वरापासुन जाळुन टाकणार्‍या उच्च टाहो फोडणार्‍या स्वरापर्यंतचा आवाज...फक्त एकच आणि तो म्हणजे " स्व. रफी साहाब यांचा"...
त्यावेळचा एक किस्सा अस्सा की ह्या महान गायकाला नेहेमी एक खंत असे की त्यांच्यामते तलत मेहेमुद वा मुकेश यांच्यासारखा परिणाम त्यांना साधता येत नाहीये. ही खंत त्यांनी नौशाद साहेबांच्या कडे बोलुन दाखवली होती. आणि आपलं रसिकांच भाग्य असं की त्यामुळे नौशाद साहेबांनी त्यांना हे गाणं दिलं आणि म्हणाले की घे, ही तुझी संधी ...

नौशाद साब म्हणतात की रफी साब रोज सतत २१ दिवस ह्या गाण्याची तालीम घेत होते. गंमत म्हणजे हे गाणं भारत भुषण ह्या अंगापींडानं मध्यम/किरकोळ असणार्‍या कलाकाराला दरबारी सारख्या दणकट रागात व रफीसाहेबांसारख्या दणकट आवाजात आहे.

काही नोंद घेण्यासारख्या गोष्टी...
बैजु बावरा हा सिनेमा त्या वेळच्या ब्रॉडवे सिनेमागृहात झळकलेला होता. त्यावेळी पहिल्या खेळावेळी नौशाद साब यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यावेळी विजय भटांनी विचारलं असता नौशाद साब म्हणाले की याच मुंबई मधे जेव्हा ते प्रथम आले तेव्हा याच ब्रॉडवे सिनेमाच्या समोरच्या फुटपाथवर झोपले होते आणि त्यांना १६ वर्ष लागली तो फुटपाथ ओलांडण्यासाठी. किती मोठी माणसं !!!

या सिनेमामधे 'तानसेन' आणि 'बैजु' च्या आवाजासाठी सुप्रसिद्ध गायक उस्ताद आमिर खाँ साहेब आणि पं. दिगंबर विष्णु पलुसकर यांनी आवाज दिला आहे.

या सिनेमामुळे नौशाद साहेब यांना आयुष्यात पहिल्यांदा सर्वोत्तम संगीतकार व मीना कुमारी यांना पहिल्यांदा सर्वोत्तम नटी चा फिल्मफेअर मिळाला.