Showing posts with label yashawantbua joshi. Show all posts
Showing posts with label yashawantbua joshi. Show all posts

Friday, January 7, 2011


संगीत हेच आपले जीवन मानणाऱ्या कलावंतांची भारतात एकेकाळी वानवा नव्हती. ज्या काळात संगीताला सामाजिक प्रतिष्ठा अजिबात नव्हती, त्या काळातही अनेक कलावंत संगीतालाच आपले सर्वस्व मानत असत. संगीतासारख्या सौंदर्याची उपासना करणाऱ्या कलेचा हा ध्यास संगीताला तग धरून राहण्यास उपयोगी पडला, हे आता लक्षात येते. गेल्या काही वर्षांत, विशेषत: जागतिकीकरणानंतर संगीताच्या दुनियेत प्रतिष्ठेबरोबरच पैसाही आला आणि हे जग वेगळ्याच मार्गाने जाऊ लागले, अशाही काळात सातत्याने उत्तम संगीत निर्माण करण्याचा ध्यास घेणारे पंडित यशवंतबुवा जोशी यांना यंदाचा हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे पहिला ‘हृदयेश संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर होणे हे खरे म्हणजे एक सुचिन्ह आहे. कलावंताला अशा पुरस्काराने मिळणारी ऊर्जा फार महत्त्वाची असते आणि ही गोष्ट हृदयेश आर्ट्सने ओळखली आहे, हेही तितकेच महत्त्वाचे म्हटले पाहिजे. भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर गायकीतील यशवंतबुवा हे एक नामवंत कलावंत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालीम मिळालेली. त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या अनेक उत्तमोत्तम चिजांचा भरणा आहे. त्या चिजांकडे पाहण्याची त्यांची एक खास अशी सौंदर्यदृष्टी आहे. आयुष्भर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिद्धीचे वलय फार उशिराने प्राप्त झाले. महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीची स्थापन करणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य यशवंतबुवा मिराशी हे यशवंतबुवा जोशी यांचे पहिले गुरू. संगीताच्या गायनशैलीत घराण्याच्या अस्सलपणाला फार महत्त्व असते. अनेक कलावंतांनी आपापल्या गायनशैलीत अन्य शैलींचा प्रभाव मिसळत त्यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. यशवंतबुवांनी मात्र आयुष्यभर या अस्सलपणाला फार महत्त्व दिले. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची तालीम त्यांना मिळाली, तरी या दोन्ही घराण्यांतील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न ते आयुष्यभर करत आले आहेत. सतत चिंतन करण्याने गायनात मोठा फरक पडत असतो, याचे भान अलीकडच्या कलावंतांमध्ये क्वचित आढळते. सर्जनशीलतेच्या निसर्गदत्त देणगीवर विसंबून गायनकला पुढे जात नाही, याची जाणीव या कलावंतांना होण्यासाठी त्यांनी यशवंतबुवांचाच आदर्श ठेवायला हवा. स्वरांवर हुकूमत असणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश करायला हवा. गायला सुरुवात करताच स्वरावर घट्ट पकड करण्याची त्यांची क्षमता अचाट आहे. स्वर आणि लय या संगीताच्या दोन्ही चाकांवर आरूढ होत यशवंतबुवा जेव्हा गायनाला सुरुवात करतात, तेव्हा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करत ते रसिकांना पटकन कब्जात घेतात. स्वरांच्या आंदोलनांप्रमाणेच तानांवरचा त्यांच्या गळ्याचा ताबा प्रत्येकाला अचंबित करायला लावणारा ठरतो. शरीर म्हटले तर कृश या सदरात मोडणारे. पण गायला लागल्यानंतर रसिकांना साक्षात्काराचीच अनुभूती यशवंतबुवा अनेकवेळा देते आले आहेत. पुण्यात बालपण गेलेल्या यशवंतबुवांना तेव्हाच अनेक दिग्गज गायक ऐकायला मिळाले. जन्म १९२७ चा. म्हणजे संगीत नाटक ऐन बहरात आलेले. खरे तर त्या काळात चांगल्या गायकाला मैफली गवई होण्याबरोबरच गायक नट होण्यात अधिक रस असणे स्वाभाविक होते. यशवंतबुवांना त्यांच्या शरीरयष्टीने ‘साथ’ दिली आणि ते गायनाकडे वळले. ग्वाल्हेरनंतर आग्रा घराण्याची तालीम जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे घेतली, तेव्हा यशवंतबुवांना गाण्यातील भावदर्शनाची एक नवी शैली प्राप्त झाली. आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणाऱ्या या कलावंताला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्याच्या कलेला मिळणारी सार्वजनिक पावती आहे!
 =========================================================================
 सदर लेख बुधवार, ०७ जानेवारी २०१ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Thursday, April 1, 2010

यशवंतबुवा जोशी
यशवंतबुवा जोशींच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण ऐकणाऱ्या कुणालाही ते धिप्पाड आणि थोराड अंगयष्टीचे असतील, अशी खात्री वाटेल. त्यांच्या गायनातील आक्रमकता रसिकाला जेवढी खिळवून ठेवते, तेवढेच त्यातील लालित्यही त्याला भावते. त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर कुणाही रसिकाचा होणारा भ्रमनिरास बुवाही आनंदाने बघत असतात. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी बुवांना मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानने जाहीर केलेला चतुरंग संगीत सन्मान पुरस्कार म्हणजे बुवांच्या सांगीतिक कारकीर्दीतील आणखी एक मानाचा तुराच मानायला हवा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ गाणेच करायचे असा हट्ट धरणारी यशवंतबुवा जोशींची शेवटचीच पिढी असावी. पुण्यात बालपणी हलाखीच्या स्थितीतही बुवांची इच्छा अभिजात संगीतात काही करण्याचीच होती. इचलकरंजीला मिराशीबुवांकडे त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली आणि ग्वाल्हेर गायकीतील खाचखळगे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वरांच्या महालाची रचना यांचे ज्ञान मिळवले. पण एवढय़ावर बुवांची सर्जनशीलता पुरी पडेना म्हणून मग त्यांनी आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गुरू जगन्नाथबुवा पुरोहित आणि गजाननबुवा जोशी यांच्याकडेही संगीताचे शिक्षण घेतले. ग्वाल्हेर आणि आग्रा या दोन्ही घराण्यांची वैशिष्टय़े आपल्या गळय़ात उतरवताना आवश्यक असणारे कलात्मक भान बुवांकडे असल्यामुळेच त्यांनी स्वत:ची एक शैली निर्माण केली. जगन्नाथबुवांकडे गाणे शिकत असताना पं. राम मराठे, माणिक वर्मा, पं. सी. आर. व्यास, पं. जितेंद्र अभिषेकी अशी नंतरच्या काळात स्वनामधन्य झालेली कलावंतांची एक फळीच शिष्य म्हणून हजर असे. असे सर्जनशील गुरुबंधू मिळाल्यावर यशवंतबुवांचे गाणे आणखी फुलेल, यात नवल नव्हते. अप्रतिम खडा आवाज आणि आक्रमक शैली यामुळे यशवंतबुवा अल्पावधीतच रसिकप्रिय झाले. मैफलीला सुरुवात होताच पहिल्या चार आलापातच सगळी मैफल काबूत आणण्याची यशवंतबुवांची मिजास कुणालाही थक्क करायला लावणारी असे. बुवा काही वर्षांपासून प्रत्यक्ष मैफलीत गाणे करत नसले तरीही त्यांच्या मनात मात्र आजही तेच तडफदार आणि दमदार गाणे पाझरत असते. लयकारी, बोलबनाव, ताना यामध्ये बुवा अगदी माहिर मानले जातात. मैफलीमध्ये आवाज लागला नाही, असे बुवांच्या बाबत फारच क्वचित घडले असेल. त्यामुळे हमखास बहारदार मैफल करणारा कलावंत अशीच त्यांची ओळख सांगितली जाते. बुवा जगन्नाथबुवांकडे त्यांच्याबरोबर शिकणारे राम मराठे, जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे सहाध्यायी म्हणजे बुवांचा जीव की प्राण असत. स्वरांची ही मैत्री इतकी सच्ची होती, की रामभाऊ मराठेंच्या व्यावसायिक मैफलीत ऐनवेळी तबलजी येऊ शकला नाही तर यशवंतबुवा अगदी प्रेमाने त्यांना उत्तम साथ करायचे. रामभाऊंनीही बुवांबरोबर साथ करताना आपले व्यावसायिक यश कधी मध्ये येऊ दिले नाही. बुवा जेवढे उत्तम कलावंत, तेवढेच उत्तम गुरूही आहेत. मैफली गवयांना शिष्य तयार करायला बहुधा वेळच मिळत नाही, परंतु बुवांनी जाणीवपूर्वक एक संपन्न अशी शिष्यपरंपरा तयार केली. आजच्या आघाडीच्या कलावंत आशा खाडिलकर, शोभा जोशी, ओंकार दादरकर, राम देशपांडे यांच्यासारखे शिष्य बुवांचे गाणे आजही ताजेतवाने ठेवत आहेत. बुवांच्या गाण्यात लगाव आग्ऱ्यासारखा असला तरी ग्वाल्हेरचे लालित्य ते स्वरास्वरांमधून लीलया दाखवतात. ते  जगन्नाथबुवांकडे शिकायला हजर झाले, तेव्हा ते बुवांना म्हणाले होते की, तुझ्या गाण्यात रग आहे, आता त्यावर एक  अनुस्वार द्यायला हवा बुवांनी मग आपल्या गाण्यात लालित्याचे जे रंग भरले, त्याने रसिक मंत्रमुग्ध होत असत. पुरस्कार, प्रसिद्धी याच्या मागे न धावता आयुष्यभर आनंदाचे झाड लावणारे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आजही स्वरांच्या दुनियेतच रममाण आहे.  उत्तम कलावंत आणि उत्तम गुरू म्हणून  संगीतक्षेत्राला माहीत असणाऱ्या यशवंतबुवांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. कालिदास सन्मानानेही ते सन्मानित झाले आहेत. वयाच्या उत्तरार्धात का होईना, त्यांच्या कला कारकीर्दीची दखल घेतली गेली, हे भाग्याचे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सदर लेख बुधवार, ३१ मार्च २०१० च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.