आज परत तो दिवस उगवला..आणि माझ्या आठवणींमधली एक एक गाणी मनात रुंजी घालू लागली...एवढ्यातच अण्णांच आपलं पृथ्वीतलावरचं घरटं देहरुपानं सोडुन गेले तेव्हा मनात दुखा:शिवाय काहीही नव्हतच, त्यातच माझं अत्यंत आवडतं गाण समोर आलं नी माझे ढसाढसा अश्रु ओघळु लागले...
केवढा तो अर्थ. गदिमांचा परिसस्पर्श झालेलं हे गाणं आणि बाबुजींचा टिपेला पोहोचलेला स्वर...क्या केहने..
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात |
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ||
काय म्हणतो बघा हा कवी....देवा, एकदा तरी तुझा मायेचा हा हात माझ्या पाठीवरुन फिरु दे..
मला माहीत आहे की माझं शेवटचं घरटं हे तुझ्याच अंगणात असणार आहे... ह्या रुपकाला काय दाद द्यायची..?
धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो|
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात ||
वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही |
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात ||
कवी म्हणतो..देवा संपुर्ण जग फिरलो...कितीतरी प्राणी,पक्षी मित्र केले पण शेवटी काळजात तुझ्याशिवाय कुणीच नव्हते. सगळीकडे तुझीच सोबत होती. कितीतरी ऊनपावसाचे खेळ पाहिले आणि झेलले तरी तुझा सहवास सिटला नाही..देवा आतातरी जवळ घे..
फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी |
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत ||
ह्यापुढे कवी काय म्हणतो बघा...जेव्हा सर्वांग सुंदर मोर पिसांचा पसार करुन वनात तुझ्यासमोर नाचतो तेव्हा त्या भाग्यवंतांना सुद्धा तुझा सहवास लाभला आहे....देवा आता मला कधी रे तुझा सहवास मिळणार?
शेवटच्या आर्त ओळीतर गदिमांच्या प्रतिभेचा अत्युच्च बिंदुच म्हणला पाहिजे...
मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ? |
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात ||
ते म्हणतात, ह्या अथांग आणि असीम जगात जेव्हा फक्त सगळ्यांना सुंदर, सुस्वरुप, उत्तम वाणी आणि हुशार लोक जवळ हवे असतात तेव्हा तिथे माझ्यासारखा दुर्बळ तुझ्या नजरेस पडेल का रे? कारण, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काम करावं लागेल ते करताना माझ्या हातुन कुठलीही लहानशी सुद्धा चुक, पाप घडु देऊ नकोस, देवा..नाहीतर त्या मलीन झालेल्या तन-मनाने शेवटी तुझ्या दारात, मंदिरात तरी कसा येऊ रे?
मित्रहो, आपले गदिमा आणि बाबुजींची ही कलाकृती हृदयात जपुन ठेवावी अशीच....
त्याच जोडीला रमेश देव आणि सीमा देव यांचा नुसत्या चेहरा आणि डोळ्यांचा सुरेख अभिनय...बाजुला असलेले विवेकानंदाची मुर्ती आणि साईबाबांचा फोटो हे ह्या गीताला साजेसं साधं वातावरण...
एकंदरीत मित्रहो, भट्टी जमली. ही भट्टी शेवटी सहजतेनं आणि कुठलाही भपकेबाज नसलेली आहे त्यामुळे त्याला मरण नाही....
===============================================================