Sunday, October 21, 2012

पं.अभिषेकी महोत्सव

पं. अभिषेकी महोत्सव

 तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे कला अकादमी, गोवा सांस्कृतिक संचालनालय आणि पेनिन्सुला लँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील मा़  दीनानाथ मंगेशकर सभागृहात  पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. अनेक विश्वविख्यात कलावतांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. आपलं घराणं किंवा आपल्या गुरूने दिलेली विद्या, हीच श्रेष्ठ आणि त्यांचाच प्रसार करण्यासाठी आपण झटायचं, असा संकुचित दृष्टिकोन बाळगणारे अनेक गायक आपण पाहतो़
मात्र संगीताकडे घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन पाहू शकणारे जितेंद्रबुवांसारखे कलाकार विरळच़  पं.जितेंद्र अभिषेकी शिक्षण घेतानाही एखाद्याच घराण्यात अडकून राहिले नाहीत़  त्यांनी उस्ताद अमझद हुसेन खान यांच्याकडे शिक्षण घेतले, तसे गिरिजाबाई केळकर आणि जगन्नाथबुवा पुरोहितांकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतल़े  त्यानंतरही काही दुर्मिळ रागांसाठी त्यांनी बडे गुलाम अली खाँसाहेबांचे शिष्यत्व पत्करल़े  परिणामत: त्यांची गायकी तर समृद्ध झालीच, पण त्याचबरोबर समग्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची माहिती झाल्यामुळे त्यांना सगळ्यातील उत्तम, उद्दात्त आणि उन्नत, ते ते निवडून स्वत:ची ‘अभिषेकी शैली’ निर्माण करता आली़  अर्थात यात कोणत्याही एका घराण्याचा सांगीतिक वारस जपण्याचा अट्टहास नव्हता, तर उत्तमाचा शोध घेणारी सर्वसमावेशकता होती़  त्यामुळेच आजही पंडितजींनी स्थापन केलेल्या तरंगिणी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवावर कोणत्याही एका घराण्याची छाप नसत़े
१३ आणि १४ ऑक्टोबरला पणजीत पार पडलेल्या  या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे प्रमुख विश्वस्त शौनक अभिषेकी, पणजीच्या महापौर वैदेही नायक, कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ, उपाध्यक्ष राजा खेडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल़े  यंदाच्या महोत्सवात तर पहिल्यांदाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पल्याड उडी मारून दाक्षिणात्य संगीतालाही स्थान देण्यात आले होत़े   ‘कर्नाटकी ब्रदर्स’ या जोडगोळीने कानसेन गोवेकरांची पूर्ण तृप्ती केली़  शशिकिरण आणि गणेश अर्थात कर्नाटकी ब्रदर्सनी आजवर देश- विदेशात अनेक मैफली गाजविल्या आहेत़  सलग २४ तास मैफलीचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आह़े  त्यांच्या मैफलीत दाक्षिणात्य पद्धतीनुसार तबल्याऐवजी मृदंगम् या तालवाद्याचा आणि संवादिनीऐवजी व्हायोलिन या स्वरवाद्याचा साथीसाठी वापर करण्यात आला होता़  तबल्यापेक्षा काहीशी रुंद असणारी मृदंगम्ची चाट जोरकस आणि अधिकाधिक वारंवारतेने वाजवून नादनिर्मिती करण्याचा दाक्षिणात्य संगीतातील सुरेल प्रघात आह़े  त्यामुळे त्यातून निर्माण होणारा ठेका म्हणजे दाक्षिणात्य संगीतच, अशी ओळख श्रोत्यांच्या कानात वर्षांनुवष्रे तयार झाली आह़े  त्याचाच परिणाम म्हणून मृदंगम्वर साथीला असणाऱ्या साई गिरीधर यांनी ठेका दाक्षिणात्य धरताच श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली़  त्यांच्यासोबत व्हायोलिनवर साथीला पद्मा शंकर होत्या़  कर्नाटकी ब्रदर्सनी मैफलीला सुरुवात केली ती आदितालातील हंसध्वनी या हिंदुस्थानी संगीत श्रोत्यांनाही परिचित असणाऱ्या रागाऩे  याची बंदिश(गीत) होती, ‘बातापी गणपतम् भजे गौ’.  त्यानंतर श्री रागात तेलुगू गाणे ‘एदरो महानुभावो’ आणि शेवट स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ‘भो शंभो, शिवशंभो, स्वयंभू’ या रेवती रागातील संस्कृत भक्ती गीताने करण्यात आला़  मैफलीचे विशेष आकर्षण ठरली, कर्नाटकी ब्रदर्सनी खास या महोत्सवासाठी रचलेली ‘गानोत्सवम्, कलोत्सवम्, पंडित अभिषेकी संगीत महोत्सवम्’ ही बंदिश!
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा शेवट सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या पल्लेदार गायनाने झाला़  जौनपुरी, आसाजोगीया, वृंदावनी अशा क्रमाने आरतीताईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली़  मध्यंतराची वेळ लोटून गेली, तरी श्रोत्यांचे मन भरेना़  आता आणखीन काय गाऊ, या आरतीताईंच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी चोखंदळ गोमांतकी श्रोत्यांकडून टप्पा, अवघा रंग.. अशा फर्माइशी येतच होत्या आणि आरतीताईही न कंटाळता त्या पुरवीत होत्या़  अशा भारावलेल्या वातावरणात मध्यंतर झाले.
शोभा चौधरी आणि अभिषेकीबुवांचे शिष्य डॉ़  राजा काळे यांचे गायनही पहिल्या दिवशी ऐकायला मिळाल़े  मात्र यात सर्वात फक्कड जमली, ती पंडित गणपती भट यांचीच मैफल! गोड गळा आणि संथ लयीतील सुंदर बढतींसाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीबुवांनी तीन तालात ‘पिया मेरे परदेस बसत हैं’या  बंदिशीला सुरुवात केली आणि प्रत्येक समेवर टाळ्यांच्या कडकडाटाला जी सुरुवात झाली, ती शेवटचे भजन ‘रघुनंदन आगे नाचुंगी’पर्यंत कायम होती़  दुसऱ्या दिवशी पं.विजय सरदेशमुख यांचे ‘मैं कैसे भरू पानी’ ही ठुमरी आणि ‘शून्य गढ- शहर- शहर-घर- वस्ती, कोण सोता कोन जागे है। लाल हमारा हम लालन के, तन सोता ब्रह्म जागे हैं। ’ हे भजन, असे शास्त्रीय- उपशास्त्रीय गायन झाल़े  शास्त्रीय संगीताची झिंग चढते, असे जे म्हटले जाते; त्याची प्रत्यक्षानुभूती सरदेशमुखांच्या गायनाने घेता आली़  जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर यांनी आळवलेला यमन- बिलावल आणि त्यानंतर खास जयपूर घराण्याचा म्हणून ओळखला जाणारा खट हे दोन्ही राग फक्कड जमल़े  पण खट राग सर्वसामान्य श्रोत्यांना फारसा परिचित नसल्यामुळे, त्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद शास्त्रीय संगीताच्या पक्क्या कानसेनांनाच घेता आला.  श्रुतीताईंनी स्वत: स्वरबद्ध केलेले ‘कैसे दिन कटे हैं’ हे  श्रोत्यांच्या फर्माइशीवरून गायलेले भजन मात्र सर्वानाच तृप्त करणारे ठरल़े  गोमांतकी गायिका प्रचला आमोणकर यांचा पटदीप राग आणि भरवी ‘सगुण संपन्न पंढरीच्या राया’ श्रोत्यांची दाद मिळवून गेल़े  शुद्ध आग्रा घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाम हुसेन खाँ ऊर्फ राजा मियॉं यांनी महोत्सवात आपली कला सादर केली़  त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथ केली़  आग्रा घराण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी नोमतोमने सुरुवात करत पूर्वा राग गायला़  त्यानंतर ‘बाजे मोरी पायलीया कैसे’ या बंदिशीने मैफल संपवली़  प्रसिद्धी किंवा श्रोते मिळविण्यासाठीही इतर कोणत्याही घराण्याचा फारसा प्रभाव आपल्या गायकीवर पडू न देता वर्षांनुवर्षे विशुद्धता राखणे शक्य आहे, हेच राजा मियॉंच्या गायकीने दाखवून दिल़े
बैठय़ा स्वर-तालाला महोत्सवात उभे केले, ते बिरजू महाराजांच्या शिष्या पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी! दत्ता यांनी आपल्या शिष्या पल्लवी गोसावी, राधिका शेलार, जिजाऊ कोलते यांच्या सोबतीने कथ्थकच्या तरल अदाकारी सादर करीत उपस्थितांच्या मनावर मोहिनी घातली़  तीन तालाच्या वेगवेगळ्या लयीतील रचना, ध्यान, कृष्णशृंगार अशा एक ना अनेक गोष्टी त्यांनी सादर केल्या आणि दादही मिळवली़  त्यातही समेपूर्वी संपणाऱ्या तीन तिहाया, तबलजीने केवळ समेचा ‘धा’ वाजवून त्याला दिलेली साथ आणि त्यावर नर्तिकीची नाजूक अदाकारी! हा प्रकार तर अक्षरश: घायाळ करणारा होता़  बैठकीची सांगता, पं.बिरजू महाराज यांच्या ‘शाम मूरत मन भाये’ या सुरेल तराण्याने झाली़
कोणत्याही संगीत महोत्सवाचा असतो तसा अभिषेकी महोत्सवाचाही वाद्यसंगीत हा महत्त्वाचा भाग होता़  वाद्यसंगीताच्या सर्व मैफलींना सुप्रसिद्ध तबला वादक योगेश सम्सी यांनी साथ केली़  पं. नयन घोष यांच्या सतारीतून निघालेल्या गावती रागाने श्रोत्यांची मने जिंकली़  मात्र श्रोत्यांच्या काळजाला हात घातला तो, अतुलकुमार उपाध्याय आणि राजेंद्र कुळकर्णी यांच्या व्हायोलिन आणि बासरीच्या जुगलबंदीनेच! जुगलबंदीची सुरुवात राग नटभरवने झाली़  जुगलबंदीने श्रोत्यांना खरोखर सांगीतिक समाधीच लागल्याचा प्रत्यय आला, ते सभागृहातील वीज एकाएकी गुल झाल्यावर! एकदा नव्हे, तर दोनदा सभागृहात अंधार पसरला़  रंगमंचावर कोणी दिसेना, तरी श्रोते आणि कलाकार दोघांनाही त्याचे भान नव्हत़े  रंगमंचाच्या दिशेने येणाऱ्या सूर- तालावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी धरलेला ठेका क्षणभरही विचलित झाला नाही़  या ‘अंधाऱ्या जुगलबंदीत’ही विशेष चमक दिसली ती सम्सी यांच्या तबल्याची़  समेवर येताना त्यांच्या तबल्यातून वाजणाऱ्या अक्षरश: प्रत्येक तिहाईला दाद मिळत होती, टाळ्या पडत होत्या़  जुगलबंदीनंतर अभिषेकीबुवांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे ‘घेई छंद मकरंद’ हे पद वाजविण्यात आल़े  तेही गोमांतकी श्रोत्यांच्या मनात रुंजी घालणारे होत़े
दोन दिवसांत वेगवेगळ्या घराण्यांच्या गायक- वादकांनी ज्या संगीत सोहळ्याची पायाभरणी केली, त्यावर कळस चढवण्यासाठी पं.हरिप्रसाद चौरसियांनी हातात बासरी घेतली़  या वेळी त्यांच्यासोबत होता त्यांचा शिष्य संतोष संत आणि परदेशी शिष्य आमोस़  तबल्यावर साथीला अर्थातच योगेश सम्सी़  त्यांनी सुरुवात केली ती, राग मारुबिहागपासून आणि मग रसिकाग्रहास्तव यमन नि पहाडी यांचीही बहार उडवून दिली़  वयोमानानुसार हरिजींचे हात- मान थरथरत होती़  बासरीतून निघणारा स्वर न् स्वर मात्र अगदी पक्का होता़  पहाडी वाजवताना तर टिपेच्या स्वराची आखूड बासरी घेऊन हरिजींनी तबलजीच्या साथीने अशा काही लीला केल्या की, तबला हे साथीचे वाद्य न राहता त्याची स्वरवाद्याशी जुगलबंदीच सुरू आहे, असे वाटत होत़े  हरिजींच्या कलेला गोमांतकीयांनी उभे राहून अभिवादन केल़े  ‘एक तो हरि खुद बन्सी बजाये, या फिर हरिप्रसाद बजाये।’ हे निवेदन करणाऱ्या डॉ़  अजय वैद्य यांचे वाक्य श्रोत्यांनी अक्षरश: अनुभवल़ं  अभिषेकी महोत्सवाची सांगता व्हायला हवी तशी किंवा त्यापेक्षा कितीतरी पट अधिक सुंदर झाली़
हत्तीला पाहावे पाण्यात, तसे कलाकाराला पाहावे रसिकांच्या गराडय़ात आणि  गोमांतकीयांनी महोत्सवात उत्तमोत्तम कलावंतांना दोन्ही दिवस असा काही गराडा घातला, की कलाकारही भारावून गेल़े  सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी रसिकांनी सभागृह भरून जायचे, ते रात्री भैरवी होईपर्यंत़  गायकाने आपण गाणार असलेल्या रागाचे नाव सांगितले की शेजारी बसलेल्या चिमुरडीच्या तोंडूनही, ‘अरे वाह! आता हा राग’, असे उद्गार निघत होत़े  महाविद्यालयीन तरुण- तरुणीही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तासन्तास खिळून असल्याचे पाहायला मिळत होत़े  तबलजीने ठेका धरताच, बहुतेक श्रोते हातावर तालाच्या मात्रा मोजू लागत आणि समेवर दाद देत़  आपल्या आवडीच्या रागाच्या फर्माइशी करून मैफलीत सक्रिय सहभाग दाखवीत, त्यामुळे कलाकाराला साहजिक अधिक हुरूप येत होता़  ‘अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी मा लिख’, असे जगनिर्मात्याला विनविणारा कवी जर गोमांतकात आला असता, तर त्याने नक्कीच ‘रसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी लिख’, असा वाक्प्रयोग प्रचलित केला असता.

गोव्यात जणू भारतच लोटल्याचा भास -पं.हरिप्रसाद
alt गोव्यात आपण यापूर्वीही आलो आहोत़  मात्र या महोत्सवासाठी जमलेली श्रोत्यांची प्रचंड गर्दी पाहून, अवघा भारतच तर गोव्यात लोटल्याचा भास आपल्याला झाल्याचे उद्गार पंडित हरिप्रसाद चौरसियांनी काढल़े  त्यांना साथ करणाऱ्या परदेशी शिष्याबद्दल छेडले असता, वृंदावन या आपल्या मुंबई आणि भुवनेश्वर येथे चालणाऱ्या गुरुकुलमध्ये असे किमान ४० ते ४५ परदेशी शिष्य असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली़  तसेच आपण त्यांना परदेशी मानत नसून, तेही आपलेच आहेत़  आपली कला पुढे चालविण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे सांगितल़े  कलाकार गरीब घरातूनही पुढे येत असतो़  त्यामुळे अशा कलाकारांसाठी वृंदावनात शिक्षणासह इतरही गोष्टी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े  त्यांना सादरीकरणाची सवय व्हावी म्हणून आपण त्यांना साथीला घेत असल्याचेही त्यांनी सांगितल़े.


 पं.हरिप्रसाद यांचा परदेशी शिष्य
alt आमोस हा ३१ वर्षीय इस्रालयी तरुण आह़े  बारा वर्षांपूर्वी भारतात फिरायला आलेला असताना त्याने झाकीर हुसेन आणि शाहीद परवेज यांची मैफल ऐकली आणि त्याला भारतीय संगीताचे वेड लागल़े  पुढे पंडितजींचा जेरुसलेममधील कार्यक्रम त्याने ऐकला आणि बासरी शिकण्यासाठी सर्वस्व वाहायची त्याची सिद्धता झाली़  त्यानंतर पंडितजींच्या सांगण्यावरून त्याने हॉलंडमध्ये जाऊन बासरी या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि सध्या तो मुंबईतील पंडितजींच्या अंधेरी येथील वृंदावनमध्ये राहून पंडितजींचे मार्गदर्शन घेत आह़े  भावी आयुष्यातील योजनांबद्दल, ‘बासरी, बासरी, बासरी’ इतकेच उत्तर त्याने दिल़े

एक ज्येष्ठ ‘टाळीया’
alt ज्ञानेश्वर टाकळकर उपाख्य माऊली यांनी आयुष्यभर केवळ टाळ या एकाच वाद्याचा ध्यास घेतला़  वय वष्रे ८६ असलेल्या या ‘टाळीया’ने ३५ वर्षे पं़ भीमसेन जोशी यांना साथ केली़  त्यांच्या अभंगवाणीत वा कार्यक्रमात कधीही माऊलींचा टाळ वाजला नाही, असे झाले नाही़  उतारवयात भीमसेनजींनी अभंगवाणीचे कार्यक्रम थांबविले, तरीही केवळ माऊलींची साथ सुटू नये, यासाठी ते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची भैरवी तरी भजनाने करत आणि माऊलींना सोबत ठेवत़  माऊलींनी आजवर किशोरी आमोणकर, राजन- साजन मिश्र, पं.जसराज, अश्विनी भिडे, राम कदम, सुधीर फडके, श्रीनिवास खळे अशा असंख्य बडय़ा असामींना टाळाची सोबत केली आह़े  पूर्वी उदरभरणाइतके उत्पन्न यातून मिळत नसे, त्यामुळे पुण्याच्या महात्मा फुले मंडईत एका व्यापाऱ्याकडे दिवाण म्हणून काम करून, ते आपला छंद जोपासत़  पण आता परिस्थिती बदलल्याचे ते सांगतात़  आता त्यांचा मुलगा आनंद आणि नातू प्रथमेशसुद्धा टाळ वाजवतो़  महोत्सवात भजनाची सुरुवात झाली की, माऊली रंगमंचावर अवतरत आणि लोक  खास त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडात करीत होत़े.

======================================================================= सदर लेख रविवार, २१ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार. 

No comments: