Thursday, December 22, 2011

उस्ताद सुलतान खाँ


उस्ताद सुलतान खाँ या थोर सारंगीवादकाच्या निधनाने संगीत जगताची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. सद्य:स्थितीत भारतात मोजकेच सारंगीवादक आहेत. सीकर घराण्याचे उ.सुलतान खाँ हे एक मातबर सारंगीवादक होते.सारंगी हे वाद्य व सारंगीवादक आज दुर्मीळ होत चालले आहेत. भारतात मोजकीच सारंगीवादकांची घराणी आहेत. alt उदा. किराणा घराणे, आमचे झज्जर घराणे, सीकर घराणे. उ. सुलतान खाँ यांनी सारंगीवादनाचे शिक्षण त्यांचे पिताजी व सीकर घराण्याचे सारंगिये उ. गुलाब खाँ यांच्याकडून घेतले. सारंगीवादनाची अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ऐन विशीतच त्यांनी गायकांची साथसंगत सुरू केली. अल्पावधीतच त्यांना नावलौकिक मिळाला. त्यानंतर त्यांनी आकाशवाणी राजकोट केंद्रावर स्टाफ कलाकार म्हणून काम केले. मुंबईला ते गुलाब मुस्तफा खाँ, शोभा गुर्टू यांची साथ करण्यासाठी अधूनमधून येत असत. ते जेव्हा मुंबईत असत, तेव्हा माझे मोठे बंधू शाब्बीर हुसेन खाँ यांच्याकडेच त्यांचा मुक्काम असे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी शोभा गुर्टूबरोबरची साथसंगत ऐकून त्यांना मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १९७० च्या आसपास ते मुंबई आकाशवाणी केंद्रावर काम करू लागले.
उ. सुलतान खाँ यांच्या सारंगीवादनाचा पुण्यातील पहिला कार्यक्रम १९६४ साली माझ्या बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने झाला. त्यासाठी ते मुद्दाम राजकोटहून आले होते. या कार्यक्रमाला बालगंधर्व उपस्थित होते. सुलतान खाँ यांचे सारंगीवादन ऐकून बालगंधर्वानी त्यांना ५ रु. बक्षीस दिले. ते बक्षीस जपून ठेवले असल्याचा उल्लेख त्यांनी अगदी अलीकडे पुण्यात झालेल्या कार्यक्रमात केला होता.
माझे वडील उ. महंमद हुसेन खाँ म्हणत असत, की सारंगीवादकाला शास्त्रीय संगीताचे शिक्षण आवश्यक आहे. उस्ताद सुलतान खाँ यांनाही ती उत्तम तालीम मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्या सारंगीवादनाचे बलपेच, गमक व छूटच्या ताना हे वैशिष्टय़ होते. सारंगीवादन करताना डाव्या हातातील जोरकसपणा ही त्यांना मिळालेली ईश्वरदत्त देणगी होती. याबद्दल किराणा घराण्याचे महान सारंगीवादक पद्मश्री उ. शकूर खाँ यांनी प्रशंसोद्गार काढले होते.
मुंबईच्या सिने जगतात त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला. जवळजवळ सर्व मोठय़ा संगीत दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले. ‘उमराव जान’ या सिनेमात ‘दिल चिज क्या है’ या गाण्यात त्यांनी वाजवलेली तान कायम स्मरणात राहील. त्यांनी केवळ साथसंगतच केली नाही तर आपल्या गायनानेही रसिकांना मोहीत केले. ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये गायिलेले ‘अलबेला साजन’ व ‘पिया बसंती’ हे त्यांच्या अल्बममधील गाणे अत्यंत लोकप्रिय झाले.
खाँसाहेब सारंगीची जुगलबंदी ही एक वेगळीच खासियत होती. एस. एस. गोपालकृष्णन यांच्याबरोबर त्यांनी केलेली जुगलबंदी माझ्या अजूनही स्मरणात आहे. लंडनमध्ये त्यांनी उस्ताद रईस खाँ यांच्याबरोबर केलेल्या जुगलबंदीचे ध्वनिमुद्रण इतके अप्रतिम आहे, की जुगलबंदीमधील नजाकत, एकमेकांना समजावून घेत आणि प्रोत्साहन देत केलेले त्यांचे वादन स्मरणीय झाले आहे. स्वभावत: अतिशय मृदू असलेल्या खाँसाहेबांच्या सहवासात कुणीही आले, तरी त्याला त्यांच्या कुटुंबाचाच भाग होण्याची संधी मिळत असे. मनापासून प्रेम करणारा हा एक अतिशय सर्जनशील कलावंत होता. पुण्यात डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायनाला साथ करण्यासाठी खाँसाहेबांना मुद्दाम पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पु. ल. देशपांडे म्हणाले की, भारतात सारंगीवादकांची संख्या हाताच्या बोटांवर आहे. त्यातले एक बोट तर सुलतान खाँसाहेबांनीच हस्तगत केले आहे.
खाँसाहेबांनी भारतातल्या जवळजवळ सर्व मोठय़ा गायकांची साथ केली. सुगम संगीतात प्रख्यात गायिका बेगम अख्तर, शोभा गुर्टू यांच्यासारख्या ख्यातनाम गायिकांचीही समर्थपणे संगत केली. सर्व कलाकारांना त्यांची सारंगीची साथ हवीहवीशी वाटे. सारंगीवादक जर हरहुन्नरी असेल, तर त्याच्या साथीत गायकाचे गाणे एक वेगळेच वातावरण निर्माण करते. त्यांच्या साथीचे उदाहरणच द्यायचे झाले, तर श्रीमती परवीन सुलताना यांनी गायिलेला राग किरवानी, परवीनजींची जागान् जागा सुलतान खाँ यांनी जशीच्या तशी वाजवली आहे. तसेच श्रीमती किशोरी आमोणकर यांनी गायिलेला राग कौशी कानडा. बाईंनी या रागात गाठलेली अत्युच्य पातळी व तितक्याच तोलामोलाची असलेली सुलतान खाँसाहेबांची सारंगीची साथ श्रोते कधीही विसरू शकणार नाहीत.
फैयाज हुसेन खाँ

Thursday, September 8, 2011

जयपूर-अत्रोली गानपरंपरेतील गायक उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्ताने.. भारतीय शास्त्रीय संगीताचे खास वैशिष्टय़ असे की, भारतीय संगीतात ‘गायक’, ‘गवैया’ आणि ‘वृंदवादन दिग्दर्शक’ असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी ज्याच्याजवळ बंदिशींचा आणि रागांचा विपुल प्रमाणात संग्रह आहे, तो केवळ प्रगल्भ शिष्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्याला नायक म्हणून संबोधले जाते. याचाच चांगला उपयोग करून घेत जो शिष्यांना गाणेही शिकवितो तो ‘गायक’, तर ‘गवैया’ हा मैफलीचा कलाकार. उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) हे दुसऱ्या प्रकारचे विद्वत्ता असलेले असे व्यक्तिमत्त्व होते. उस्ताद भुर्जी खाँ साहेबांचे सुपुत्र आणि संगीत सम्राट खाँ साहेब अल्लादियाँ खाँ यांचे नातू असलेले बाबा, जयपूर-अत्रोली घराण्याच्या गौरवशाली परंपरेतून, रक्ताच्या नात्यामधून आजच्या आघाडीच्या कलाकारांना मुक्त हस्ते दुर्मिळ रागातील बंदिशी शिकविण्यापासून, ‘घराण्याचे खलिफा’ या उपाधीपर्यंत जाऊन पोहोचले होते. बाबांचा जन्म ७ फेब्रुवारी १९२१ रोजी राजस्थानमधील उनियारा येथे झाला. अगदी लहान वयातच बाबांना अल्लादियाँ खाँ साहेबांचे बंधू हैदर खाँ यांनी एकतारीवर स्वरसाधना करायला लावली. १९३० नंतर वडील भुर्जी खाँ यांनी आपल्या तरुण मुलाला आपल्या पंखाखाली घेतले. बाबांची शैक्षणिक प्रगतीही त्याचवेळी सुरू होती. १९३६ मध्ये आजोबा अल्लादियाँ खाँ साहेबांनी बाबांना मुंबईत वास्तव्यासाठी बोलावून घेतले. या वर्षांपासून ते खाँ साहेबांच्या निर्वाणापर्यंत म्हणजे १९४६ पर्यंत बाबांना खाँ साहेबांचा सहवास, तालीम, अप्रचलित रागांचे आणि बंदिशींचे भांडार संपादन करण्याचे भाग्य लाभले. बाबांना चुलते नसिरूद्दीन खाँ (बडेजी) यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळाले. त्यांना विविध रागातील अनेक बंदिशी अवगत होत्या. alt‘तोडी’, ‘भैरव’, ‘बिलावल’, ‘गौरी’, ‘श्री’, ‘कल्याण’,‘केदार’, ‘नट’, ‘कानडा’, ‘बहार’, ‘मल्हार’ यांचे अनेक प्रकार व बंदिशी याची बाबांना तालीम मिळाली होती. ‘सुनवंती’, ‘लाजवंती’, ‘विराट’, ‘मेघावली’,‘बिलावली’, ‘हिंडोली’ अशी अनवट दुर्मिळ रागरत्ने केवळ बाबांच्याच खजिन्यात होती.
वैद्यकीय कारणास्तव बाबा मैफलीत गाऊ शकले नाहीत, तरी बाबांनी आपल्याजवळ असलेले हे स्वरसंचित अनेकांना देण्यात धन्यता मानली. पं.मल्लिकार्जुन मन्सूर, पं.वामनराव सडोलीकर, पं.आनंदराव लिमये, पंडिता धोंडुताई कुलकर्णी, पं.मधुसूदन कानेटकर, पं.जितेंद्र अभिषेकी, श्रुती सडोलीकर-काटकर, श्रअरुण कुलकर्णी, पं.पंचाक्षरी मत्तीकट्टी या साऱ्यांचे गुरू होते बाबा. ही शिष्यमंडळी अखेपर्यंत बाबांकडे हक्काने येत व अलोप अनवट रागातील बंदिशी चिजा त्यांच्याकडून घेत. एक गुरू म्हणून बाबा अमरच राहणार आहेत. कारण इतक्या शिष्यांकडून प्रसृत झालेली जयपूर गायकी अमरच आहे. केवळ गुरू म्हणूनच नव्हे, तर एरवीही बाबांच्या वागण्या-बोलण्यात एक मर्यादाशील सभ्यता होती. कलाकार कितीही छोटा असला तरी त्या कलाकाराचे गाणे शेवटपर्यंत थांबून ऐकत व त्याला प्रोत्साहन देत. त्यामुळे बाबांची मैफलीतली उपस्थिती ही एक आदरयुक्त शान असे. गायन समाज देवल क्लबवर तर बाबांचे अलोट प्रेम होते. १२५ वर्षांच्या देवल क्लबच्या अंगा-खांद्यावर वाढल्याची त्यांची भावना होती. प्रकृती साथ देत नसतानाही गेल्याच महिन्यामध्ये संस्थेच्या रंगमंदिराच्या उद्घाटनासाठी केवळ बाबा याच भावनेने उपस्थित होते. बाबांनी खाँ साहेबांकडून वारसा हक्काने विद्याधन तर मिळविलेच; पण खाँ साहेबांच्या शेवटच्या तीन वर्षांत त्यांना एकांत मिळाला तेव्हा खाँ साहेबांकडून त्यांच्या जीवनातही अनेक घटना, पूर्वजांविषयी माहिती, त्यांचे पराक्रम या संबंधीची माहिती मिळविली आणि खाँ साहेबांच्याच शब्दांत ती लिहून ठेवली. या माहितीचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये mylife या नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झाला आहे. अशा बाबांच्या जाण्याने अल्लादियाँ खाँ साहेबांच्या जयपूर-अत्रोली गान परंपरेतील शेवटचा शिलेदार, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, गेली जवळपास ५० वर्षे ज्ञानदान करणारं एक गुरुछत्र काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, ४ सप्टेंबर २०११ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, August 1, 2011

उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर


अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणजे ध्रुपद गायकी. इथल्या मातीचा गंध असणारी आणि इथल्या निसर्गात आणि संस्कृतीत विकास पावलेली ही गायकी गेली अनेक शतके आपले अस्तित्व टिकवून आहे, कारण त्यामध्ये नव्याने भर टाकणारे अनेक प्रतिभाशाली कलावंत दर काही काळाने निर्माण होत गेले. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर हे अशाच अतिशय सर्जनशील कलावंतांपैकी एक होते. त्यांच्या निधनाने ध्रुपदाचा घुमारा मंदावला आहे. माणसाला संगीताचा शोध लागल्यानंतर त्याने त्यातील शैलीसातत्यासाठी ज्या अनेक कल्पना योजल्या त्यातील काही योजना छंद, प्रबंध, ध्रुव आणि मत्त या चार प्रकारांमध्ये निबद्ध केल्या. त्या कल्पनांचा विलास करता करता त्यातून चार शैली विकसित पावल्या. त्या शैलीतून बाहेर आल्या त्या ‘बानी’ (म्हणजे वाणी) खंडर बानी, नौहर बानी, गौहर बानी आणि डागर बानी. ही वाणी स्वरात भिजवत ठेवून मुरवत मुरवत तिला अत्युत्तम अशा रसपूर्ण करण्याकरिता गेल्या शेकडो वर्षांत ज्या अनेक अज्ञात कलावंतांनी योगदान दिले, त्यामध्ये डागर बानीचे महत्त्व फार मोठे आहे. ज्ञात इतिहास मियाँ तानसेनापर्यंत पोहोचतो. म्हणजेच मुसलमानांच्या भारतावरील आक्रमणापर्यंत. त्याहीपूर्वी ध्रुपद गायनशैली विकास पावत होती. या डागर घराण्याने गेल्या २८ पिढय़ा ही गायनशैली घरातील पुढच्या पिढीपर्यंत नेऊन ठेवली आहे. एका अर्थाने भारतीय संस्कृतीवर त्यांनी केलेले हे उपकार परत न फेडता येण्याएवढे मोठे आहेत. फहिमुद्दीन डागर यांनी ध्रुपद शैलीचा प्रसार करण्यासाठी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. उत्तम आलापी आणि त्यातून होणारे अप्रतिम असे रागदर्शन असे त्यांचे गाणे होते. नव्या पिढीला या शैलीतील बारकावे समजावून सांगत त्यांना त्याची गोडी लावणे हा फहिमुद्दीन खाँसाहेबांचा आवडता विषय होता. ‘स्पीक मॅके’ या अभिजात संगीताच्या प्रसारासाठी सुरू झालेल्या चळवळीचे खाँसाहेब संस्थापकच होते. पद्मभूषण, मैहर फौंडेशन पुरस्कार, कालिदास सन्मान, उस्ताद हफीज अली खाँ पुरस्कार, नाद पुरस्कार हे त्यांच्या स्वरदर्शनाचे लौकिक पुरावे. परंतु खाँसाहेबांनी आयुष्यभर डागर बानी विकसित करण्याचे ध्येय ठेवले आणि ध्रुपद शैली संग्रहालयात जाऊन स्थिरावण्यापासून वाचवले. स्वत: संस्कृतचे उत्तम जाणकार असल्यामुळे या शैलीचा इतिहास आणि परंपरा यांचे त्यांना चांगले भान होते. संगीतात केवळ विद्वान असून चालत नाही. ही विद्वत्ता प्रत्यक्ष मैफलीत दिसणे फार अगत्याचे असते. अशा मोजक्या कलावंतांपैकी फहिमुद्दीन खाँ हे एक होते. स्वरांशी लडिवाळपणे खेळत त्यातील प्रत्येक बारीकसारीक तपशिलाची सौंदर्यपूर्ण उलगड करत ते ज्या रीतीने रागमांडणी करत, ती ऐकताना श्रोता हरखून जात असे. नवनिर्मितीच्या ध्यासातून ध्रुपदातून ख्यालाचा जन्म झाला. पण भारतातील डागर यांच्या घराण्याने ध्रुपद शैलीत राहूनच नवनिर्मितीचे आव्हान पेलले, हे अधिक महत्त्वाचे आहे. उस्ताद रहीम फहिमुद्दीन डागर यांच्या निधनाने हे आव्हान समर्थपणे पेलणारा एक थोर संगीतकार हरपला आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, १ ऑगस्ट २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Friday, June 17, 2011

आज परत आमच्या विठ्ठलाचं दर्शन झालं...

आज परत विठ्ठलाचं दर्शन झालं....

आज परत आमच्या विठ्ठलाचं दर्शन झालं आणि जणु सारा आसमंत समोर फेर धरुन डोलायला आणि नाचायला लागला..आणि डोळ्यात पाणी उभं राहिलं....काय त्या विठ्ठलाचे भाव आणि त्याची रसाळ वाणी...अक्षरशः त्याचा एक एक शब्द नी सुर हॄदयात कोरुन ठेवावा असा. मोठ्या मोठ्या संत महंत, थोर पुरुषांना मानणारा आणि त्यांच्यावर असीम श्रद्धा ठेवणारा आणि त्यांच्या प्रती असलेली ती श्रद्धा आपल्या भावातुन आणि सुरातुन उलगडुन दाखवणारा हा आमचा विठ्ठल..कुठे ठेवायचे ह्या विठ्ठलाचे उपकार आणि त्यांची ती सुरांची पुरचूंडी कशी नी कुठे ठेवायची हे ठरवणार? कुठे गेली ही माणसं..??

ह्या विद्वजनांच्या पायाशी बसुन गाणं शिकावं, त्यांनी आपला कान पकडुन गाणं शिकवावं अशी माणसं कुठं मिळणार..कधी मिळणार ती सैनत..??

Wednesday, April 27, 2011

माधव गुडी

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित माधव गुडी यांचे अकाली निधन होणे ही संगीताच्या आणि विशेषत: किराणा घराण्याच्या दृष्टीने दु:खकारक घटना आहे. ‘कर्नाटक भीमसेन’ म्हणून माधव गुडी यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर असलेली त्यांची भक्ती हा भारतीय संगीत संस्कृतीमधील एक आदर्श म्हणावा असा अध्याय आहे. जगात फक्त भारतीय संगीतातच नवनवोन्मेषी प्रतिभेला प्रत्यक्ष सादरीकरणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कला सादर करत असताना जे सुचते, ते तिथेच व्यक्त करण्याची मुभा कोणत्याही कलावंतासाठी आव्हानात्मक असते. आपली प्रतिभा सतत जागती ठेवणे आणि तिला सतत वृद्धिंगत करणे हे भारतीय संगीतातील प्रत्येक कलावंताचे कर्तव्यच समजले जाते. त्यामुळेच या कलेच्या प्रांतात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. माधवराव गुडी यांनी आपल्या गुरुच्या चरणी आपले सारे सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे त्यांना संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. सततचे दौरे आणि मैफली यामुळे मैफली गवयांना शिष्य तयार करण्यास वेळ मिळत नाही. समोर बसवून तालीम घेण्याएवढी फुरसत मिळत नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या सहवासातून मिळवावे लागते. गुडी यांनी भीमसेनजींचे शिष्यत्व पत्करल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. माधव गुडी यांनी भीमसेनी शैलीचा नीट अभ्यास करून ती आत्मसात केली आणि आपल्या गायकीवर भीमसेनी मोहोर उमटविण्यात यश मिळवले. भीमसेनजींनीच ‘शिष्योत्तम’ अशी पदवी देऊन माधवरावांचे कौतुक केले होते. सरळ मनाचा आणि सतत स्वरात डुंबलेला हा कलावंत आयुष्यभर अजातशत्रू राहिला. भारतीय संगीतात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा संगीताच्या दोन समांतर परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांना देदीप्यमान असा इतिहास आहे. कर्नाटकात राहून तेथील कर्नाटक संगीत शैलीचे अनुकरण न करता उत्तर हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याची शैली आत्मसात करण्याच्या माधव गुडी यांच्या प्रयत्नांना सवाई गंधर्व, गंगुबाई हनगळ आणि भीमसेन जोशी यांची परंपरा होती. वडील कीर्तनकार असल्याने माधव गुडी यांच्यावर स्वरांचा संस्कार लहानपणीच झाला. भीमसेनजींकडे गायन शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीतील सारे बारकावे सूक्ष्मतेने टिपले आणि आपल्या गळ्यात उतरवले. पंडितजींबरोबर सारा देश हिंडणाऱ्या शिष्यांमध्ये माधवराव अग्रेसर होते. कर्नाटक कला तिलक, गायन कला तिलक, गानभास्कर, अमृता प्रशस्ती, संगीत साधक, संगीत रत्न, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे अनेक पुरस्कार माधव गुडी यांना मिळाले. भारतातील अनेक संगीत परिषदांमधून त्यांचे सतत गायन झाले. अलीकडच्या काळात गळा रुसला असला, तरीही माधवरावांनी आपली संगीत साधना सुरूच ठेवली होती. भीमसेनजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य श्रीकांत देशपांडे आणि आता माधव गुडी यांच्या निधनाने किराणा घराणे शोकाकुल होणे स्वाभाविकच आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, २५ एप्रिल २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, March 21, 2011

मारवा


मी वसंताचा पेटीवाला. अनेक वर्षे साथ केली आहे. असंख्य मैफली आठवतात. नागपूरला रात्रभर गाणे झाले. सकाळी बाबूरावजी देशमुखांकडे चहा घेऊन अकराची गाडी गाठायची म्हणून गेलो. गाडीला दोन तास अवकाश होता म्हणून तंबोरे जुळवले, संध्याकाळी सहा वाजता मैफली संपली. तोडीने सुरू झालेली मैफल पुरिया धनाश्रीने संपली. तोपर्यंत नागपूरची गाडी मुंबईअच्या अर्ध्या वाटेवर पोहोचली होती. पार्ल्याला तर आम़च्या आणि आमच्या स्नेह्यांच्या घरी वसंताच्या अनेक बैठकी झाल्या. वातावरण गार झाले. वसंत बापट, नंदा नारळकर, माझे बंधू, शरू रेडकर अशी वसंताला आज अनेक वर्षे गवई मानणारी मित्र मंडळी होती. पुन्हा गवसणीतले तंबोरे निघाले आणि तीन वाजता भटियारा सुरु झाला. मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग! हा राग वसंता अति आत्मीयतेने गातो. एक जागा पुन्हा नाही असली अचाट विवीध. गझल गायला तर बेगम अखतर सलाम करुन दाद देतात. थिरखवासाहेब 'गवय्या' मानतात. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, त्याच्या गुणावर लुब्ध. विद्याहरणातली अभिजात गायकीवर रचलेली गाणी एखाद्या नवख्या विद्द्या्र्थींची नम्रतेने स्वत: ज्योत्स्नाबाई भोळे शिकतात. चंपुताईंच्या घरची मैफल वसंताशिवाय सजत नाही. इतकेच कशाला पण आमच्या सारख्यांच्या आग्रहामुळे त्याने गांधर्व महाविद्यालयाची संगीतातली सर्वोच्च पदवी मिळवली. वसंता आता डॉ. देशपांडे आहे. पण आकाशवाणीला त्याचे हे खानदानी संगीतातले स्थान मान्य नाही.
वसंत देशपांड्याचा आकाशवाणी वर अभिजात संगीत गाणारा कलावंत होण्याचा प्रश्न बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नासारखा कधीपासून लोंबतो आहे. ज्या अधिकार्‍यांनी तो सोडवायचा त्यांनी कोणाच्या भीतीने तो डावलला आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांच्या गल्लीत ताल नाही आणि मोहल्ल्यांत सूर नाही असे गायक-गायिका आकाशवाणीवर नित्य नियमाने राग-रागिण्या नासत बसलेल्या असतात आणि वसंतराव देशपांड्यांना मात्र तिथे स्थान नाही. ह्याचे मला वाटते एकच मुख्य कारण की वसंताला घराण्याचा टिळा नाही. वसंताचे दुर्दैव हे की की तान गळ्यात यायला बर्‍याच लोकांना तास तास घासत बसावे लागते ती वसंताला क्षणात येते. स्वर टिपण्याच्या बाबतीतली त्याची धारणा किती अलौकिक आहे ह्याची साक्ष महाराष्ट्रातले सगळे म्युझिक डायरेक्टर्स देऊ शकतील. अनवट राग असो, लावणी असो, वसंतराव ब्लॉटिंग-पेपरसारखी सुरावट टिपतात. वसंताचा एकच मोठा दोष की संगीतात हिंदूही नाही यवनही नाही. 'न मी के पंथाचा' म्हणणार्‍या केशवसूतांसारख्या सूरांच्या साकल्याच्या प्रदेशातला हा पांथस्थ आहे. कारकुनाच्या मर्यादशीतलेने घरगिरस्ती चालवणारा वसंता दोन तंबोर्‍यांच्या मध्ये मात्र स्वत:च्या खयाले चालवणारा आहे. तिथे त्याची कलंदरी दिसते. समोरच्या श्रोत्यांवर प्रेम जमले की गंमत म्हणून वसंता नकला करील. नाना गमती करील, पण तिथेही ह्या विदुषकीमागे दडलेली विद्वत्ता लपत नाही.

Wednesday, February 23, 2011

एकवार पंखावरुनी...बाबुजी..

आज परत तो दिवस उगवला..आणि माझ्या आठवणींमधली एक एक गाणी मनात रुंजी घालू लागली...एवढ्यातच अण्णांच आपलं पृथ्वीतलावरचं घरटं देहरुपानं सोडुन गेले तेव्हा मनात दुखा:शिवाय काहीही नव्हतच, त्यातच माझं अत्यंत आवडतं गाण समोर आलं नी माझे ढसाढसा अश्रु ओघळु लागले...

केवढा तो अर्थ. गदिमांचा परिसस्पर्श झालेलं हे गाणं आणि बाबुजींचा टिपेला पोहोचलेला स्वर...क्या केहने..

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात |
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ||

काय म्हणतो बघा हा कवी....देवा, एकदा तरी तुझा मायेचा हा हात माझ्या पाठीवरुन फिरु दे..
मला माहीत आहे की माझं शेवटचं घरटं हे तुझ्याच अंगणात असणार आहे... ह्या रुपकाला काय दाद द्यायची..?

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो|
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात ||

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही |
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात ||

कवी म्हणतो..देवा संपुर्ण जग फिरलो...कितीतरी प्राणी,पक्षी मित्र केले पण शेवटी काळजात तुझ्याशिवाय कुणीच नव्हते. सगळीकडे तुझीच सोबत होती. कितीतरी ऊनपावसाचे खेळ पाहिले आणि झेलले तरी तुझा सहवास सिटला नाही..देवा आतातरी जवळ घे..

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी |
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत ||

ह्यापुढे कवी काय म्हणतो बघा...जेव्हा सर्वांग सुंदर मोर पिसांचा पसार करुन वनात तुझ्यासमोर नाचतो तेव्हा त्या भाग्यवंतांना सुद्धा तुझा सहवास लाभला आहे....देवा आता मला कधी रे तुझा सहवास मिळणार?

शेवटच्या आर्त ओळीतर गदिमांच्या प्रतिभेचा अत्युच्च बिंदुच म्हणला पाहिजे...

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ? |
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात ||

ते म्हणतात, ह्या अथांग आणि असीम जगात जेव्हा फक्त सगळ्यांना सुंदर, सुस्वरुप, उत्तम वाणी आणि हुशार लोक जवळ हवे असतात तेव्हा तिथे माझ्यासारखा दुर्बळ तुझ्या नजरेस पडेल का रे? कारण, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काम करावं लागेल ते करताना माझ्या हातुन कुठलीही लहानशी सुद्धा चुक, पाप घडु देऊ नकोस, देवा..नाहीतर त्या मलीन झालेल्या तन-मनाने शेवटी तुझ्या दारात, मंदिरात तरी कसा येऊ रे?

मित्रहो, आपले गदिमा आणि बाबुजींची ही कलाकृती हृदयात जपुन ठेवावी अशीच....

त्याच जोडीला रमेश देव आणि सीमा देव यांचा नुसत्या चेहरा आणि डोळ्यांचा सुरेख अभिनय...बाजुला असलेले विवेकानंदाची मुर्ती आणि साईबाबांचा फोटो हे ह्या गीताला साजेसं साधं वातावरण...

एकंदरीत मित्रहो, भट्टी जमली. ही भट्टी शेवटी सहजतेनं आणि कुठलाही भपकेबाज नसलेली आहे त्यामुळे त्याला मरण नाही....
===============================================================

Friday, February 18, 2011

पंडित भीमसेन जोशीं


‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’
शास्त्रीय संगीतातले गायक आणि फिल्मी दुनियेतले पाश्र्वगायक यांच्यात जेव्हा चित्रपटासाठी जुगलबंदी होते तेव्हा बाजी मारणारे मोहम्मद रफी आणि मन्ना डे असतात आणि मात खाणारे अमीरखॉं किंवा भीमसेन जोशी असतात, असं गमतीनं म्हटलं जातं. कारण काय असेल ते असो, पण पडद्यावरच्या नायकाला (वा नायिकेला) ज्याचा आवाज असतो तोच गायक (वा गायिका) जिंकणार हा जणू अलिखित नियम असावा. म्हणून तर ‘केतकी गुलाब जूही’ (बसंत बहार) या गाण्यात पंडित भीमसेन जोशींना मन्ना डेसमोर हार पत्करावी लागते, ‘बाट चलत नयी चुनरी रंग डारी’ (रानी रूपमती) या भैरवीमध्ये कृष्णराव चोणकरांना मोहम्मद रफीसमोर पराभूत व्हावं लागतं आणि ‘तिनक तिन तानी .. दो दिन कीजिंदगानी’ (सरगम) या लता मंगेशकरांसोबतच्या गाण्यात सरस्वती राणे यांना ‘विनोदी गायिके’ची भूमिका स्वीकारावी लागते. असो. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांच्यात अढी निर्माण व्हायला हे असले प्रकार कारणीभूत ठरले असावेत. ‘बैजू बावरा’मधल्या जुगलबंदीसाठी एके काळी नौशाद यांना नकार देणाऱ्या बडे गुलामअली खॉँ यांनी पुढे ‘मुगल-ए-आझम’साठीही किती आढेवेढे घेतले आणि मग पाश्र्वगायनाला तयार होताना आपली किंमत कशी वसूल करून घेतली, त्याचे किस्से सर्वश्रुत आहेत. चित्रपटांतल्या गाण्याविषयी कोणताही आकस न ठेवता वा स्वत:चा बडेजाव न मिरवता पूर्णपणे समर्पित होऊन गायन करणारे दोन गायक जुन्या पिढीत होऊन गेले. पहिले उस्ताद अमीर खॉँ आणि दुसरे पंडित भीमसेन जोशी.
‘बसंत बहार’ (१९५६) हा चित्रपट शंकर जयकिशन या जोडीला मिळाला तेव्हा त्यांच्यासमोर नौशाद यांच्या ‘बैजू बावरा’चं आव्हान होतं. ‘बैजू बावरा’ मध्ये तानसेन आणि बैजनाथ यांच्यातल्या ‘आज गावत मन मेरो’ या जुगलबंदीसाठी उस्ताद अमीर खॉँ आणि डी. व्ही. पलुस्कर यांनी पाश्र्वगायन केलं होतं. ‘बसंत बहार’साठी तशीच एक जुगलबंदी करण्याची वेळ आली तेव्हा शंकर जयकिशन यांनी शास्त्रीय संगीतात नव्यानंच तळपू लागलेल्या भीमसेन जोशींना पाचारण केलं आणि त्यांचा मुकाबला ठेवला तो मन्ना डे यांच्याशी. भीमसेन जोशी यांनीच ऐकवलेल्या एका जुन्या बंदिशीवरून शंकर यांनी या गाण्याची चाल बनवली. त्यावर शैलेंद्र यांनी लिहिलेले शब्द होते-
केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
ॠतु बसंत अपनो कंत गोरी गरवा लगाए
झूलना में बैठ आज पी के संग झूले..
भीमसेन यांच्यापेक्षा दोन वर्षांनी ज्येष्ठ असूनही हे गाणं गायच्या नुसत्या कल्पनेनंच मन्ना डे यांची कशी घाबरगुंडी उडाली आणि भीमसेनना ‘हरवायचं’ आव्हान मन्ना डे यांनी कसं पेललं ते सर्वश्रुत असल्यानं पुनरावृत्ती नको. मात्र, आवर्जून सांगायला हवं ते भीमसेन जोशी यांच्या दिलदार वृत्तीबद्दल. आपला आवाज नायकावर नव्हे तर एक खलपात्रावर चित्रित होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हरावं लागणार आहे, ही बाब भीमसेन यांनी कोणत्याही तक्रारीविना मान्य केली. एवढंच नव्हे, तर रेकॉर्डिग झाल्यावर मन्ना डे यांना ‘तुमची तयारी चांगली आहे, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात का येत नाही,’ अशा शब्दांत दादही दिली.
‘बसंत बहार’ नंतर भीमसेनजींचा स्वर हिंदी चित्रपटांत पुन्हा एकदा जोरकसपणे उमटला तो अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ (१९८४) मध्ये. यातली दोन भजनं गाण्यासाठी भीमसेन यांना कसं बोलावण्यात आलं, याविषयी पालेकर यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या चित्रपटाची नायिका मानसिकदृष्टय़ा रोगी असते आणि तिचे वडील शास्त्रीय संगीतातले फार मोठे गायक असतात. अनिल चटर्जी साकारत असलेल्या या भूमिकेसाठी दोन भजनं करावीत असं अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात ठरलं. ही भजनं कोणा गायकाकडून गाऊन घ्यावीत यावर खल सुरू असताना जयदेव म्हणाले, ‘‘या व्यक्तिरेखेचा विचार करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा.’’
भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा तर मग भीमसेनच का नकोत? झालं, पालेकरांनी जयदेवजींची अनुमती घेऊन थेट पंडितजींना फोन लावला. ‘पंडितजी, एका कामासाठी भेटायला यायचंय. कधी येऊ?’ सुदैवानं पंडितजींचा अमोल पालेकरांवर विलक्षण लोभ होता. ‘‘तुम्हाला भेटायला परवानगी कशाला हवी? असं करू, उद्या मी दौऱ्यावर जाणार आहे. मुंबईला विमानतळावरच थोडा वेळ भेटू या,’’ पंडितजी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी विमानतळावरच्या पार्किंगमध्ये पालेकरांच्या मोटारीत या दोघांची भेट झाली. ‘एक सिनेमा करतोय ‘अनकही’ नावाचा. तुम्ही त्यासाठी दोन भजन गावीत एवढीच विनंती आहे..’ पालेकरांनी विषयाला हात घातला. कथा, व्यक्तिरेखा ऐकून घेतल्यानंतर पंडितजींनी विचारलं, ‘म्युझिक कोण देतंय?’ पालेकरांनी ‘जयदेव’ असं सांगताच कानाच्या पाळीला हात लावत पंडितजी उद्गारले, ‘फार मोठा संगीतकार आहे. मी जरूर गाईन. फक्त माझी एक अट आहे. जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं. माझी नीट तालीम त्यांनी करून घ्यावी.’
पालेकरांनी या भेटीचा वृत्तान्त सांगितला तेव्हा जयदेवजींच्या डोळ्यांत पाणीच तरारलं. तेही तयारीला लागले. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ आणि ‘ठुमक ठुमक पग’ ही दोन भजनं भीमसेन यांच्यासाठी त्यांनी बनवली. गाण्यांची तालीम पालेकर यांच्याच घरी झाली. ‘मी तुमचा नवखा शिष्य आहे, असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा न जागा मला समजावून सांगा,’ असं पंडितजींनी जयदेवजींना निक्षून सांगितलं. जवळजवळ दोन तास तालीम चालली.
प्रत्यक्ष रेकॉर्डिगच्या दिवशी भीमसेनजी ठरल्या वेळी स्टुडिओमध्ये आले. ‘अनकही’साठीच आशा भोसले यांच्या आवाजातल्या एका गाण्याचं रेकॉर्डिग नुकतंच संपलं होतं. त्या दोघांची समोरासमोर भेट झाली तेव्हा आशाताईंनी पंडितजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सुरू झाली भीमसेन यांच्या रेकॉर्डिगची तयारी. ‘मी उभा राहून गाऊ शकत नाही, बसूनच गाईन’ असं त्यांनी सांगितल्यानं स्टुडिओमध्ये त्यांच्यासाठी तशी बैठक तयार करण्यात आली. वादक मंडळींमध्ये शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), झरीन दारूवाला (सरोद) अशा नामवंतांचा समावेश होता. वादक आणि गायक या सर्वाचं एकत्रिपणे रेकॉर्डिग करण्याचा तो काळ होता. पंडितजींनी दोन्ही भजनं तन्मयतेनं गायली. रेकॉर्डिग संपल्यानंतर भीमसेनजी म्हणाले,‘‘तुमच्या मनासारखं झालं ना गाणं? नाही तर पुन्हा एकदा करू.’’ जयदेवजी आणि पालेकर यावर काय बोलणार? दोघेही भारावून जाण्यापलीकडच्या अवस्थेत होते.
‘अनकही’ला त्या वर्षीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एक जयदेव यांना, तर दुसरा अर्थातच भीमसेनजींना. अभिनंदनाचा स्वीकार करताना पंडितजी पालेकर यांना म्हणाले,‘‘खूप छान वाटलं या गाण्यामुळे. एक वेगळं पारितोषक तुम्ही मला मिळवून दिलंत.’’
===============================================================
सदर लेख बुधवार, रविवार ३० जानेवारी २०११ च्या लोकसत्ताच्या 'लोकरंग' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

केसरबाई-१०

मी त्यांचे शेवटले गाणे 1966 साली ऐकले. त्यांचीही मला वाटते ही शेवटलीच जाहीर मैफिल . तो प्रंसगही एक पर्व संपल्याचे सुचवणाराच होता . पेडर रोडवर श्री. भाऊसाहेब आपट्यांचा प्रासादतुल्य बंगला होता. आपट्यांच्या मुलीवर माईंचा खूप जीव. क्रिकेटर माधव आपटेची ही बहीण. ह्या आपट्यांच्या बंगल्याच्या जागी आता अनेक दुमजी ` वुडलँड्रस अपार्टमेंट ' उभे राहणार होते. मूळ वास्तूला कृतज्ञतेने निरोप देण्याचाच जणू काय तो प्रसंग होता.
जुन्या मुंबईतील एक जुनी वास्तु दिवसा - दोन दिसृवसांत दृष्टीआड होणार होती. पुरातन असूनही सतेज राहिलेला तो वृध्द प्रासाद आणि वार्धक्यातही सुरांची तेजस्विता न गमावलेली ही वृद्धगानसम्राज्ञी. वाड्याला वास्तुपुरूष असतात अशी जुन्या लोकांची एक श्रध्दा आहे . त्या वाड्याच्या वास्तुपुरूषालाही असल्या तपःपूत सुरांनी बांधलेली आपली उत्तरपूजा आवडली असेल . त्या गाण्याला मुंबईतल्या नामवंत गायक - गायिकांप्रमाणे , सत्येनभाईसारख्या केसरबाईंची गाणी ऐकण्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्या रसिकापासून अनेक आमंत्रित रसिकांची हजेरी होती. शिवाय अनेक अनाहूत. त्या प्रशस्त हॉलमध्ये , जिन्यात, खालच्या अंगणात ही गर्दी . कुणीतरी आणून मायक्रोफोन ठेवला.
" हा उचला आधी. "" बाईंनी हुकूम दिला . त्यांना टेपरेकॉर्डिंगची शंका आली होती.
" माझं गाणं ऐकायचं असेल तर माझं गाणं ऐकण्याचे कायदे पाळून ऐका." हे त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आयुष्यभर सांगितले होते . त्यांची त्या सांगतील ती बिदागी देऊन गाणी करणारेही `माझ्या गाण्याला अमकेतमके दिसता कामा नयेत. ' ही त्यांची अटदेखील मान्य करीत असत असे म्हणतात. खरेखोटे देव जाणे. पण केसरबाईंनी संगीतात असे काही विलक्षण स्थान मिळवले होते की , माझ्या गाण्याला सर्व पुरूषांनी डोक्याला टोपी किंवा पगडी घालूनच आले पाहिजे अशी अट त्यांनी घातली असती तरीही ती मान्य झाली असती . हे का होऊ शकले याला माझ्यापाशी उत्तर नाही . सगळ्याच गोष्टींना तर्कसंगती लावून उत्तरे सापडत नसतात . मायक्रोफोनचा प्रकार त्यांतलाच .
" मायक्रोफोन असू द्या. खाली गर्दी आहे . ऐकू जाणार नाही."
" ऐकू जाणार नाही ? खाली काय बाजार भरलाय ? माझं गाणं कुठपर्यंत ऐकू जातं ते मला बरोबर ठाऊक आहे. हा मायक्रोफोन माझा आवाज खातो. उचला. "
रात्री एक वाजेपर्यंत गाणे झाले. माणसे त्या सुरांना खिळून बसली होती . वार्धक्याचा त्या गळ्याला आणि सुरांना जरा कुठे स्पर्श झाला नव्हता. आवर्तना - आवर्तनाला प्रदक्षिणा घालून येणारी तशीच अखंड तान. श्रीपाद नागेशकर तबल्याला होते . मधूनच एक सुरेल तुकडा लावायची त्यांनी हिंमत केली. जागच्या जागी मी घाबरलो होतो. पण तानेच्या योग्य अंदाजाने आलेल्या त्या तुकड्यानंतर त्यांनी श्रीपादाकडे कौतुकाने पाहिले त्यात श्रीपादाला आपण शिकलेल्या विद्येचे चीज झाल्यासारखे वाटले असेल . त्या मेफिलीत केसरबाईंना पुष्पहार देण्याचा मान मला मिळाला.
"हा . कर तुझं भाषण. "" केसरबाईंनी तेवढ्यात मला चिमटा काढला . त्या दिवशी केसरबाईंच्या गाण्यातल्या त्या वाहत्या प्रकाशमान धवलतेला उद्देशून मी म्हणालो होतो की, " अल्लादियाखांसाहेबांना बॅरिस्टर जयकरांनी. भारतीय संगीताचे
गौरीशंकर म्हटलं होतं. संगीतातल्या त्या गौरीशंकराच्या कृपेने आम्हांला लाभलेल्या सुरांच्या धवलगंगेत आमची मनं न्हाऊन निघाली. - तेव्हा पहिलं वंदन अल्लादियाखांसाहेबांना आणि दुसरं केसरबाईंना."

गणेशचतृर्थीच्या दिवशी केसरबाई गेल्या. 13 जुले 1893 साली गोव्यातल्या केरी नावाच्या सुदंर खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. गोव्याच्या मातीने भारतीय संगीताला अर्पण केलेल्या देण्यांतले हे फार मोठया मोलाचे देणे. ज्या मुबंईनगरीला त्यांच्या सुरांचे स्नान घडले होते त्या मुंबईतल्या दादरच्या समुद्रतीरावर त्यांच्या पार्थिव देहावर ऋषिपंचमीच्या दिवशी अग्निसंस्कार झाला. भारतीय संगीतातल्या ऋषींचे ऋण आजन्म संगीतव्रती फेडणाऱ्या केसरबाईसारख्या गानतपस्विनीचा ऋषींच्या मालिकेतच कृतज्ञतेने अंतर्भाव करायला हवा.
त्यांच्या निधनाची वार्ता रात्री आठच्या सुमाराला मुंबईहून त्यांच्या नातवाने मला फोनवरून सांगितली. सात - सव्वासाताच्या सुमाराला त्या अलौकिक दमश्वासातला शेवटला श्वास टाकून इथली मेफिल केसरबाईंनी संपवली होती. माझा चेहरा उतरलेला पाहून मला भेटायला आलेला माझा एक मित्र म्हणाला, " काय झालं ? "
मनात म्हणालो : " एका तेजःपुजं स्वराचा अस्त. "
त्याला सांगितलं, " केसरबाई गेल्या."

केसरबाई-७

मला एक कथा आठवली : भर दरबारात राजाच्या एका लाडक्या कवीने कविता म्हटली त्यातल्या एका ओळीत ` शीतं बाधते ' ऐवची ` बाधति ' असे त्याने म्हटले . दरबारातल्या एका वेय्याकरण्याला राजाने विचारले , "" कविता कशी वाटली ? " कवी राजाचा लाडका आहे हे ठाऊक असूनही व्याकरणशास्त्री म्हणाले ` बाधति बाधते . ' त्या कवितेत आत्मनेपदी क्रियापदाला परस्मेपदी प्रत्यय लावल्याचे त्या व्याकरणशास्त्रांना बाधले होते . त्यांची भाषाविषयक तालीमच निराळी . आपल्या मताने राजा रागवेल याची भीती त्यांना नव्हती .
असली माणसे लौकिकार्थाने गोड , मनमिळाऊ राहूच शकत नाहीत . आपल्यालाला इष्ट वाटेल ते साधण्यासाठी कलेत मानला गेलेला एखादा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात एक मिजास असतेही . पण अज्ञानामुळे नियम मोडणे निराळे , आणि कलेच्या सौंदर्यात मी भर घालीन ह्या आत्मविश्वासाने नियम मोडणे निराळे . खुद्द अल्लादियाखांसाहेबांच्या तरूणपणात ध्रुपदियांचा एवढा मोठा दबदबा असताना , त्यांनी , ज्याला विद्वान अंतःपुरातले गाणे म्हणून नाके मुरडीत अशा ख्यालगायकीचाही दबदबा निर्माण केलाच की . याचे कारण त्यांना ध्रुपदाचे सामर्थ्य आणि ध्रुपदाच्या मर्यादा ह्या दोन्हींचे पक्के ज्ञान होते . आंधळेपणाने नियम पाळण्याला कोणीच किंमत देत नसतात . केसरबाईच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता .
अशाच एका कुठल्याशा संस्थानिकाच्या दरबारात संगीतोत्सव होता . केसरबाईना संस्थानिकांनी नाटकातले पद म्हणायची फर्माइश केली . केसरबाईंनी त्या महाराजांना सांगितले , " थांबा , आपल्याला नाटकातलं पद कसं म्हणतात ते ऐकायचं आहे ? इथे
कृष्णामास्तर आले आहेत . ते म्हणतील . माझ्या गळ्याला त्या गाण्याची तालीमनाही. " त्या काळी काही संस्थानांत लग्नसमारंभांत ठिकठिकाणच्या गुणीजनांची गाणीबजावणी असायची. मेहेरबानीचा स्वीकार करायचे. " एकदा सकाळी माझ्या खोलीत हे बदामपिस्ते - मिठाईचं ताट आलं . मी म्हटलं , हे कुणी सांगितलं होतं ? तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे आणायची नाहीत . " केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे , बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही ? ' असे कोणी विचारीत नाही .
काळ बदलला आहे , अभिरूची बदलली आहे , हे काय त्यांना कळत नव्हते ? त्यांच्या घरातली नातवंडे ` विविध भारती ' वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद मानीत . केसरबाईंची ऐकमेव कन्या सुमन आणि तिचे यजमान दोघेही डॉक्टर आहेत . मुले आधुनिक जमान्यातली आहेत . एकदा आम्ही बसलो असताना आत मुलांनी सिनेमातली गाणी लावून धुमाकूळ घातला होता .
" ऐक. " हसत हसत माई म्हणाल्या , " दिवसरात्र डोकं उठवतात. "
" माई , तुम्हांला नाही मजा वाटत ? "
" अरे , त्यांच्याएवढी आज मी असते तर मीही हेच केलं असतं . त्यांना ऐकू नका म्हटलं तर काय माझं ऐकणार आहेत ? रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं ? "
पुतळ्याचे काम पुरे झाले आणि आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दहाबारा दिवस संपले . त्यानंतर कानी यायच्या त्या माईच्या वाढत्या आजाराच्याच बातम्या . याच सुमाराला मीही मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झालो . त्यांना भेटून आलेले लोक सांगायचे , माईकडे पाहवत नाही . अंथरूणाला खिळून आहेत . वर्षा - दीडवर्षांनंतर शर्वरी पुतळा घेऊन त्यांच्या घरी गेला . प्लॅस्टरमधला तो अर्धपुतळा त्याने केसरबाईमा अर्पण केला . त्या वेळी त्या बिछान्यावरच होत्या . शर्वरीला त्या अवस्थेत म्हणाल्या, " शर्वरी , जेवायला थांबायला पाहिजे . तू आज येणार म्हणून डाळीच्या वरणात घालायला कारली आमली आहेच . "दीड - दोन वर्षांपूर्वी मी सहज म्हणालो होतो की कारली घातलेले डाळीचे वरण आणि भात हे ह्या शर्वरीचे जेवण . चहा नाही ,
कॉफी नाही , विडीकाडी काही नाही . शरपंजरी पडलेल्या माईंनी आईच्या मायेने शर्वरीचे कारली घातलेले वरण लक्षात ठेवले होते . दूरदूर गेलेले सूर पाहत बसलेल्या गानसम्राज्ञीचा तो पुतळा . शर्वरीची ओळख करून दिली त्या दिवशी माईंनी विचारले होते , "तुझे गुरू कोण ? "
शर्वरीने आपल्या शिल्पकलेतल्या गुरूचे नाव सांगतानादेखील हात जोडले होते . हा गुरूपंरपरा असलेला , खानदान असलेला शिल्पकार आहे याची खात्री पटल्यावरच माई पोज द्यायला तयार झाल्या होत्या.

केसरबाई-६

असल्या सहज चालणाऱ्या गप्पांतून त्यांची संगीताविषयीची मते कळायची . अभिजात संगीताच्या सहजसाध्येवर , सुलभीकरणावर त्यांची अजिबात श्रध्दा नव्हती . विद्यालये - बिद्यालये सब झूट . गाणारा जाऊ दे , ऐकणाऱ्यालाही ह्या कलांचा आस्वाद , जाता जाता , सहजपणाने घेता येईल हे त्यांना मान्य नव्हते . निदिध्यासाचा , नित्य अभ्यासाचा , चांगल्या गुरूकडून कठोरपणाने होणाऱ्या चिकित्सेचा ज्ञानमार्गच त्यांना मान्य होता . एक ज्ञानी गुरू आणि ` रियाझाचे घंटे ' किती झाले ते न मोजणारे दोन किंवा तीन गुणी हुशार शिष्य एवढेच गाण्याचे शिक्षण असेच झाले पाहिजे . त्यांच्या बोलण्यात ` बुध्दी पाहिजे ' हे बऱ्याच वेळा आलेले मी ऐकले होते . मेफिलीत उडत उडत कानी येणाऱ्या चिजा ऐकून गाणाऱ्यांचा त्यांना तिटकारा होता . परंपरेच्या आग्रहामागे कलावंताने आपल्या मनाला लावून घेण्याचा शिस्तीचा आग्रह होता . आणि शिस्त कुठली आणि आंधळे अनुकरण कुठले ह्यांतला फरक कळण्याइतकी तीक्ष्ण बुध्दी त्यांना होती . त्यांच्यापूर्वीच्या पंरतु एका निराळ्या घराण्याच्या प्रख्यात गायिकेच्या
गाण्याविषयी मत देताना म्हणाल्या, " तिचा आवाज मोकळा होता , सुरीली होती , पण ख्यालाचे पाढे म्हणत होती. " उगीचच सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणून ` आपपल्या जागी सगळेच चांगले ' वगेरे गुळगुळीत बोलणे नसे . अप्रियतेची त्यांना खंत नव्हती . त्यांच्या मतांमुळे त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात कटुता उत्पन्न व्हायची . पण त्यांच्या विलक्षण दृष्टीचा प्रत्यय यायचा . गुण सांगताना पटकन वेगुण्याकडेही लक्ष वेधायच्या . "" बडे गुलामअली चांगला गायचा . मूळचा सारंगिया . असेना का , पण गवई झाला. "

अजिबात दोष न काढता जर पेकींच्या पेकी मार्क कुणाला त्यांनी दिले असतील तर ते भास्करबुवा बखल्यांना. थोरले खांसाहेब तालीम द्यायला येताना कधीकधी भास्करबुवांना सोबत घेऊन यायचे . एखादी पेचदार तान कशी निघाली पाहिजे ते बुवांकडून गाऊन घेऊन दाखवायचे . मी विचारले, " माई , भास्करबुवांचं मोठेपण कशात होतं , असं तुम्हांला वायतं ? "
" अरे , काय सांगू तुला ? भास्करबुवा त्यांचं जे गाणं होतं तेच गायचे , पण मैफलीतल्या प्रत्येकाला वाटायचं की बुवा फक्त माझ्यासाठी गातायत. असा आपलेपणा वाटायला लावणारा गवई पाहायला मिळणार नाही . . . मोठा माणूस , मोठा माणूस . . . . "
माईंचे ते ` फेड आउट ' होत गेल्यासारखे मोठा माणूस . . . मोठा माणूस ' हे श्बद आजही माझ्या कानांत आहेत. केसरबाईंची मान आदराने लवली नाही असे नाही, पण `साहेबी पाहोनि नमस्कारानें ' ह्या समर्थवचनाला अनुसरून लवली . ` साहेबी ' म्हणजे देवत्व .
एकदा गुरूमुखातून मिळणाऱ्या विद्येबद्दल बोलत होतो . मी म्हणालो, " आता टेपरेकॉर्डर निघाले आहेत . टेपवर , समजा , अस्ताई - अंतरे बरोब्बर रेकॉर्ड केले तर त्यावरून तालीम घेता येणार नाही का . ? "
" नाही . "" माईंचे उत्तर ठाम होते .
" का नाही ? "" मी विचारले . त्यावर त्या काही बोलल्या नाहीत . मला वाटले , विषय संपला .
पण तो प्रश्न माईंच्या मनात घोळत होता . काही वेळ इतर गोष्टी झाल्या आणि त्या एकदम मला म्हणाल्या, " हे बघ , टेपरेकॉर्डरवरून चीज ऐकल्यावर ती गळ्यावर बरोबर चढली की नाही हे काय तो टेपरेकॉर्डर सांगणार ? "
" आपण पुन्हा रेकॉर्ड करावी आणि तुलना करून पाहावी . "
"अरे , आपलंच गाणं परक्यासारखं ऐकता आलं असतं तर काय पायजे होतं ? रेडिओवर आता टेपरेकॉर्डरच वाजवतात ना ? स्वतःचं गाणं स्वतः बसून ऐकतात . सुधारतात ?
तुझ्यासारखे त्यांचे दोस्तही कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाहीत . कशाला उगाच वाईटपणा घ्या ? . . . काय ? "
" बरोबर. "
"म्हणून डोळ्यांत तेल घालून शागिर्दाचं गाणं पाहणारा, चुकला तर त्याचा कान पिळणारा गुरू लागतो . अरे, आठ - आठ दिवस तान घासली तरी खांसाहेबांच्या तोंडावरची सुरकुती हलायची नाही. वाटायचं, देवा, नको हे गाणं . . . "
शिकवणी टिकवायला शिष्येचीच नव्हे तर तिच्या आईबापांचीही तारीफ करणारे अनेक गुरू माझ्या डोळ्यांपुढून तरळून गेले . शिष्यांना वाट दाखवण्याऐवजी त्यांची वाट लावणारे गुरू काय कामाचे ?
" माझी शिस्त परवडत असेल तर शिकवीन " म्हणणारे गुरू आमच्या विश्वविद्यालयात राहिले नाहीत तिथे गायनमास्तरांना काय दोष द्यायचा !
आणि मग तालमीशिवाय, बंदिशीतली दमखम गळ्यावर नीट चढवल्याशिवाय एक चीज गाणाऱ्या एका गायिकेची त्यांनी मला गोष्ट सांगितली . " कलकत्त्याला लालाबाबूंची कान्फरन्स होती . ह्या बाईंचं गाणं सुरू झालं . उगीच कान खराब करायला जाऊन बसायची मला सवय नव्हती . तसाच कोणी फेय्याझखांबिय्याझखांसारखा असला तर मी जायची . मजा करायचा फैय्याझखां. लालाबाबूंनी आग्रह केला होता म्हणून गेले होते . बाईंनी ` रसिया होना ' सुरू केलं .
आता ती काय त्यांच्या घराण्याची चीज नाही . तिला तालीम कशी मिळणार ? आणि मग , `अरे रसिया, हे रसिया, ओ रसिया - ' सुरू झालं . माझ्या शेजारी चंपू . मी म्हटलं , `ऊठ , जाऊ या.' ती भित्री . ती म्हणते, `माई , बरं दिसत नाही.' मी उठले आणि हालच्या बाहेर आले .
लालाबाबू धावत आले मागून . मला म्हणतात , `केसरबाईजी, कहॉचली आप ? ' मी म्हणाले
`ओ बाईजीका रसिया किधर खो गया हे - ओ रसिया , अरे रसिया करके चिल्लाती हे , सुना नहीं ? उसका रसिया धुंडनेको जा रही हूँ . - ' "

केसरबाई-५

कित्येकदा वाटते की , तरूण केसरबाईंचा अपमान करणाऱ्या त्या गायिकेचे उपकार मानले पाहिजेत . हे सारे कष्ट त्या अपमानाच्या वेदनेपेक्षा हलके असावेत . पण नाही , हे अर्धसत्य झाले . केसबाई त्या गायकीत संपूर्णपणाने रमल्या होत्या . केवळ कुणाला तरी पराभूत करण्याची जिद्द एवढेच प्रयोजन आता उरले नव्हते . ती गायकी गाणे म्हणजेच जगणे असा त्यांच्या जीवनाचा अर्थ झाला होता . किंबहुना त्याच ते गाणे होऊन गेल्या होत्या . त्या गाण्यात उदात्ताविषयीची जी ओढ होती , क्षुद्र तडजोडींचा जो तिटकारा होता तोही त्यांच्या स्वभावाशी जुळून आला होता . हा अहंकार नव्हे . जी गायकी त्यांनी शिकायला घेतली , जी आत्मसात करण्यासाठी जीव मारून मेहनत केली , तिची महात्मता त्यांना पटली होती . ती पटल्यावर ` ब्रम्हज्ञान नव्हे लेकुरांच्या गोष्टी ' म्हणणाऱ्या तुकारामात जसा आपल्याला अहंकार दिसत नाही तसा त्यांच्यातही दिसणार नाही . हे आत्मविश्वासाचे वागणे . आपल्या जीवनहेतूपुढे इतर साऱ्या गोष्टींना गौण मानणाऱ्या उत्तम कलावंतालाच जी लाभते अशी एक विलक्षण निर्भयता
त्यांनी लाभली होती .
राजेरजवाड्यांच्या मिजाशी सांभाळण्याच्या काळात त्यांची गायनाची कारकीर्द चालली होती . पण केसरबाईंना ` अमुक गा ' म्हणून फर्माइश करण्याची तत्कालीन संस्थानिकांची हिंमत नव्हती . कुणालाही नुसतेच खूष करण्यासाठी त्या गायल्या नाहीत . त्यांचे कलावंत म्हणून जे मोठेपण आहे ते गायनाचा व्यवसाय असूनही ` गिऱ्हाइकांचा संतोष हेच आमचे समाधान ' हे सूत्र न मानण्यात . मनाला जे मान्य असेल तेच गाईन ही त्यांची प्रतिज्ञा . मान्यतेचा त्याखेरीज स्वीकारलेला एकमेव शिक्का म्हणजे आपले गुरू अल्लादियाखांसाहेब यांचा .
मी एकदा त्यांना सहज म्हणालो , " माई , तुम्ही अमुक अमुक राग गाताना मी कधी ऐकला नाही. "

असेच आणखी एकदा म्हणालो , " तुमच्या काळात नाटकांतली गाणी इतकी पॉप्युलर होती. तुम्ही का नाही कधी गायलात ? "

नाटकांतली पदं नाटकांत म्हणायची . त्यांचे ख्याल कशाला करायला हवेत ? एक काय ते नक्की ठरवा."

त्यांची सगळीच मते मला पटायची नाहीत . पण ती मते अशा मजेत सांगायच्या की त्यांतल्या अचूकपणापेक्षा त्या सांगण्याचीच मजा अधिक वाटायची . एक गोष्ट खरी ; ` गाणे ' ह्याखेरीज त्यांना दुसरा कसालाही ध्यास नव्हता . घराण्याविषयी माझी मते निराळी असायची. मग त्या माझी हजेरी घेतल्याच्या सुरात बोलत असत.एकदा अशाच त्या ` पोज ' घेऊन बसल्या होत्या . त्यांच्या गाण्याची टेप चालू होती .
शांतपणे आम्ही ऐकत होतो . गाणे संपले . " आणखी खूप गाणं टेप करून ठेवायची इच्छा होती . राहून गेलं. "

काही वेळाने माझ्या पत्नीने विचारले, " माई , हा राग कुठला हो ?"

" तुझ्या नवऱ्याला विचार . तो स्वतःला गाण्यातला शहाणा समजतो ना ? "

वास्तविक मी स्वतःला गाण्यातला शहाणा वगेरे काही समजत नाही . अनवट रागांशी मी कधी लगट केली नाही . चांदनी केदार , जलधर केदार , मलुहा केदार , - ह्यांच्याखात्यांवर कुठले सूर मांडले आहेत आणि कुठले खोडले आहेत यांचे हिशेब मी तपासले नाहीत . एखादा राग सुरू झाल्यावर त्याचे नाव मला नाही कळले तरी त्याच्या आस्वादात काही फरक पडत नाही . मात्र त्या रागाचे चलन ध्यानात आल्यावर त्या लायनीवरून गवई कसा चालतो हे मी बारकाईने पाहतो . तो आनंद घेताना त्या रागाचे नाव कळले नाही तर दातात सुपारी अडकल्यासारखा काही लोकांना त्रास होतो , तसा मला होत नाही . तरीही केसबाईंनी मला छेडल्यावर मी म्हणालो, " भूपनाट का ? "
" ही याची अक्कल . ह्याला भूपनाट आणि शुध्दनाटातला फरककळेनासा झालाय. "
" हल्ली मला भूप आणि शुध्द कल्याणातलासुध्दा फरक कळेनासा झालाय. "
" ऐकून ऐकून गाणं शिका , म्हणजे असंच होणार. "
" पण तुम्ही तरी मेफिलीत रागांची नावं सांगितलीत कधी ? "
" अरे , हा शुध्दनाट . ऐक . . . "" म्हणून शरीराच्या तसल्या त्या अवस्थेत त्यांनी शुध्दनाट आणि भूपनाट ह्यांच्यातला फरक समाजवून देण्यासाठी ` आ ' कार लावला . पुन्हा एकदा त्याच जुन्या तेजाने तळपणारा . तीनचारच मिनिटे गायल्या असतील . पण ते गुणगुणणे नव्हते . अनमोल जडजवाहिर दाखवणारा जवहिऱ्या ज्या दक्षतेने पेटी उघडून जवाहीर दाखवतो , अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो आणि तितक्याच दक्षतेने ती मिटून ठेवतो तसे त्यांनी ते दोन राग उघडून दाखवले , पुन्हा मिटून घेतले . या क्षणी माझी पुन्हा पाटी कोरीच आहे ; आटवतात ती तीनचार झगमगीत मिनिटे .
" स्वर लावताना आता चक्कर येते रे मला . "
त्यावरून मी सहज त्यांना कुठल्या पट्टीत गात असत हे विचारले.
" पट्टी ? तुला पेटीवाल्याला काळजी , मला नाही. तीन सप्तकांत सहज जाईल ती षड्रजाची पट्टी. "

केसरबाई-४


अशाच आठवणी सांगताना त्यांनी मला सहज विचारले, " तू माझं गाणं पहिल्यांदा कुठे ऐकलंस ? मी काय कधी गणपतिउत्सवात नाय गायले . " आमची मुख्य श्रवणसाधना कुठे झाली त्याचा माईना बरोबर पत्ता कोणी दिला देव जाणे.
" मुझफराबाद हॉलात . एका लग्नात . "
" मुंबेकर शेणव्याचं लग्न असणार . त्या हालची तुला काय गोष्ट सांगू ," म्हणत त्यांनी गोष्ट सांगितली . माई गोष्ट सांगायला लागल्या की शर्वरी त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक पाह्यचा .
त्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून म्हणायचा ,
" पुलदा , की शुंदर , की शुंदर ! "
" ह्या वेड्याला माझ्या चेहऱ्यात सुंदर काय दिसतं रे - तो फोटो पहा ." माईंच्या तरूणपणीचा एक फोटो तिथे भिंतीवर होता .
" ए , तसला पुतळा कर . म्हातारी करशील तर याद राख . " पुतळ्यासाठी पोज द्यायला बसतानासुध्दा मेफिलीचा थाट करून बसायच्या .
" चालवून घ्या . भागवून घ्या . "" ही भाषा मेफिलीतच नव्हे तर रोजच्या दिनचर्येतही चालू शकत नव्हती .
" ती मुझफराबाद हॉलची गोष्ट सांगा ना , " मी म्हटले .

माई तरूण होत्या त्या काळची ही गोष्ट . वझेबुवा , बर्कतुल्ला - कदाचित भास्कर - बुवांचीही - तालीम मिळाली होती . ही मुलगी पुढेमागे निश्चित नाव काढील असा लौकिक
होऊ लागला होता . ह्याच सुमाराला मुझफराबाद हॉलमध्ये या काळातल्या एका प्रख्यात गायिकेचे गाणे होते . ते गाणे खाजगी होते . ते ऐकायला केसरबाई गेल्या असताना कुणीतरी
सुरूवातीला त्यांनी गावे म्हणून आग्रह केला . केसरबाईंनी नम्रपणाने सांगितले की एवढ्या मोठ्या गायिकेच्या मेफिलीत मला गायला लावू नका. मी मूल आहे तिच्यापुढे. शेवटी खूप
आग्रह झाला. आणि सुरूवातीला केसरबाई गायल्या . तरूण वय , समोर ऐकणारी मंडळी मातबर , त्यात ती गायिका , तिचे चाहते . . . मनावर विलक्षण दडपण आलेले . तरीही "मला
त्या काळात जे येत होतं ते गायले . लोकांनीही कौतुक केलं . माझ्यामागून त्या बाईचं गाणं . मी उठल्यावर सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याने त्या बाई म्हणाल्या , ` थोडा वेळ थांबा
इथे लागलेले सगळे बे - सूर हॉलच्या बाहेर जाऊ द्या . मग मी गाते . ' "
केसरबाईंनी ती रात्र रडून काढली . आणि त्या दिवशी ठरवले की ` एक दिवस अशी गाईन की ती बाई झाली होती की नाही याची कुणाला आठवण राहणार नाही . ' अल्लादियाखांसाहेब
हे त्या काळी संगीताच्या दुनियेतील प्रातःस्मरणीय नाव होते . भास्करबुवांसारखे प्रतिभासंपन्न गायक त्यांच्यापुढे नतमस्तक होत . खांसाहेब त्या काळी छत्रपती श्रीशाहूमहाराजांच्या
दरबारात कोल्हापूला . त्यांना मुंबईला येऊन राहणे शक्य नव्हते . पण शिकेन तर अल्लादियाखांसाहेबांपाशीच अशी जिद्द धरून केसरबाई बसल्या . आपल्या प्रथम पत्नीच्याच
मानाने केसरबाईंना वागवणाऱ्या गोपाळदासांनीही त्यांच्या ह्या प्रतिज्ञेमागली जिद्द ओळखली . मनात सापत्नभाव न बाळगता , कालिदासाच्या शब्दांत , ` प्रियसखी वृत्ती ' ने वागणाऱ्या गोपाळ - दासांच्या पत्नीनेही साथ दिली . केसरबाईंनी कोल्हापूरच्या छत्रपती श्रीशाहूमहाराजांचे बंधू कागलकरसरकार यांची भेट घेतली . कागलकरसरकार गाण्याचे खूप चाहते . त्यांनी त्या तरूण गायिकेला शाहूमहाराजांच्या पायांवर घातले.
धिप्पाड मनाचा तो राजा म्हणाला, "तुला काय हवं आहे ते सांग."
" मला तुमच्या दरबाराचे गायक अल्लादियाखांसाहेब गुरू म्हणून हवे आहेत."
महाराजांनी ` तथास्तु ' म्हणून अल्लादियाखांसाहेबांना केसरबाईंना गाणे शिकवायला मुंबईत जाऊन राहण्याची परवानगी दिली . दरबारी नोकरीचा अडसर काढून टाकला .
मूळच्या हिऱ्याला असे पेलू पाडलेल्या स्वरूपात भारतीय संगीताच्या दुनियेला केसरबाई लाभल्या , त्यामागे उत्तमम गुणांची तितकीच उत्तम पारख असलेल्या छत्रपती शाहूमहाराजांचा
वरदहस्त होता .
आणि इथून पुढे , केसरबाईच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे , "माझा वनवास सुरू झाला .
पदरी तान्ही मुलगी , गळ्यात पूर्वीच्या गायनाचे संस्कार , मुळातला आवाज बारीक . पहिले आठनऊ महिने नुसता आवाज खोलायची मेहनत. अरे, घसा फुटायचा. तरीही मेहनतथांबता कामा नये. बरं, खांसाहेबांना मुंबईची हवा मानवली नाही की सांगलीला जाऊन राहायचं . तिथल्या सांभारे वेद्यांवर त्यांची श्रध्दा होती . मग मुलीला घेऊन मी सांगलीला बिऱ्हाड करायची . हाताखाली मदतीला कोण असलं तर असायचं, नसलं तर नसायचं. हवा मानवायची नाही . तरीही तालमीत खंड नाही. "
एक तर ह्या अत्रौली घराण्याचा गायकीचा आवाकाच मोठा . ह्या गायकीच्या वाटेला जाणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा . छातीचा भाता लोहाराच्या भात्यासारखा हवा . पुरे
आवर्तन - तेही संथ लयीचेच - ते न तुटलेल्या सुरांनी भरत भरत समेवर यायचे . तेही धापा टाकत नव्हे . निघताना ज्या उत्साहाने निघायचे त्याच उत्साहाने परतीचा मुक्काम गाठायचा .
इथे कुसरीला किंवा कल्पनेच्या वावड्या उडवायला वावच नाही . स्वरलीलेची प्रत्येक क्रिया शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून - तपासून घेतलेली . नसता लाडिकपणा केली की ते विजोडच
दिसायचे . असली ही गायकी आणि ती शिकवणारा महान पण असमाधानी गुरू . नुसता शिकवणीचा रतीब घालणारा नव्हे . स्वतः मेहनतीचे पहाड फोडलेला . ध्रुपदगायकीची सुंदर
वेशिष्ट्ये ख्यालात खलून ख्यालगायकीचे नवीन रयायन करणारा तोही महान कलावंत. चक्रव्यूह मांडल्यासारखे ते भारतीय संगीतातल्याचक्राकार गतीचे सतत भान ठेवून चालणारे
गाणे . आलाप असो वा तान , गतीची पध्दत चक्राकार . सुरांची जाडी गिरणीतल्या सुताच्या नंबरासारखी . ज्या नंबराचे माप घेऊन निघायचे तो तिन्ही सप्तकांत कसा कायम ठेवावा लागायचा ते केसरबाईंच्या गाण्यातून दिसायचे . मऊपणातही कुठे पोकळ फुसकेपणाला वाव नाही . गाण्यात कुठे फोफसेपणा नाही की किरटे चिरचिरेपण नाही . आक्रमकतेच्या नावाखाली आक्रस्ताळेपणा नाही की थिल्लर विभ्रम नाही . लयकारीच्या नावाखाली हापटाहापटी नाही . लयकारीतले धक्केसुध्दा कसे लाटांच्या हेलकाव्यांसारखे , टक्करल्यासारखे नव्हते . आणि सारे काही आखीवरेखीव असूनही अभिजाततेचल्या त्या चिरंतन ताजेपणाने दीप्तिमान , ग्रीक शिल्पासारखे . - ही सारी वेशिष्ट्ये आत्मसात करण्याची केसरबाईंची साधना किती कठोर असेल याची क्लपनाही करणे कठीण आहे .

केसरबाई-३


मैफिलीत फोटोग्राफर आला तर त्याला गावाबाहेर घालवा म्हणायला कमी न करणाऱ्या माईंना तुम्ही माझ्या शिल्पकार मित्रासाठी ` पुतळ्यासाठी रोज पोज देऊन बसा ' म्हणायचे
म्हणजे माझ्या धैर्याची कसोटीच होती . पण त्यापूर्वी अशाच स्वरूपाच्या धाडसी कृत्यांत माझा वाटा होता . हिराबाई बडोदेकरांची पार्ल्याला म्युझिक सर्कलतर्फे टिळक मंदिराच्या पटांगणात
एकसष्टी साजरी करायची ठरली असताना केसरबाईंना अध्यक्ष करायचे ठरवले होते . त्याच्या बंगल्याचे तीन मजले चढून जाताना रामरक्षा पाठ नसल्याचे मला दुःख झाले होते आणि
केसरबाईनी मात्र आश्चर्याचा धक्काच दिला होता .

" अरे , मी चंपूला धीर देऊन कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये गायला लावली होती . भयंकर भित्री होती . मी समारंभाला येते . पण ती भाषणंबिषणं तू कर . तो फाजीलपणा तुला चांगला
जमतो . मी नुसती येईन . चंपूच्या पाठीवरून हात फिरवून आशीर्वाद देईन . "

डोळे दिपवून टाकणाऱ्या त्या तेजस्वी पण टणक हिऱ्याच्या आत असला , ज्याला कोकणीत ' मायेस्तपणा ' म्हणतात तो त्या दिवशी मला दिसला, . साठी उलटलेल्या हिराबाई बडोदेकर
केसरबाईच्या लेखी . कॉन्फरन्सेस मध्ये आणि राजेरजवाड्यांच्या घरच्या आणि दरबारच्या उत्सवप्रसंगी केसरबाई , हिराबाई आणि फैय्याझखाँसाहेब असा संगीताचा त्रिवेणी
संगम झालाच पाहिजे अशी परिस्थिती होती . हिराबाईंच्या सत्काराला केसरबाई आल्या . त्यांच्या हस्ते हिराबाईंना वाढदिवसाची भेट दिली . हजारो लोकांपुढे हिराबाईनी माईच्या
पायांवर आपले मस्तक ठेवले आणि माईनी चंपूला पोटाशी घट्ट धरून मिठी मारली . मैफिलीतल्या मंचावर स्वतःचा आब एवढासासुध्दा बिघडू न देणाऱ्या केसरबाईचे ते दर्शन .
एका सर्वस्वी निराळ्या घराण्याची गायकी गाणाऱ्या हिराबाईंविषयी वाटणारी आपुलकी त्या मिठीतून जशी सिध्द झाली तशी हजार शब्दांनी व्यक्त झाली नसती . इतके प्रभावी अध्यक्षीय
मूक वक्तव्य त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही मी ऐकले नाही . भारतीय संगीतातल्या गंगायमुनांचा संगम पाहिला असेच सर्वांना वाटले .

मुंबई विद्यापीठाच्या संगीत - विभागाचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले . म्हणजे अक्षरशः हस्ते . पुन्ही एकदा केसरबाईना विनंती करण्याचे काम माझ्याकडे आले . रीतसर मी
त्यांचे रागावणे सहन केले. " मी भाषण करणार नाही , सांगून ठेवते . " ही अट मान्य केली .
रवींद्रनाथांसाठी 1938 सालच्या एप्रिल महिन्यात केसबाई गायल्या होत्या . गुरूदेव त्या वेळी सत्याहत्तर वर्षांचे . माई पंचेचाळीस वर्षांच्या . ते गाणे ऐकून रवींद्रनाथांनी लिहिले होते :
" हे गाणे म्हणजे अप्रतिम परिपूर्णतेचा एक कलात्मक चमत्कार आहे . केसरबाईंचे गाणे ऐकण्याची संधी मला साधता आली हे मी माझे भाग्य समजतो . त्यांच्या आवाजातली जादू ,

विविध प्रकारच्या ( मॉड्यूलेशन्स ) संगीतातली वेशिष्ट्ये दाखवणे , आणि तेही केवळ तंत्राला शरण जाऊन नव्हे किंवा यांत्रिक अचूकपणाने किंवा पढिकतेच्या प्रदर्शनाने
नव्हे , संगीतातला हा चमत्कार प्रकट करणे जन्मजात प्रज्ञावंतांनाच ( जिनियस ) शक्य असते हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द करून दाखवले आहे . आज संध्याकाळी ह्या अनमोल अनुभूतीची
संधी मला दिल्याबद्दल केसबाईंना माझे धन्यवाद आणि आशीर्वाद . " ` सूरश्री ' ही पदवी त्यांना रवींद्रनाथांकडूनच मिळाली होती .

ज्याचे सारे व्यक्तिमत्व सुरांनी भरलेले असा महाकवी श्रोता आणि तपःपूत सुरांनी अंतर्बाह्य प्रज्वलित झालेली अशी ही महान कलावती गायिका . प्राचीन काळातील पुराणकार
म्हणाले असते की , त्या समयी स्वर्गातून देवांनी पुष्पवृष्टी केली . " अरे , चित्रासारखे बसून गाणं ऐकत होते . "" माई म्हणाल्या . रवींद्रनाथांच्याच अदृश्य बोटाला धरून मी पुतळ्याचा विषय काढला .
" माझा म्हातारीचा पुतळा ? तुला चेष्टा करायला सापडले नाय आज कोण ?
" मनाने मोकळ्या झाल्या की माई कोकणीतून बोलायच्या . ` बटाट्याटी चाळ , ' ` वाऱ्यावरची वरात ' वगेरे माझ्या लीला त्यांनी पाहिलेल्या असल्यामिळे त्यांच्या लेखी ` वात्रटपणा ' हाच माझा
स्थायिभाव होता .
" चेष्टा नाही माई . तुम्ही एकदा संधी द्या माझ्या मित्राला . तुमचा परमभक्त आहे . युरोप - अमेरिकेत नाव झालेले शिल्पकार आहे . स्वभावाने लहान मुलासारखा आहे ."
"" काय नाव म्हणालास ? "
" शर्वरी . "
" हे कसलं नाव मुलीसारखं ? "
" आता ते नाव काय मी ठेवलं . ? पण अश्राप माणूस - आणि उत्तम आर्टिस्ट . मग ? "
" अरे मला फार वेळ बसवत नाय रे . "
" तुमच्या तब्येतीला सांभाळून बसू या . "
" पण माझी अट आहे सांगते . तो पुतळा होईपर्यंत तू रोज येऊन बसायला हवं "
" मी काय करू बसून ? "
" बस माझ्याकडे गप्पा मारत . त्या बंगल्याशी मी काय बोलणार ?
" त्याला हिंदी येतं . "
"" येऊ दे . ""
" ठीक आहे . पण एका अटीवर . तुमच्याकडे तुमच्या गाण्यांच्या तुम्ही टेप्स करून घेतल्या
आहेत , त्या तुम्ही ऐकवल्या पाहिजेत . "
" ऐकवीन . "
माझ्या कुंडलीतले सारे शुभग्रह त्या क्षणी केसरबाईंच्या ` पराग ' बंगल्यातल्या त्यांच्या त्या तिसऱ्या मजल्यावरच्या दिवाणखान्यात एकत्र जमलेले असावेत .

मी शर्वरीला तार ठोकली . तो बिचारा तिथूनच पुतळ्याला लागणारी कसलीशी ती पोतेभर माती मळूनच घेऊन आला . त्याला घेऊन मी माईच्या घरी गेलो . शर्वरीने त्यांच्या पायाशी
लोटांगण घातले . आणि त्यानंतरचे दहाबारा दिवस ही एक पर्वणी होती . इकडे शर्वरीची बोटे मातीतून केसबाईंची प्रतिमा आकाराला आणीत होती आणि माई आयुष्यातल्या असंख्य

आठवणी सांगत होत्या . काही सुखाच्या , काही दुःखाच्या . मधूनच फळणीकर डॉक्टर यायचे . एवढे नामवंत भिषग्वर्य . धिप्पाड देहामनाचे . पण माईपुढे लहान होऊन वागत . माई त्यांना
एकदा म्हणाल्या , " डॉक्टर , अहो , थोड्या दिवसांसाठी तरी मला एकदा बरी करा . एकदा गाऊनच दाखवते ." माईवर परमभक्ती असणाऱ्या फळणीकर डॉक्टरांना अश्रू लपवावे
लागायचे .

खुर्चीवर अधूनमधून स्वस्थ बसायच्या . शर्वरी आपल्या कामात दंग . मी त्या वार्धक्यातही तो अंगभूत डौल न गमावलेल्या पण आजाराने जर्जर होत चाललेल्या माईकडे पाहत बसलेलो
असताना मनात विचार यायचा ; ह्या बाहेरून थकलेल्या देहाच्या रंध्रारंध्रात कसा एक अनाहत तंबोरा वाजत असेल . मनातल्या मनात किती रागांची , किती बंदिशींची , किती सुरावटींची किती तांनाची, बेहेलाव्यांची भेट घडत असेल. सूर असे मनात दाटलेले असताना वार्धक्यामुळे ते बाहेर फुटणे बंद व्हावे . - कसल्या यातना ह्या ! त्या सुरांसारख्याच असंख्य मेफिलींच्या आठवणी.

केसरबाई-२


उद्घाटनाच्या दिवशी रंगमंचावर फक्त एक तंबोरा जुळवून ठेवला होता . "" आता सुरश्री केसरबाईनी ह्या संगीतविभागाचे उद्घाटन हा तंबोरा छेडून करावे , "" अशी मी त्यांनी विनंती केली . माई खूप थकल्या होत्या , तरीही वेशभूषेत आणि रूबाबात कुठे उणेपणा नव्हता .

तंबोऱ्याच्या दिशेला मी त्यांना घेऊन जाता जाता मला विचारतात , "" अरे , तो तंबोरा नीट सुरात लावलाय ना रे बाबा ? "" कुणीतरी आपल्या मगदुराप्रमाणे तो लावला होता . त्यांनी तारा
छेडल्या आणि माझ्याकडे असे पाहिले की ` धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं , ' असे मला वाटायला लागले . लोकांनी वाजवलेल्या टाळ्यांचा कडकडाटात तो तंबोरा कुणाला ऐकू
आला नाही हे नशीब . त्यानंतर खूप दिवसांनी एकदा भेटल्यावर मला म्हणतात , "" अरे , तुझ्या त्या युनवर्शिट तंबोरा लागायला लागला की अजून तसाच ? ""
अध्यक्षपदाचे वगेरे ठीक होते , पण ` पुतळ्याला पोज देता का ? ' हे कसे विचारायचे ? त्यांचा मेफिलीतला दरारा इतक्या परिचयानंतरसुध्दा कायम होता . लक्ष्मीबागेतल्या त्या मेफिली

मुंबईतले छगलांसारखे बॅरिस्टर , नामवंत सॉलिटर्स , निष्णात डॉक्टर्स , सर्जन्स धनिक भाटिये , नाना घराण्यांतले उस्ताद , त्यांचे शागीर्द , केसरबाईंचे मराठी , गुजराती , पारसी भक्त
त्यांतच विरोधी भक्ती करणारे काही लोक , गाण्यातील जागान््जाग टिपणारे निर्मळ मनाचे रसिक श्रोते . . . आणि भटवाडीतल्या लक्ष्मीबागेतल्या हॉलपुढल्या फुटपाथवर मांडी गालून
बसणारे आमच्यासारखे , मुंबईच्या भाषेत , ` कडका कंपनी ' तले लक्ष्मीचे सावत्र पुत्र .

आतल्या बेठकीतला दरारा बाहेरच्या फुटपाथवरच्या गर्दीपर्यंत पसरलेला . कुठे हूं नाही की चूं नाही . दादसुध्दा जायची ती महाराणींना नजराणा पेश केल्यासारखी . अनवट राग सुरू
झाला की जाणत्यांच्या दिशेने अजाणत्यांच्या भिवया प्रश्नार्थक होईन उंचावलेल्या . बाईना रागाचे नाव विचारायची हिंमत मुंबईच्या गोऱ्या पोलिस - कमिशनरालासुध्दा नव्हती . फालतू ,
उडाणटप्पू दादीला तिथे स्थान नव्हते . एक तर ते ` आहाउहू ' करायला लावणारे गाणेच नव्हते . धारापुरीतल्या त्रिमूतीपुढे उबे राहिल्यावर मनाची जी भावना होते तशी त्या गायकीला कान
आणि मन देऊन बसल्यावर अवस्था होत असे . बाई कुणाची भीडमुवर्त बाळगणाऱ्या नव्हत्या , ते केवळ स्वभाववेशिष्ट्यामुळे नव्हे . हा दबदबा त्या गायकीचाच होता . तशा त्या विलक्षण
हजरजबाबीही होत्या . गोव्यातल्या मत्स्य - संस्कृतीमुळे काटे काढणे उत्तम जमायचे . मेफिलीत कुणी आलतूफालतूपणा किंवा गेरसलगी दाखवली तर तिथल्या तिथे काटा काढीत .

उतारवयातल्या त्यांच्या एका मेफिलीत त्यांच्याच वयाच्या पण किंचित आगाऊ श्रोत्याने त्यांना ठुमरी गाण्याची फर्माइश केली . खास मुंबई वळणाच्या गुजरातीत त्या गृहस्थांना त्या म्हणाल्या ,
"" शेटजी , ठुमरी ऐकायचं तुमचं वय निघून गेलं आणि ठुमरी गायचं माझं वय निघून गेलं . आता भजनं ऐका . "" नाशिकला झालेल्या एका मेफिलीत मी त्यांची बनारसी ढंगाची अप्रतिम
ठुमरी ऐकलेली आहे . पण ठुमरीची फर्माइश ? अब्रम्हण्यम् !

आता अशा ह्या माईंना ` पुतळ्यासाठी पोज देऊन बसा ' हे सांगायचे कसे ? पण त्यांचा पुतळा व्हावा आणि कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये किशोरवयापासून त्यांचे गाणे ऐकून त्या
गायनातल्या शिल्पाचे वेड्या झालेल्या शर्वरीबाबूंच्याच हातांनी ती मूर्ती घडावी असे मलाही वाटत होते . त्यात केसरबाईंचे वय झालेले . मधुमेह , रक्तदाब यांसारख्या वार्धक्यातल्या शत्रूंनी
शरीरावर हल्ले सुरू केलेले . हे भारतीय संगीताच्या सोन्याच्या पिंपळावरचे पान केव्हा गळून पडेल याचा नंम नव्हता . मी हिय्या केला .

"" माई , तुमच्याकडे एक काम आहे . ""
"" अध्यक्षबिध्यक्षाचं काय काढलं असशील तर चहा घे , पान खा आणि घरी जा . ""
"" तसंल काही नाही . शांतिनिकेतनात माझा एक शिल्पकार मित्र राहतो . त्याचं काम आहे . ""

शांतिनिकेतन म्हटल्यावर ते वृध्द डोळे चमकले . "" ते बघ , "" भिंतीवरच्या तसबिरीकडे बोट दाखवित त्या म्हणाल्या . रवींद्रनाथ टागोरांच्या हस्ताक्षराताला तो मजकूर होता .
"" रवीन्द्रमाथांसाठी माझं गाणं ऐकून काय लिहिलंय ते वाच . ""

केसरबाई-१


केसरबाई केरकर ह्या नावाला भारतीय अभिजात संगीताच्या जगात काय अर्थ होता . हे सांगायला केसरबाईंच्या गानप्रतिभेच्याच उंचीची लेखनप्रतिमा हवी . संगीताच्या जगातला तो एक चमत्कार होता . म्हणावे , तर त्या जन्मजात प्रतिभेच्या जोडीला त्यांनी केलेल्या असामान्यत तपश्चर्येला गौणत्व येईल . बरे , नुसतीच जिवापाड मेहनत केली म्हणावे , तर त्यांच्या बुध्दि - मत्तेचा अनादर होईल . एक थोर गायनपरंपरा निष्ठेने उज्ज्वल करणाऱ्या होत्या म्हणावे तर त्यांच्यावर अंध गतानुगतिकेचा आरोप होईल , आणि त्या परंपरेची आणि अभिजात संगीताची निष्ठेने आणि डोळसपणाने उपासना करणाऱ्या इतर चांगल्या गायक - गायिकांचा अकारण उपमर्द केल्यासारखे होईल . शेवटी शब्दांच्या शक्तींच्या मर्यादा ध्यानात घेऊन एवढेच म्हणता येईल की केसरबाई आणि त्यांचे गाणे हे काय होते हे त्याच्यांसमोर मेफिलीत बसण्याचा ज्यांना योग आला त्यानांच माहीत . इथे गौरवाची रूढ विशेषणे पोकळ वाटायला लागतात .साडेतीन मिनिटांच्या तबकडीतून केसबाईच्या गाण्याचा अंदाज करणे हे जवळ जवळ चित्रातले फूल पाहून त्याच्या सुगधांचा अंदाज करण्यासारखे आहे . ते गाणे आणि त्या गायिकेचे दर्शन ह्यांतच एक विलक्षण अभेद होता . मेफिलीच्या स्थानी केसरबाईचे ते डौलदार - पणाने येणे म्हणजेच अर्धी मेफिल चजिंकून जाण्यासारखे असे . त्यांच्या गायकीचा भारदस्तपणा त्यांच्या वागण्यातून दिसे . केसबाईच्याविषयी बोलताना अनेकांना त्यांचे हे लोकविलक्षण` सम्राज्ञी ' पण जाणवल्याचे सतत आढळून येते . केसरबाई आणि त्यांचे गाणे सहजपणाने आणि चकाट्या पिटायच्या ओघात बोलायचा विषय नाही . कालिदास , भवभूती यांच्यासारख्यांच्या - विषयी शिळोप्याच्या गप्पांच्या वेळच्या सेलपणाने बोलता येत नाही . तेही कवी आणि नाटककारच . पण त्यांच्या निर्मितीतल्या गंभीरतेचा आपल्या मनावर असा काही संस्कार झालेला असतो की ते मनात शिरले तरी त्यांच्यात आणि आपल्यात आदरापोटी निर्माण
होणारे एक अंतर राहिलेले असते . केसरबाईच्या बाबतीतही तसेच होते . कलेच्या क्षेत्रातह` तपा ' चा म्हणून काही एक स्वतःचा अधिकार असतो . त्या तपाची साक्ष केसरबाईच्या पहिल्या षड्रजावरच्या ` आ ' कारातच पटायची . तेजःपुंज षड्रज . तंबोऱ्याच्या काही क्षणांच्या गुंजनानंतर पहिला षड्रज लागला की सारी मेफिल कुठल्यातरी अनिर्वाचनीय अनुभूतीचे दान आपल्या पदरी पडणार आहे ह्या अपेक्षेने आधीच कृतार्थ झालेली असायची .मध्यम उंची , गौरवर्ण , विलक्षण तेजस्वी डोळे , करारी जिवणी , ओठांच्या कडा पानाने किंचित अधिक आरक्त झालेल्या . कानांत हिऱ्याची कुडी , हातांत हिऱ्याच्या बांगड्या , बोटात हिऱ्यची आंगठी , गळ्यात फक्त एक मोत्यांची माळ , राजघराण्यातल्या स्त्रीसारखी उंची पण
शुभ्र किंवा मोतिया रंगाची साडी - डोकीवरून पदर घेतलेला , चालण्या - पाहण्यात त्या वेषाला साजेल असाच डौल , मेफिलितल्या एखाद्या परिचिताला ओळख दाखवलीच तर त्यातून मेहेरबानीच दिसावी अशा ढंगाची खानदाणी लकब - एकूण ` दबदबा ' हाच त्या साऱ्यातून साधला जाणारा परिणाम . हे दर्शन पुढल्या गाण्याच्या कोंदणासारखेच असायचे . ते गाणे
ऐकायला येणारा श्रोताही प्रत्यय तपःपूत कलाच देऊ शकते .माझे भाग्य मोठे म्हणून त्यांचे गाणे ऐकण्याचा आणि त्यांच्या पिरचयाचा योग लाभला .मला भास्करबुवा ऐकायला किंवा पाहायलाही मिळाले नाहीत . वझेबुवा त्यांच्या उत्तर वयात का होईना पण पाहायला मिळाले , ऐकायला मिळाले . मंजीखां आणि बूर्जीखां पाहायला आणि ऐकायला मिळाले . केसरबाई मात्र ऐकायला मिळाल्या , गप्पागोष्टी करायला मिळाल्या - मन मोकळे करून त्या माझ्याशी बोलल्या . त्यांचा पाहुणचारही लाभला . हे भाग्यच नाहीतर काय? इंग्लंडच्या महाराणीची आणि माझी ओळख होण्याची योग आहे असे जर एखाद्या ज्योतिषाने मला त्या काळी सांगितले असते तर त्याच्यावर मी विश्वास ठेवला असता एकादे वेळी ; पण केसबाई "" अरे खा रे पान . चुन्याने भाजली जीभ तर भाजू दे "" म्हणत मला पान जमवून देतील , त्यात भरपूर तंबाखू घालतील आणि "" मार पिचकारी त्या गॅलरीतून . . . कुणाच्या डोक्यावर पडणार नाही तेवढं बघ "" म्हणतील , हे साक्षात ब्रम्हदेवाने येऊन मला सांगितले असते तरी त्याच्यावर मी विश्वास ठेवला नसता . कसा ठेवणार ?
केसरबाईचे पहिले गाणे एका लग्नात ऐकले त्या वेळी मी बारा - तेरा वर्षांचा असेन . पण संगीत म्हणजे लेकुराच्या गोष्टी नव्हेत हे ठसवणारे त्यांचे बाह्यरूप आणि अंतर्दर्शन मनावर आनंदाच्या जोडीला एक भीतीचा ठसाही उमटवून गेले होते . हल्ली मी पाहतो , मेफिलीत येणारे कलावंत नम्रपणाने येतात , आदबीने येतात , शालीनतेने येतात . पुरूष कलावंतसुध्दा -विशेषतः तंतकार - अगदी ` बनठनके ' येतात . पण फेय्याझखां , थिरखवाखांसाहेब आणि गायिकांच्याच केसरबाई यांच्यासारखे नुसत्या येण्याने दबदबा निर्माण करणारे कलावंत क्वचित दिसतात . इथे नुसत्या देखणेपणाचा प्रश्न नाही ; एक प्रकारच्या डौलदार ` बेअरिंग ' चा आहे . दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वीची गायनप्रेमी मुंबई काय होती हे ज्याने पाहिले असेल त्यालाच त्या मुंबईत केसरबाईचे संगीतक्षेत्रात काय स्थान होते ते ठाऊक असेल . मेफिलीत
तलम धोतर , डगला , डबल घोडा सिल्कचा शर्ट , त्याच्या कॉलरच्या काजाशी एखादे हिऱ्याचे बटण , काळी किंवा वेलबुट्टीची टोपी , पायांत पंपशू - असल्या वेशभूषेलाच मान्यता असलेला तो काळ . शास्त्रीय संगीत लोकाभिमुख करायला हवे वगेरे घोषणा सुरू होण्याआधीचा . त्या वेळी संगीत लोकाभिमुख नव्हते . संगीताभिमुख लोक गायक - गायिकांच्या शोधात असायचे .त्या काळातले सर्वच गायक आणि गायिक श्रेष्ठ होत्या असे मुळीच नव्हते .प्रत्येक काळात त्या त्या क्षेत्रांतील शिखरे असतात . आजही आहेत . पण एकोणीसशे तीस सालापासून ते अडतीस - एकुणचाळीसपर्यंतची आठ वर्षे ही जुन्या मुंबईच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची शेवटची वर्षे .युध्द आले . मग रेशनिंग , काळाबाजार , भयानक संहार , अनेक उलथापालथी - केवळ मुंबईतच नव्हे तर साऱ्या जगातच एक प्रचंड सांस्कृतिक - राजकीय - आर्थिक परिवर्तन झाले . अठरा पगड मुंबई अठराशे पगड झाली . जुन्या मुंबईत डोक्यावरच्या पगडीवरून माणसाची जात सांगता येत असे . पगडीने डोक्याच्या वरच्याच नव्हे तर आतल्या भागाचाही ताबा घेतला होता . इंग्राजाच्या गुलामीमुळे हॅट आणि जातीच्या गुलामीमुळे पगडी . त्यातच ` खानदाना ' च्या कल्पना साठलेल्या होत्या . त्या फारशा शहाणपणाच्या होत्या असे नव्हे . पण ज्यांच्या गाण्याला जाण्यामुळे त्या खानदानीपणाला बाध न येता तो वाढतो अशा ज्या काही मोजक्याच
गायिका होत्या . त्यांत माझ्या लहानपणी केसरबाई अग्रगण्य होत्या . त्यापूर्वी अंजनीबाई मालपेकर यांना असाच मान होता .श्रीमंतांघरच्या लग्नांत ` केसबाईचे गाणे ' ही एक अट होती . वरमाईच्या रूबाबाला खाली पाहायला लागेल अशा थाटात केसरबाई गायला यायच्या . दिवसभर मांडवात व्याही -विहिणींनी काय मानपान करून घ्यायचे असतील ते घ्यावे ; रात्री एकदा केसरबाईचे गाणे सुरू झाले की त्या मांडवातील अनभिषिक्त राणी म्हणजे केसरबाई . लग्नाच्या मांडवातल्या आयाबायांना कळणारे ते गाणे नव्हते , किंबहुना जे मातबर यजमान ते गाणे ठरवीत त्यांनाही त्यात गम्य असेच असेही नाही . त्यांच्या आवडीचे गाणे निराळे असले तरी तसली फर्माइश
ह्या गायिकेला चालणार नाही याची त्यांना खात्री असे . आणि समोर बसलेल्यांच्या आवडी निवडी ध्यानात घेऊन गाणे , हा प्रकार केसरबाईनी आयुष्यात कधी केली नाही . खानदानाविषयक तत्कालीन कल्पनेचाच हा भाग . चिवडा आणि बनारसी शालू एका ठिकाणी विकत घ्यायची सोय असणारी . डिपार्यमेटल स्टोअर्स त्या काळी निघाली नव्हती . चिवडेवाला आपले खानदान सांभाळून आणि बनारसी शालूवाला आपले .

मी केसरबाईंना प्रथम पाहिले ते ग्रांट रोडजवळच्या मुझफराबाद हॉलमध्ये . अशाच एका लग्नातल्या गाण्यात . श्रीमंत घरातले लग्नसमारंभ ह्या मुझफराबाद हॉलमध्ये होत . हंड्या - झुंबरे - गालिचे - रूजामे असा नबाबी थाट तिथे असायचा . अंगणात ` पीकॉक ' किंवा पोलीस ब्यांड ` इट्सस ए लॉग लॉग वे टु टिपरारी ' हे गाणे पहिले महायुध्द संपले तरी वाजवणारा . असल्या त्या मुझफराबाद हॉलमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे केसरबाईच्या आयुष्याला किती विलक्षण कलाटणी मिळाली होती ह्याची हकीकत त्यांनीच मला सांगितली होती .

एका विलक्षण योगामुळे केसरबाईच्याबरोबर रोज पाच - सहा तास असे दहा - बारा दिवस दादरच्या शिवाजी पार्कजवळच्या त्यांच्या घरी मला घालवायला मिळाले . सात - एक वर्षांपूर्वीची गोष्ट . शांतिनिकेतनातील श्री . शर्वरी रायचौधुरी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार संगीताचे परमभक्त . अक्षरशः चार - पाचशे तासांचं ध्वनिमुद्रित संगीत त्यांच्या सग्रंही आहे . केसबाईशी
माझा परिचय आहे हे कळल्यावर ह्या माझ्या मित्राने माझ्या मागे टुमणे लावले : "" काहीही करा आणि केसरबाईना मला सिटिंग द्यायला सांगा . मला त्यांचा अर्धपुतळा करायचा आहे . ""
हे म्हणजे धर्मसंकट . केसरबाईना ` तुम्ही अमुक एक करा ' असे सांगणेही असक्य कोटीतली गोष्ट .

Wednesday, February 16, 2011

स्मरण यात्रा




स्मरण यात्रा
नादब्रह्माचा उपासक
विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर


(लेखक - स्वरभास्कर)
पं.भीमसेन जोशी!नादब"ह्माच्या या श्रेष्ठ उपासकाने दि. 24 जानेवारी 2011 रोजी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी रसिकांच्या हृदयात या अभिजात गायकाचं स्थान अढळच राहणार आहे.
गाणं शिकण्याच्या एकमेव ध्यासाने झपाटलेला आणि त्यासाठी पडतील ते कष्ट घेणारा हा गानयोगी...त्यांच्या या ध्यासाची प्रचिती देणाऱ्या काही आठवणी इथे दिल्या आहेत....
आपल्या गुरूच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांनी सुरू केलेला सवाई गंधर्व संगीत महोत्सव म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच...भारतभरातल्या ज्येष्ठ अन्‌ श्रेष्ठ कलावंतांना दाद देतानाही इथे येणारा रसिक आतुर असायचा तो भीमसेनजींना ऐकायला...त्यांच्या मैफिलीने होणाऱ्या सांगता सोहोळ्याचं साक्षी असणं हे प्रत्येक रसिकाचं स्वप्न! या मैफिलीचं शब्दचित्रही इथे देत आहोत.
पं. भीमसेन जोशी म्हणजे संगीतविश्र्वाचा स्वरभास्कर. भारतीय संगीताचा मानदण्ड! संगीताच्या सुरेल दुनियेचा नादसागर. जवळजवळ पाच तपं कोट्यवधी रसिकांना मुग्ध करणारा चिरयौवन स्वर!
या गंधर्वकंठातला एकेक नितळ, निकोप स्वर म्हणजे सजीव भावशिल्प. पंडितजींच्या स्वराला स्पर्श आहे भगवान श्रीकृष्णांच्या वेणूचा आणि नारदांच्या वीणेचा. शास्त्रीय संगीतातील त्यांची कलाकुसर अशी, की नामवंत शिल्पांनीही लाजावं, चांदण्यांनीही हळुवार व्हावं. आलापीची अमृतवेल गुंफणारी अजोड "याल गायकी... शृंगारात फुललेली सलज्ज ठुमरी... भक्ती आणि करुण रसांचा परमोत्कर्ष साधणारी नादस्वरांत चिंब भिजलेली संतवाणी... आणि सुगम संगीतातील विलोभनीय सुबद्धता- ही चतुरस्रता अनुपमेय!
गानरसिकांच्या हृदयसिंहासनावरील अनिभिषिक्त गानसम"ाट म्हणजे पं. भीमसेन जोशी! पं. भीमसेन जोशी म्हणजे एक व्यक्ती नाही, ते एक संस्थान आहे आणि तेही साधंसुधं नव्हे, तर संगीत.
एक व्यक्ती म्हणून, गायक म्हणून, नादब"ह्माचा उपासक या नात्यानं पंडितजी शुक्लपक्षातील चंद्रकलेप्रमाणं वाढले आहेत. जमिनीमधून निघालेला हा एक कोंब पाहता पाहता इतका वाढला, की त्याचा गगनाला गवसणी घालणारा वेलू झाला.
गुरुगृही भीमसेन दाखल झाला खरा, पण प्रारंभी वर्षभर सवाई गंधर्वांनी भीमसेनला प्रत्यक्ष गाणं असं शिकवलं नाहीच.
भीमसेनच्या कष्टप्रद उमेदवारीला मात्र प्रारंभ झाला.
भीमसेननं उमेदवारी केली, ती अगदी मनापासून. अंतकिरण ओतून. त्याकाळी कुंदगोळला पाण्याचे फार हाल असत. पाणी एकूण कमीच. पाणी आणायचं, ते साधारण अर्धा-एक मैल अंतरावर असलेल्या तळ्यातून. दोन मोठ्या घागरी घेऊन भीमसेन तळ्यावर जायचा आणि तिथून पाणी भरून घागरी खांद्यावरून आणायचा.घरातलं पाणी भरून होईतोपर्यंत भीमसेनच्या फेऱ्या अखंड चालू असत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काहीही असो. हा क"म काही चुकायचा नाही.
गुरूंनी वा गुरुपत्नींनी सांगितलेली कोणतीही गोष्ट भीमसेन ताबडतोब अमलात आणत असे.केर काढणं, घर झाडणं, कपबशा विसळणं, गुरुजींचे कपडे धुणं, पाणी भरणं अशी कष्टाची सर्व कामं भीमसेननं आनंदानं केली.
सवाई गंधर्व भीमसेनला "भिमू' अशी हाक मारायचे. भीमसेनला गुरुंबद्दल आत्यंतिक भक्ती आणि आदर होताच.थोेडी भीतीही होती. आदरयुक्त भीती. "भिमू' म्हणून हाक आली की, भीमसेन घाबरायचा. आपलं काही चुकलं तर नाही ना, असं त्याला वाटायचं. थोड्याच दिवसांत भीमसेन त्या कुटुंबात अगदी मिसळून गेला. एकजीव झाला.
स्वयंपाकघरातलं काम असू दे, बैठकीवरचं असू दे किंवा अंगणातलं असू दे, भीमसेन नेहमी आघाडीवरच.
एकदा सीताबाईंनी चैत्रातलं हळदीकुंकू काढलं.हळदीकुंकू काढलं खरं, पण कैऱ्या काही मिळेनात. आता? कैऱ्या तर पाहिजेतच. त्याशिवाय हळदीकुंकू कसं व्हायचं?छोट्या गोष्टीसाठी गाडी अडून बसली.सीताबाईंनी चिंता वाटू लागली.
घरात चाललेली कुजबूज भीमसेनच्या लक्षात आली.
त्यानं प्रमिलाताईंना हाक मारून विचारलं, "पमाक्का काय झालं?'
"अरे, आज घरात हळदीकुंकू आहे.'
"मग?'
"मग काय? घरी कैऱ्या नाहीत. आपलं गाव हे असं! कैऱ्या नाहीत तर, हळदीकुंकू कसं व्हायचं?'
"एवढंच ना! आता आणतो की!'
"अरे, पण आणणार कुठून? गावात कुठंही नाहीत.'
"नसेनात. मी आणून देतो ना!'
भीमसेननं घरातली सायकल बाहेर काढली आणि पाय वेगाने मारत हुबळी गाठली. कैऱ्या खरेदी केल्या. दुप्पट वेगानं तो कुंदगोळला परतला.कपाळावरचा घाम पुसत भीमसेननं प्रमिलाताईंना हाक मारली आणि त्यांच्या पुढं कैऱ्या ओतल्या. म्हणाला, "पमाक्का, ह्या घ्या कैऱ्या.'
सगळ्यांनी भीमसेनंकडं कौतुकानं पाहिलं.
सीताबाई म्हणाल्या, "आहे हो! मुलगा कामाचा आहे.'
गुरुगृही भीमसेनचा खाक्या हा असा होता.
भीमसेनच्या मनात एकच विचार होता. गाण्यासाठी आपण घरातून बाहेर पडलो. भ"मंतीत कष्टही सोसले, पण गाणं काही लाभलं नाही. केवळ ईश्र्वरी कृपेनं गुरू लाभला आहे. आता त्याचे चरण सोडायचे नाहीत.वाटेल तितके कष्ट सोसावे लागले तरी चालतील, पण आता गाणं आलं पाहिजे.म्हणूनच कष्ट उपसतानाही त्याचा स्वभाव सतत आनंदीच राहिला.
कठोर सत्त्वपरिक्षेत उत्तीर्ण
...साधारणति वर्ष, दीड वर्षांनंतर सवाई गंधर्वांच्या लक्षात आलं की, भीमसेन हा चिवट विद्यार्थी आहे.
गाण्याबद्दल त्यांच्या मनात खरोखरच भक्ती आहे, श्रद्धा आहे.
मधेच कच खाऊन पळणारा हा विद्यार्थी नव्हे.
असा हा पूर्ण पारखून घेतलेला शिष्य सवाई गंधर्वांना आवडला.
एवढ्यात आणखी एक प्रसंग असा घडला की, ज्यामुळं भीमसेनाचं रूपांतर एका संगीत शिल्पात करण्याचा दृढ निश्र्चय सवाई गंधर्वांनी केला.
दक्षिणेकडील एक प्र"यात गायक पंचाक्षरीबुवा अधूनमधून सवाई गंधर्वांकडं येत असत. बऱ्याच वेळी त्यांच्याबरोबर शिष्यांचा प्रचंड जथा असे. शंभर-दीडशे शिष्य घेऊन बुवा यायचे.
प्रसंगविशेषी सवाई गंधर्व त्यांना थट्टेनं म्हणत, "या शंभर शेळ्या घेऊन गावोगाव फिरता, पण यातली एक तरी दूध देते काय?'
मग पंचाक्षरीबुवा दूध देणाऱ्या शेळीला, म्हणजे गाणं येणाऱ्या शिष्याला गायला लावत.
एका प्रसंगी पंचाक्षरीबुवांनी बसवराज राजगुरूंना गायला सांगितलं. बसवराजांची पंचाक्षरीबुवांनी केलेली तयारी ऐकून, यापेक्षा अधिक चांगला शिष्य तयार करण्याची इच्छा सवाई गंधर्वांना अंतर्यामी झाली.कारण दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी भीमसेनला गाण्याची तालीम देण्यास प्रारंभ केला.ती तालीम, तो अभ्यास अस्सल खानदानी होता. सिद्ध झालेल्या परंपरागत शिस्तीचा होता.सकाळी साधारण तास-दीड तास आणि संध्याकाळीही साधारणपणे तेवढाच वेळ सवाई गंधर्व भीमसेनचा गळा तयार करून घेत असत.
कुठलाही श्रेष्ठ कलावंत नादब"ह्माची अशी श्रद्धामय पूजाच बांधतो. अशी पूजा पहाण्याचं आणि ऐकण्याचं भाग्य भीमसेनला लाभलं.
सवाई गंधर्व स्वति एक राग भीमसेनला गाऊन दाखवत. त्यानं तो लक्षपूर्वक ऐकायचा. नंतर त्यामधील एकेक तुकडा घेऊन तो पक्का घोटायचा. एकेक जागा पक्की करून मगच पुढं जायचं. तोपर्यंत तोच पलटा घोकायचा. त्याला इलाज नसायचा. स्वति पंडितजींनीच सांगितलं,
"तोडीतली एखादी तान घेतली की, ती सारखी अनेक वेळा पुनि पुन्हा म्हणत राहायची. तेच तेच गात राहायचं. विशेषति माझ्या त्या वयात कंटाळा आणणारी गोष्ट होती.'
"एक तास, दोन तास, रोज ती तोडी घोटत बसायचं. डोकं अगदी दुखायला लागायचं, पण त्याचा फायदा आता मला समजतोय. तोडीत काही करायची जी शक्ती आहे, ती त्यावेळच्या मेहनतीनं मी प्राप्त करून घेतली आहे.'
संगीतासाठी असे कष्ट करावे लागतात, त्यावेळी स्वरसिद्धी प्राप्त होते.
भीमसेननं उमेदवारी करताना जी अफाट मेहनत केली, ती पुढील पिढीला प्रेरणादायी तर आहेच, पण मेहनत कशी करावी, याचा तो वस्तुपाठच आहे.
पहाटे चार वाजता उठून भीमसेन खर्ज लावत असे. मग मंद्रसप्तकाची मेहनत सुरू होई. ती सात-साडेसातपर्यंत.आंघोळ करून पुन्हा मेहनतीला बसायचं ते थेट माध्याह्नकालपर्यंत. पुन्हा दुपारी दोन-अडीचपासून संध्याकाळी सहापर्यंत आणि रात्री जेवण झालं की, पुन्हा थेट मध्यरात्रीपर्यंत.अशी अफाट मेहनत केली, म्हणूनच आज सप्त स्वर हात जोडून पंडितजींपुढं उभे आहेत.
संगीताचा हा अभ्यास जवळजवळ तीन वर्षं चालू होता. अखंड. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.
रसिकांना तृप्त करणारी
सवाई गंधर्व महोत्सवाची सांगता!
माझ्या डोळ्यांपुढं तर कै. सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवाचं दृश्य सदैव असतं. अवघ्या भारतातून आपली हजेरी लावण्यासाठी शेकडो कलावंत इथे धावत येतात. महोत्सवात सेवा सादर करायला मिळाली, की स्वतलिा धन्य समजतात.
रेणुकास्वरूप मुलींच्या भावे स्कूलमध्ये घातलेला किंवा न्यू इंग्लिश स्कूल रमण बागेतला मंडप तीन रात्री जागत असतो. स्वरांत भिजत असतो.
पण पहिल्या दिवसापासून अवघ्या श्रोत्यांंचं लक्ष सांगतेच्या पहाटेकडं असतं. कारण शेवटी गाणार असतात पंडितजी. तीनही दिवस मंडपात अतोनात गर्दी असतेच, पण पंडितजींच्या गाण्याच्या वेळी तिथे महासागर उसळतो. अखेरच्या काही तासात मुक्तद्वारही असते. त्यामुळे पंडितजींचं गाणं ऐकायला मिळेल, तिकीटही काढावं लागणार नाही, असा खास "सदाशिवी' हिशेब करून अनेक रसिक मंडळी मंडपात घुसतात.
पहाटेपासूनच सगळ्यांनी मोक्याच्या जागा अडवून धरलेल्या असतात. मंडपात तर मुंगी शिरायलाही जागा नसते. निसर्गाची हाक आली, तरी मंडळी जागा सोडायला तयार नसतात. कारण पंडितजींच्या गाण्याच्या वेळी ती जागा पुन्हा मिळणं केवळ अशक्य असतं.
मंडप गर्दीनं वाहू लागला, की त्याचं लोण कोनाकोपऱ्यात जातं. व्हरांडे तुफान भरतात. मंडपाबाहेरची जागाही भरते. लोकांना येण्याजाण्यासाठी ठेवलेल्या जागासुद्धा अतिक"मणानं तुडुंब भरतात आणि शेवटी शेवटी तर गर्दीचा रेटा हळूहळू रंगमंचाकडे जायला लागतो. काही मंडळी चक्क रंगमंचावरच बैठक ठोकतात आणि मग तेथूनच खालच्या श्रोतृवर्गाकडे "जितं मया' अशा मुद्रेनं पाहतात.
नुकतंच कोणाचं तरी गाणं संपलेलं असतं. बहुधा वसंतराव देशपांडे, फिरोज दस्तूर किंवा नियाझ-फैज अहमद. दमलेला ध्वनिक्षेपक बसक्या आवाजात अवघ्यांच्या आभाराचं गोड काम करीत असतो आणि ते गोड काम केव्हा संपतं, याची अवघा मंडप औत्सुक्यानं आणि थोड्याशा अस्वस्थतेने वाट पाहत असतो.
भारतीय बैठकीवर बसल्यामुळे अंगही हलवायला जागा नसलेला कुणी रसिक श्रोता तेवढ्या गर्दीतूनही धडपडत वर उठत वाद्यांच्या खोलीकडं नजर टाकतो आणि तोंडात जमवलेल्या पानाचा प्रसाद बसलेल्या लोकांना मिळू नये, म्हणून ऊर्ध्व दिशेला तोंड करत बोबड्या आवाजात म्हणतो,
"आता बुवा येणार बरं का!' आता औत्सुक्य अगदी कळसाला पोहोचलेलं असत. वाद्य रंगमंचावर येऊ लागतात आणि ध्वनिक्षेपक गरजतो,
"आता आपली सेवा सादर करण्यासाठी रसिकांचे लाडके संगीतसम"ाट भीमसेन जोशी रंगमंचावर येत आहेत.'
टाळ्यांचा धुवांधार कडकडाट होतो. नुकतंच स्नान केलेले, गुरूजींचा आशीर्वाद घेतलेले आणि खांद्यावर शाल पांघरलेले पंडितजी मोठ्या तब्येतीनं रंगमंचाकडे येत असतात. एखाद्या वनसिंहानं वनातून सहज चालताना इतर मृगांचे मुजरे घ्यावेत, तसा हा गानसिंह रंगमंचाकडं जाताना चाहत्यांचे नमस्कार स्वीकारत रूबाबानं रंगमंचावर येतो.
"नमवी पहा भूमि हा चालताना' ही "मानापमाना'तली ओळ आठवून माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटतं. तोपर्यंत पंडितजी आपल्या गुरुजींच्या प्रतिमेला नमस्कार करतात. मरहूम अब्दुल करीमखॉंसाहेबांच्या तसबिरीपुढं लीन होतात आणि रंगमंचाच्या मध्यावर येऊन अवघ्या रसिकांना अभिवादन करतात. पुन्हा टाळ्यांच्या कडकडाट होतो. खांद्यावरची शाल पंडितजी मांडीवर पसरतात. जुळवलेले तानपुरे पुन्हा एकदा बारकाईनं तपासतात. एखादा सूक्ष्म दोष राहिला असेल तर तो काढून टाकतात. गाभाऱ्यातून येणाऱ्या स्वरांच्या आवर्तनामुळे अंगावर रोमांच यावेत, तसे ते दोन वा चार जव्हारदार तानपुरे बोलायला लागतात. तानपुरे जमवणं हीसुद्धा एक कला आहे. पंडितजींच्या इतके सुरेल तानपुरे क्वचितच कोणी जमवितात. मी एकदा हे पंडितजींना म्हटलं होतं. पंडितजी हसले. तर्जनी-अंगठा जुळवत मला म्हणाले, "कुमार काय झकास जुळवायचा तानपुरे!' एव्हाना अवघी सभा तटस्थ, एखाद्या चित्रासारखी स्तब्ध झालेली असते. पंडितजी आपल्या झब्यांचं वरचं सोन्याचं बटण काढतात आणि एकाच दृष्टिक्षेपात श्रोत्यांना आपलंसं करतात.
पंडितजी आपले डोळे मिटतात. सगळ्या चित्तवृत्ती अंतर्मुख करतात आणि कोमल रिषभाला हळुवार स्पर्श करून षड्‌जात आपला स्वर एकरूप करतात. अवघी सभा एकदम एकच शब्द म्हणते, "अहाहा!'
षड्‌जाच्या पहिल्या पूर्ण आकाराबरोबर अवघी सभा ते जिंकून घेतात. तोडीचा स्वरविस्तार जसा फुलू लागतो, तसे अवघे श्रोते सर्वांगाची कर्णेन्द्रिये करून बसतात.
एकेका स्वराची ताकद अशी की, तो निखळ मोती भासावा. आलापीची बढत एका लहान कोंभानं पाहता पाहता डेरेदार वृक्ष व्हावं तशी. तानांचा पल्लेदारपणा असा की, ऐकणाऱ्याचा जीव गुदमरावा. गमकेच्या ताना, जबड्याच्या ताना, गळी ताना यांचा दमसास असा की, पंडितजी समेवर येईपर्यंत अवघी सभा आपला श्र्वास रोधून बसलेली असते.
शुद्ध आकार, रागाची संयतदार बढत. आलापीची वेलासारखी गुंफण, प्रदीर्घ दमसासाचे लांब लांब सट्टे यामुळे "यालाची होणारी एकूण रचनाकृती अधिकच रमणीय असते. कमळ तर सुंदर असतंच, पण शतपत्र कमळांनी भरलेल्या पुष्करिणीचं सौंदर्य निरूपमच.
तोडी असा अनेक अंगांनी फुलत जातो. जो जो स्वर पंडितजींच्या कंठातून बाहेर यावा, तो जणू सोनेरी होतो आणि त्या स्वरामध्ये सगळा मंडप उजळून निघतो.
"याल संपल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असताना जेवढा वेळ जातो तेवढीच विश्रांती पंडितजी घेतात आणि "पिया मिलनकी आस' हा आर्त जोगिया पुकारतात. त्या स्वरांची आर्तता ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. करुण रसाखाली अवघे जण नहात असतात. तारसप्तकातला कोमल रिषभ अचूक लक्ष्यवेध व्हावा, तसा अत्यंत सुरेल, अत्यंत आर्जवी, अतिशय हळुवार आणि इतका काही तरल होऊन येतो, की अशा एखाद्या क्षणी नादब"ह्माची परमावधी होते. तो सच्चा स्वर आपल्या काळजात साठवून त्याच्यावरून जीव ओवाळून टाकायला प्रत्येक श्रोता आसुसलेला असतो.
पण एवढ्यानं भागत नाही. कारण त्या तारकोमल रिषभाची कोमलता प्रत्येक जण हळुवारपणे जपत असतानाच पंडितजींचा पोटाच्या घुमाऱ्यातून आलेला पूर्ण ताकदीचा तारमध्यम अवघं वातावरण भारून टाकतो.
हा क्षण आला, की जाणकार मंडळीच काय, पण मंडपातला एकूण एक श्रोता आसवांच्या साथीनंच पियाच्या विरहातली व्याकुळता अनुभवू लागतो.
पंडितजींनी इतक्या ताकदीनं तो जोगिया जमवलेला असतो, की त्या स्वरांचा मंडप हलवण्याचं धाष्टर्‌यच कोणाला होत नाही. त्या स्वरांचा लगाव प्रत्येकाच्या अंतकिरणात गुंजत असतो आणि म्हणूनच आपली एखादी बेसूर टाळी वाजवून मस्त जमलेल्या रंगाचा भंग करणारा कुणीच अरसिक श्रोता नसतो.
पंडितजी तेवढी संधी अचूक पकडतात आणि भगवंताला साद घालतात.
"देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल....'
आणि बघता बघता करूण रसाच्या माथी अवघ्या संतांचा आणि विठ्ठलाचा लाडका शांत भक्तिरस बसवतात. अवघा मंडप त्या भक्तिरसावर डोलू लागतो.
भावानं, भक्तीनं मधाळलेला अभंगाचा प्रत्येक शब्द आणि तो उमटतोय परिसकंठी भीमसेनांच्या मुखातून - त्या नादकल्लोळात सगळे स्वरास्वरांनी विरघळत जातात.
पंडितजी आपली बैठक जेव्हा आवरती घेतात, तेव्हा "अगा, नवल वर्तले' अशीच भावना प्रत्येक श्रोत्याच्या मनात असते. तो अवघा सोहळाच देवदुर्लभ असतो.
==========================================================
विद्यावाचस्पति श्री. शंकर अभ्यंकर लिखित पं. भीमसेन जोशी यांचे सांगीतिक चरित्र "स्वरभास्कर' यातून साभार. 16 मार्च 2010 (गुढीपाडवा) या दिवशी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना, "आदित्य प्रतिष्ठान'तर्फे लक्ष्मी वासुदेव यांच्या प्रीत्यर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

Wednesday, February 9, 2011

श्री. उदय भवाळकर

श्री. उदय भवाळकर...एक सुंदर सुखद धृपद अनुभव..गावती पेशकश...स्वरांजली कोलंबस २३ सप्टेंबर २०१०

Wednesday, January 26, 2011

दोन दिग्गज





दोन दिग्गज...

मित्रहो...

ह्या वरील चित्रामध्ये दोन दिग्गज आहेत...ओळखा पाहु कोण कुठे आहे ते?

अण्णांच्या एका वाक्यामुळे संगीताकडे वळलो


कलावंत म्हणून स्वत:ला फक्त संगीताला समपिर्त करण्याची खासियत अण्णांच्या ठिकाणी आहे. कितीतरी पिढ्यांचे ते प्रेरणास्थान, आदर्श आहेत. गायनातल्या रचना कौशल्याने श्रोत्यांना तासन्तास गुंतवून ठेवणे कठीण असते. ही गोष्ट अण्णांनी गेले ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ साध्य केली आहे. मी संगीतात करिअर करावे असे आई-बाबांनी ठरवले यात आण्णांचा सहभाग मोठा आहे. माझ्या ९व्या वर्षी त्यांनी माझे गाणे पहिल्यांदा ऐकले आणि 'हा ज्ञानेश्वरांच्या कुळातला आहे', असे म्हणाले. त्यांच्या एका वाक्यामुळे मी संगीताकडे वळलो.

- संजीव अभ्यंकर

Tuesday, January 25, 2011

भीमसेनी पराक्रम


पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाला हार्मोनियमची साथ करायला मिळणे हा माझ्या जीवनातील भाग्ययोग होय. एका अत्यंत श्रेष्ठ कलाकाराच्या निकट सहवासात राहण्याचा, सहप्रवास करण्याचा आणि अगदी शेजारी बसून त्याचं स्वर्गीय गायन ऐकण्याचा अमृतोपम आनंद उपभोगण्यात माझी १९५६ पासूनची वीस वर्षे अगदी मंतरलेल्या मन:स्थितीत गेली. या संस्मरणीय सहवासात त्यांच्या उत्तुंग गायनकलेचं मनोहारी दर्शन तर मला घडलंच; परंतु त्याचबरोबर त्यांच्या अभूतपूर्व ‘स्टॅमिना’चा, श्रोत्यांवरील मनस्वी प्रेमाचा, दुर्मिळ निधडेपणाचा आणि साथीदारांवरील खऱ्याखुऱ्या, बरोबरीच्या स्नेहाचा निर्वाळाही मिळाला. किती रोमांचकारी घटना, किती समर प्रसंग, किती अटीतटीचे क्षण!! भीमसेनजी ज्या काळात उदयाला आले, तेव्हा अनेक कीíतमान गवई, गायिका जिकडे तिकडे आपल्या मैफली गाजवीत होते. त्या पाश्र्वभूमीवर भीमसेनजींनी आपली खास मुद्रा उमटवली आणि किराणा गायकीकडं श्रोत्यांचे कान आकर्षून घेतले. त्या समयाला त्यांचा तीन-तीन तास रियाझ चालत असे. दमसास असा की, आम्हा साथीदारांना दम लागावा! सुरेलपणा तर कमालीचा. त्यात बोबडेपणा नावाला नाही. त्यांच्याबरोबर जेथे जेथे गेलो, तिथं हेच अनुभवलं की, त्यांचा ‘पैमाना’ कधी खाली आलाच नाही. ते उंचच जात राहिले. एक आठवण सांगतो. १९६० चं वर्ष असेल. म्हैसूरच्या संगीत महोत्सवात मैफल ठरली होती. दुपारी ४ वाजताची वेळ दिलेली. म्हणजे निदान दोन दिवस अलीकडे रात्री निघायला पाहिजे होतं. त्या काळी म्हैसूरला बंगलोरवरूनच जावं लागे. मी त्यांच्याकडे सांगितल्या वेळी हजर झालो; परंतु काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना म्हैसूरला जाणं जमणार नव्हतं. त्यांनी मला सांगितलं की, उद्या तार कर, की प्रोग्रॅम ‘रद्द’ समजावा. मी घरी जाऊन झोपलो. दुसरे दिवशी पाहतो, तर काय, सकाळी आठ वाजता दाढी-अंघोळ करून महाराज ‘आत्ता निघायचं’ हे सांगायला आलेले. सकाळी ११ वाजता निघालो. मोटारकार त्यांचीच. ड्रायिव्हग तेच करणार. मी गुलाम रसूलजी (तबला), तंबोरे, शिष्य असे निघालो. कल्पना करा, दुसऱ्या दिवशी दुपारी ४ ची मैफल आणि आम्ही सकाळी ११ ला निघालेले. पण पंडितजींना कसली पर्वा नाही. ते शांत. रात्री झोपणे नाही. शेजारच्या सीटवर मी. गप्पागोष्टी करीत व आम्हा सर्वाना जागं ठेवत यांचं ड्रायिव्हग चालू. दुसऱ्या दिवशी तीन वाजता पोहोचलो. तोपर्यंत त्यांचं खाणं असं फारसं झालेलं नव्हतं. तिथे पोहोचताच नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणं गार पाण्यानं अंघोळ करून आणि तंबाखूचा बार भरून स्वारी रंगमंचावर विराजमान झाली. विशेष हे की, इतक्या दूरच्या प्रवासानंतरही त्यांचं गायन अप्रतिम झालं. त्या दिवसाची ती मैफल श्रोत्यांच्या इतकी पसंतीला उतरली की, त्या महोत्सवात आलेल्या एकूण सहा कार्यक्रमांत हा ‘आइटेम’ सर्वोत्कृष्ट ठरला, अशी पावती संयोजकांनी दिली; परंतु..ही कथा इथेच संपत नाही. कारण दुसऱ्या दिवशी तुळजापूरला मैफल होती. म्हैसूर ते तुळजापूर अशी ‘राघो भरारी’ होती. जेवण नाही, मध्ये थांबणं नाही, अखंड ड्रायिव्हग! पण वेळेवर म्हटलं, तर कसं पोहोचू शकणार? तिकडे तुळजापूरला गानशौकीन रात्री ८ वाजल्यापासून वाट पाहत आहेत. आम्ही कसेबसे रात्री १०-१०।। पर्यंत पोहोचलो. एक तास आराम केला आणि रात्री १२ ला प्रोग्रॅम सुरू झाला. सांगायचं हे की, त्या गाण्यावर इतक्या पल्ल्याच्या प्रवासाचा काहीही परिणाम झालेला नव्हता.
चंबळच्या खोऱ्यातील समरप्रसंग:
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी भीमसेनजींचं नाव उत्तर भारतातही कुठकुठपर्यंत पोहोचलं होतं, याची एक अद्भुत आणि रोमांचकारी आठवण आवर्जून सांगण्यासारखी आहे. चंबळच्या खोऱ्यातील घटना. आम्ही दिल्लीहून निघालो होतो, मुंबईकडे. ग्वाल्हेपर्यंत आलो. संध्याकाळ झाली. ‘हाय वे’ला लागेपर्यंत ९।।।-१० वाजायला आले होते. तेवढय़ात पेट्रोल संपणार असल्याचं पंडितजींच्या ध्यानात आलं. रस्त्यावर पेट्रोल पंप होता. आम्ही पेट्रोल घेतलं. तो पंपवाला चांगला होता. म्हणाला, ‘साहब, कहाँ जाना हैं आपको?’ ‘हम बंबई की तरफ जा रहे हैं।’ ‘मेरी सलाह मानिए। इस वक्त आगे न जाना। यह सब डाकुओं का इलाका हैं। और खतरनाक इब्राहिम डाकू का इलाका हैं यह। आप रात को कहीं आराम करिए और सबेरे चार-एक बजे निकल पडिये।’ आम्हाला नंतर कळलं की, या चंबळच्या खोऱ्यात वेगवेगळे भाग मोठमोठय़ा डाकूंनी वाटून घेतलेले असतात. पण ते काही असलं, तरी भीमसेनजी जिद्दी आणि त्यांना कमालीचा आत्मविश्वास. ते कुणाचं कशाला ऐकताहेत! झालं. आम्ही निघालोच. ५०-६० कि.मी. जातो न जातो, तोच रस्त्याच्या मधोमध दरोडेखोरांची एक िभतच आमचा रस्ता रोखून उभी होती. मी आणि गुलाम रसूल पुरते घाबरलो होतो. आम्ही तोंडावर रुमाल धरले. भीमसेनजी लुंगी, कुडत्यात शांत बसलेले. ‘गाडी रोको!’चा दणदणीत आवाज झाला. ‘डिकी खोलो..!’ डिकी उघडली, तर लावलेल्या ‘हुक्स’ना तंबोऱ्याची जोडी लावलेली. ‘यह क्या हैं?’ ‘तानपुरे हैं।’ ‘तो आप गाने बजानेवाले लोग हैं?’ ‘हाँ..’ ‘कोन हैं गानेवाले?’ आम्ही सांगितलं. ‘अच्छा, भीमसेनजी हैं।’ ‘हाँ, ये भीमसेनजी हैं, यहाँ बैठे हैं। और यह उन्हींकी गाडी हैं।’ ‘ठीक हैँ, फिर जाने दो.’ आणि आम्ही सहीसलामत पुढे निघालो. पंडितजी आम्हाला म्हणतात, ‘क्यों? अरे, डाकू हमको क्या कर सकता हैं?’ सांगायचं हे आहे की, चंबळखोऱ्यातल्या डाकूंनाही या श्रेष्ठ गायकाचं नाव त्या काळात माहीत झालेलं होतं. रेडिओ, ऐकीव कीर्ती, कॅसेट वगैरेंतून भीमसेनजी ‘ऐसे छा गए थे।’
- अप्पा जळगावकर (ज्येष्ठ पेटीवादक)
======================================================
सदर लेख मंगळवार, २५ जानेवारी २०११ च्या लोकसत्ता मधला आहे. लोकसत्ताचे आभार.

Friday, January 7, 2011


संगीत हेच आपले जीवन मानणाऱ्या कलावंतांची भारतात एकेकाळी वानवा नव्हती. ज्या काळात संगीताला सामाजिक प्रतिष्ठा अजिबात नव्हती, त्या काळातही अनेक कलावंत संगीतालाच आपले सर्वस्व मानत असत. संगीतासारख्या सौंदर्याची उपासना करणाऱ्या कलेचा हा ध्यास संगीताला तग धरून राहण्यास उपयोगी पडला, हे आता लक्षात येते. गेल्या काही वर्षांत, विशेषत: जागतिकीकरणानंतर संगीताच्या दुनियेत प्रतिष्ठेबरोबरच पैसाही आला आणि हे जग वेगळ्याच मार्गाने जाऊ लागले, अशाही काळात सातत्याने उत्तम संगीत निर्माण करण्याचा ध्यास घेणारे पंडित यशवंतबुवा जोशी यांना यंदाचा हृदयेश आर्ट्स या संस्थेतर्फे पहिला ‘हृदयेश संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर होणे हे खरे म्हणजे एक सुचिन्ह आहे. कलावंताला अशा पुरस्काराने मिळणारी ऊर्जा फार महत्त्वाची असते आणि ही गोष्ट हृदयेश आर्ट्सने ओळखली आहे, हेही तितकेच महत्त्वाचे म्हटले पाहिजे. भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर गायकीतील यशवंतबुवा हे एक नामवंत कलावंत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालीम मिळालेली. त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या अनेक उत्तमोत्तम चिजांचा भरणा आहे. त्या चिजांकडे पाहण्याची त्यांची एक खास अशी सौंदर्यदृष्टी आहे. आयुष्भर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिद्धीचे वलय फार उशिराने प्राप्त झाले. महाराष्ट्रात ग्वाल्हेर गायकीची स्थापन करणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे शिष्य यशवंतबुवा मिराशी हे यशवंतबुवा जोशी यांचे पहिले गुरू. संगीताच्या गायनशैलीत घराण्याच्या अस्सलपणाला फार महत्त्व असते. अनेक कलावंतांनी आपापल्या गायनशैलीत अन्य शैलींचा प्रभाव मिसळत त्यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. यशवंतबुवांनी मात्र आयुष्यभर या अस्सलपणाला फार महत्त्व दिले. त्यामुळे ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची तालीम त्यांना मिळाली, तरी या दोन्ही घराण्यांतील अस्सलपणा जपण्याचा प्रयत्न ते आयुष्यभर करत आले आहेत. सतत चिंतन करण्याने गायनात मोठा फरक पडत असतो, याचे भान अलीकडच्या कलावंतांमध्ये क्वचित आढळते. सर्जनशीलतेच्या निसर्गदत्त देणगीवर विसंबून गायनकला पुढे जात नाही, याची जाणीव या कलावंतांना होण्यासाठी त्यांनी यशवंतबुवांचाच आदर्श ठेवायला हवा. स्वरांवर हुकूमत असणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश करायला हवा. गायला सुरुवात करताच स्वरावर घट्ट पकड करण्याची त्यांची क्षमता अचाट आहे. स्वर आणि लय या संगीताच्या दोन्ही चाकांवर आरूढ होत यशवंतबुवा जेव्हा गायनाला सुरुवात करतात, तेव्हा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करत ते रसिकांना पटकन कब्जात घेतात. स्वरांच्या आंदोलनांप्रमाणेच तानांवरचा त्यांच्या गळ्याचा ताबा प्रत्येकाला अचंबित करायला लावणारा ठरतो. शरीर म्हटले तर कृश या सदरात मोडणारे. पण गायला लागल्यानंतर रसिकांना साक्षात्काराचीच अनुभूती यशवंतबुवा अनेकवेळा देते आले आहेत. पुण्यात बालपण गेलेल्या यशवंतबुवांना तेव्हाच अनेक दिग्गज गायक ऐकायला मिळाले. जन्म १९२७ चा. म्हणजे संगीत नाटक ऐन बहरात आलेले. खरे तर त्या काळात चांगल्या गायकाला मैफली गवई होण्याबरोबरच गायक नट होण्यात अधिक रस असणे स्वाभाविक होते. यशवंतबुवांना त्यांच्या शरीरयष्टीने ‘साथ’ दिली आणि ते गायनाकडे वळले. ग्वाल्हेरनंतर आग्रा घराण्याची तालीम जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे घेतली, तेव्हा यशवंतबुवांना गाण्यातील भावदर्शनाची एक नवी शैली प्राप्त झाली. आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणाऱ्या या कलावंताला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्याच्या कलेला मिळणारी सार्वजनिक पावती आहे!
 =========================================================================
 सदर लेख बुधवार, ०७ जानेवारी २०१ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.