Sunday, October 21, 2012

पं.अभिषेकी महोत्सव

पं. अभिषेकी महोत्सव

 तरंगिणी प्रतिष्ठानतर्फे कला अकादमी, गोवा सांस्कृतिक संचालनालय आणि पेनिन्सुला लँड्स यांच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील मा़  दीनानाथ मंगेशकर सभागृहात  पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव नुकताच आयोजित करण्यात आला होता. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक होते. अनेक विश्वविख्यात कलावतांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती. आपलं घराणं किंवा आपल्या गुरूने दिलेली विद्या, हीच श्रेष्ठ आणि त्यांचाच प्रसार करण्यासाठी आपण झटायचं, असा संकुचित दृष्टिकोन बाळगणारे अनेक गायक आपण पाहतो़
मात्र संगीताकडे घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन पाहू शकणारे जितेंद्रबुवांसारखे कलाकार विरळच़  पं.जितेंद्र अभिषेकी शिक्षण घेतानाही एखाद्याच घराण्यात अडकून राहिले नाहीत़  त्यांनी उस्ताद अमझद हुसेन खान यांच्याकडे शिक्षण घेतले, तसे गिरिजाबाई केळकर आणि जगन्नाथबुवा पुरोहितांकडूनही शास्त्रीय संगीताचे धडे घेतल़े  त्यानंतरही काही दुर्मिळ रागांसाठी त्यांनी बडे गुलाम अली खाँसाहेबांचे शिष्यत्व पत्करल़े  परिणामत: त्यांची गायकी तर समृद्ध झालीच, पण त्याचबरोबर समग्र हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची माहिती झाल्यामुळे त्यांना सगळ्यातील उत्तम, उद्दात्त आणि उन्नत, ते ते निवडून स्वत:ची ‘अभिषेकी शैली’ निर्माण करता आली़  अर्थात यात कोणत्याही एका घराण्याचा सांगीतिक वारस जपण्याचा अट्टहास नव्हता, तर उत्तमाचा शोध घेणारी सर्वसमावेशकता होती़  त्यामुळेच आजही पंडितजींनी स्थापन केलेल्या तरंगिणी प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवावर कोणत्याही एका घराण्याची छाप नसत़े
१३ आणि १४ ऑक्टोबरला पणजीत पार पडलेल्या  या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे प्रमुख विश्वस्त शौनक अभिषेकी, पणजीच्या महापौर वैदेही नायक, कला अकादमीचे अध्यक्ष विष्णू सूर्या वाघ, उपाध्यक्ष राजा खेडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडल़े  यंदाच्या महोत्सवात तर पहिल्यांदाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पल्याड उडी मारून दाक्षिणात्य संगीतालाही स्थान देण्यात आले होत़े   ‘कर्नाटकी ब्रदर्स’ या जोडगोळीने कानसेन गोवेकरांची पूर्ण तृप्ती केली़  शशिकिरण आणि गणेश अर्थात कर्नाटकी ब्रदर्सनी आजवर देश- विदेशात अनेक मैफली गाजविल्या आहेत़  सलग २४ तास मैफलीचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आह़े  त्यांच्या मैफलीत दाक्षिणात्य पद्धतीनुसार तबल्याऐवजी मृदंगम् या तालवाद्याचा आणि संवादिनीऐवजी व्हायोलिन या स्वरवाद्याचा साथीसाठी वापर करण्यात आला होता़  तबल्यापेक्षा काहीशी रुंद असणारी मृदंगम्ची चाट जोरकस आणि अधिकाधिक वारंवारतेने वाजवून नादनिर्मिती करण्याचा दाक्षिणात्य संगीतातील सुरेल प्रघात आह़े  त्यामुळे त्यातून निर्माण होणारा ठेका म्हणजे दाक्षिणात्य संगीतच, अशी ओळख श्रोत्यांच्या कानात वर्षांनुवष्रे तयार झाली आह़े  त्याचाच परिणाम म्हणून मृदंगम्वर साथीला असणाऱ्या साई गिरीधर यांनी ठेका दाक्षिणात्य धरताच श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली़  त्यांच्यासोबत व्हायोलिनवर साथीला पद्मा शंकर होत्या़  कर्नाटकी ब्रदर्सनी मैफलीला सुरुवात केली ती आदितालातील हंसध्वनी या हिंदुस्थानी संगीत श्रोत्यांनाही परिचित असणाऱ्या रागाऩे  याची बंदिश(गीत) होती, ‘बातापी गणपतम् भजे गौ’.  त्यानंतर श्री रागात तेलुगू गाणे ‘एदरो महानुभावो’ आणि शेवट स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ‘भो शंभो, शिवशंभो, स्वयंभू’ या रेवती रागातील संस्कृत भक्ती गीताने करण्यात आला़  मैफलीचे विशेष आकर्षण ठरली, कर्नाटकी ब्रदर्सनी खास या महोत्सवासाठी रचलेली ‘गानोत्सवम्, कलोत्सवम्, पंडित अभिषेकी संगीत महोत्सवम्’ ही बंदिश!
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा शेवट सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांच्या पल्लेदार गायनाने झाला़  जौनपुरी, आसाजोगीया, वृंदावनी अशा क्रमाने आरतीताईंनी कार्यक्रमाला सुरुवात केली़  मध्यंतराची वेळ लोटून गेली, तरी श्रोत्यांचे मन भरेना़  आता आणखीन काय गाऊ, या आरतीताईंच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी चोखंदळ गोमांतकी श्रोत्यांकडून टप्पा, अवघा रंग.. अशा फर्माइशी येतच होत्या आणि आरतीताईही न कंटाळता त्या पुरवीत होत्या़  अशा भारावलेल्या वातावरणात मध्यंतर झाले.
शोभा चौधरी आणि अभिषेकीबुवांचे शिष्य डॉ़  राजा काळे यांचे गायनही पहिल्या दिवशी ऐकायला मिळाल़े  मात्र यात सर्वात फक्कड जमली, ती पंडित गणपती भट यांचीच मैफल! गोड गळा आणि संथ लयीतील सुंदर बढतींसाठी प्रसिद्ध असलेल्या गणपतीबुवांनी तीन तालात ‘पिया मेरे परदेस बसत हैं’या  बंदिशीला सुरुवात केली आणि प्रत्येक समेवर टाळ्यांच्या कडकडाटाला जी सुरुवात झाली, ती शेवटचे भजन ‘रघुनंदन आगे नाचुंगी’पर्यंत कायम होती़  दुसऱ्या दिवशी पं.विजय सरदेशमुख यांचे ‘मैं कैसे भरू पानी’ ही ठुमरी आणि ‘शून्य गढ- शहर- शहर-घर- वस्ती, कोण सोता कोन जागे है। लाल हमारा हम लालन के, तन सोता ब्रह्म जागे हैं। ’ हे भजन, असे शास्त्रीय- उपशास्त्रीय गायन झाल़े  शास्त्रीय संगीताची झिंग चढते, असे जे म्हटले जाते; त्याची प्रत्यक्षानुभूती सरदेशमुखांच्या गायनाने घेता आली़  जयपूर- अत्रौली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर यांनी आळवलेला यमन- बिलावल आणि त्यानंतर खास जयपूर घराण्याचा म्हणून ओळखला जाणारा खट हे दोन्ही राग फक्कड जमल़े  पण खट राग सर्वसामान्य श्रोत्यांना फारसा परिचित नसल्यामुळे, त्याचा खऱ्या अर्थाने आस्वाद शास्त्रीय संगीताच्या पक्क्या कानसेनांनाच घेता आला.  श्रुतीताईंनी स्वत: स्वरबद्ध केलेले ‘कैसे दिन कटे हैं’ हे  श्रोत्यांच्या फर्माइशीवरून गायलेले भजन मात्र सर्वानाच तृप्त करणारे ठरल़े  गोमांतकी गायिका प्रचला आमोणकर यांचा पटदीप राग आणि भरवी ‘सगुण संपन्न पंढरीच्या राया’ श्रोत्यांची दाद मिळवून गेल़े  शुद्ध आग्रा घराण्याच्या गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या गुलाम हुसेन खाँ ऊर्फ राजा मियॉं यांनी महोत्सवात आपली कला सादर केली़  त्यांना तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुधीर नायक यांनी साथ केली़  आग्रा घराण्याच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी नोमतोमने सुरुवात करत पूर्वा राग गायला़  त्यानंतर ‘बाजे मोरी पायलीया कैसे’ या बंदिशीने मैफल संपवली़  प्रसिद्धी किंवा श्रोते मिळविण्यासाठीही इतर कोणत्याही घराण्याचा फारसा प्रभाव आपल्या गायकीवर पडू न देता वर्षांनुवर्षे विशुद्धता राखणे शक्य आहे, हेच राजा मियॉंच्या गायकीने दाखवून दिल़े
बैठय़ा स्वर-तालाला महोत्सवात उभे केले, ते बिरजू महाराजांच्या शिष्या पार्वती दत्ता आणि त्यांच्या शिष्यांनी! दत्ता यांनी आपल्या शिष्या पल्लवी गोसावी, राधिका शेलार, जिजाऊ कोलते यांच्या सोबतीने कथ्थकच्या तरल अदाकारी सादर करीत उपस्थितांच्या मनावर मोहिनी घातली़  तीन तालाच्या वेगवेगळ्या लयीतील रचना, ध्यान, कृष्णशृंगार अशा एक ना अनेक गोष्टी त्यांनी सादर केल्या आणि दादही मिळवली़  त्यातही समेपूर्वी संपणाऱ्या तीन तिहाया, तबलजीने केवळ समेचा ‘धा’ वाजवून त्याला दिलेली साथ आणि त्यावर नर्तिकीची नाजूक अदाकारी! हा प्रकार तर अक्षरश: घायाळ करणारा होता़  बैठकीची सांगता, पं.बिरजू महाराज यांच्या ‘शाम मूरत मन भाये’ या सुरेल तराण्याने झाली़
कोणत्याही संगीत महोत्सवाचा असतो तसा अभिषेकी महोत्सवाचाही वाद्यसंगीत हा महत्त्वाचा भाग होता़  वाद्यसंगीताच्या सर्व मैफलींना सुप्रसिद्ध तबला वादक योगेश सम्सी यांनी साथ केली़  पं. नयन घोष यांच्या सतारीतून निघालेल्या गावती रागाने श्रोत्यांची मने जिंकली़  मात्र श्रोत्यांच्या काळजाला हात घातला तो, अतुलकुमार उपाध्याय आणि राजेंद्र कुळकर्णी यांच्या व्हायोलिन आणि बासरीच्या जुगलबंदीनेच! जुगलबंदीची सुरुवात राग नटभरवने झाली़  जुगलबंदीने श्रोत्यांना खरोखर सांगीतिक समाधीच लागल्याचा प्रत्यय आला, ते सभागृहातील वीज एकाएकी गुल झाल्यावर! एकदा नव्हे, तर दोनदा सभागृहात अंधार पसरला़  रंगमंचावर कोणी दिसेना, तरी श्रोते आणि कलाकार दोघांनाही त्याचे भान नव्हत़े  रंगमंचाच्या दिशेने येणाऱ्या सूर- तालावर प्रेक्षकांच्या टाळ्यांनी धरलेला ठेका क्षणभरही विचलित झाला नाही़  या ‘अंधाऱ्या जुगलबंदीत’ही विशेष चमक दिसली ती सम्सी यांच्या तबल्याची़  समेवर येताना त्यांच्या तबल्यातून वाजणाऱ्या अक्षरश: प्रत्येक तिहाईला दाद मिळत होती, टाळ्या पडत होत्या़  जुगलबंदीनंतर अभिषेकीबुवांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे ‘घेई छंद मकरंद’ हे पद वाजविण्यात आल़े  तेही गोमांतकी श्रोत्यांच्या मनात रुंजी घालणारे होत़े
दोन दिवसांत वेगवेगळ्या घराण्यांच्या गायक- वादकांनी ज्या संगीत सोहळ्याची पायाभरणी केली, त्यावर कळस चढवण्यासाठी पं.हरिप्रसाद चौरसियांनी हातात बासरी घेतली़  या वेळी त्यांच्यासोबत होता त्यांचा शिष्य संतोष संत आणि परदेशी शिष्य आमोस़  तबल्यावर साथीला अर्थातच योगेश सम्सी़  त्यांनी सुरुवात केली ती, राग मारुबिहागपासून आणि मग रसिकाग्रहास्तव यमन नि पहाडी यांचीही बहार उडवून दिली़  वयोमानानुसार हरिजींचे हात- मान थरथरत होती़  बासरीतून निघणारा स्वर न् स्वर मात्र अगदी पक्का होता़  पहाडी वाजवताना तर टिपेच्या स्वराची आखूड बासरी घेऊन हरिजींनी तबलजीच्या साथीने अशा काही लीला केल्या की, तबला हे साथीचे वाद्य न राहता त्याची स्वरवाद्याशी जुगलबंदीच सुरू आहे, असे वाटत होत़े  हरिजींच्या कलेला गोमांतकीयांनी उभे राहून अभिवादन केल़े  ‘एक तो हरि खुद बन्सी बजाये, या फिर हरिप्रसाद बजाये।’ हे निवेदन करणाऱ्या डॉ़  अजय वैद्य यांचे वाक्य श्रोत्यांनी अक्षरश: अनुभवल़ं  अभिषेकी महोत्सवाची सांगता व्हायला हवी तशी किंवा त्यापेक्षा कितीतरी पट अधिक सुंदर झाली़
हत्तीला पाहावे पाण्यात, तसे कलाकाराला पाहावे रसिकांच्या गराडय़ात आणि  गोमांतकीयांनी महोत्सवात उत्तमोत्तम कलावंतांना दोन्ही दिवस असा काही गराडा घातला, की कलाकारही भारावून गेल़े  सकाळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी रसिकांनी सभागृह भरून जायचे, ते रात्री भैरवी होईपर्यंत़  गायकाने आपण गाणार असलेल्या रागाचे नाव सांगितले की शेजारी बसलेल्या चिमुरडीच्या तोंडूनही, ‘अरे वाह! आता हा राग’, असे उद्गार निघत होत़े  महाविद्यालयीन तरुण- तरुणीही शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तासन्तास खिळून असल्याचे पाहायला मिळत होत़े  तबलजीने ठेका धरताच, बहुतेक श्रोते हातावर तालाच्या मात्रा मोजू लागत आणि समेवर दाद देत़  आपल्या आवडीच्या रागाच्या फर्माइशी करून मैफलीत सक्रिय सहभाग दाखवीत, त्यामुळे कलाकाराला साहजिक अधिक हुरूप येत होता़  ‘अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी मा लिख’, असे जगनिर्मात्याला विनविणारा कवी जर गोमांतकात आला असता, तर त्याने नक्कीच ‘रसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसी लिख’, असा वाक्प्रयोग प्रचलित केला असता.

गोव्यात जणू भारतच लोटल्याचा भास -पं.हरिप्रसाद
alt गोव्यात आपण यापूर्वीही आलो आहोत़  मात्र या महोत्सवासाठी जमलेली श्रोत्यांची प्रचंड गर्दी पाहून, अवघा भारतच तर गोव्यात लोटल्याचा भास आपल्याला झाल्याचे उद्गार पंडित हरिप्रसाद चौरसियांनी काढल़े  त्यांना साथ करणाऱ्या परदेशी शिष्याबद्दल छेडले असता, वृंदावन या आपल्या मुंबई आणि भुवनेश्वर येथे चालणाऱ्या गुरुकुलमध्ये असे किमान ४० ते ४५ परदेशी शिष्य असल्याची माहिती त्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली़  तसेच आपण त्यांना परदेशी मानत नसून, तेही आपलेच आहेत़  आपली कला पुढे चालविण्याचा ते प्रयत्न करीत असल्याचे सांगितल़े  कलाकार गरीब घरातूनही पुढे येत असतो़  त्यामुळे अशा कलाकारांसाठी वृंदावनात शिक्षणासह इतरही गोष्टी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितल़े  त्यांना सादरीकरणाची सवय व्हावी म्हणून आपण त्यांना साथीला घेत असल्याचेही त्यांनी सांगितल़े.


 पं.हरिप्रसाद यांचा परदेशी शिष्य
alt आमोस हा ३१ वर्षीय इस्रालयी तरुण आह़े  बारा वर्षांपूर्वी भारतात फिरायला आलेला असताना त्याने झाकीर हुसेन आणि शाहीद परवेज यांची मैफल ऐकली आणि त्याला भारतीय संगीताचे वेड लागल़े  पुढे पंडितजींचा जेरुसलेममधील कार्यक्रम त्याने ऐकला आणि बासरी शिकण्यासाठी सर्वस्व वाहायची त्याची सिद्धता झाली़  त्यानंतर पंडितजींच्या सांगण्यावरून त्याने हॉलंडमध्ये जाऊन बासरी या विषयात पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि सध्या तो मुंबईतील पंडितजींच्या अंधेरी येथील वृंदावनमध्ये राहून पंडितजींचे मार्गदर्शन घेत आह़े  भावी आयुष्यातील योजनांबद्दल, ‘बासरी, बासरी, बासरी’ इतकेच उत्तर त्याने दिल़े

एक ज्येष्ठ ‘टाळीया’
alt ज्ञानेश्वर टाकळकर उपाख्य माऊली यांनी आयुष्यभर केवळ टाळ या एकाच वाद्याचा ध्यास घेतला़  वय वष्रे ८६ असलेल्या या ‘टाळीया’ने ३५ वर्षे पं़ भीमसेन जोशी यांना साथ केली़  त्यांच्या अभंगवाणीत वा कार्यक्रमात कधीही माऊलींचा टाळ वाजला नाही, असे झाले नाही़  उतारवयात भीमसेनजींनी अभंगवाणीचे कार्यक्रम थांबविले, तरीही केवळ माऊलींची साथ सुटू नये, यासाठी ते शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची भैरवी तरी भजनाने करत आणि माऊलींना सोबत ठेवत़  माऊलींनी आजवर किशोरी आमोणकर, राजन- साजन मिश्र, पं.जसराज, अश्विनी भिडे, राम कदम, सुधीर फडके, श्रीनिवास खळे अशा असंख्य बडय़ा असामींना टाळाची सोबत केली आह़े  पूर्वी उदरभरणाइतके उत्पन्न यातून मिळत नसे, त्यामुळे पुण्याच्या महात्मा फुले मंडईत एका व्यापाऱ्याकडे दिवाण म्हणून काम करून, ते आपला छंद जोपासत़  पण आता परिस्थिती बदलल्याचे ते सांगतात़  आता त्यांचा मुलगा आनंद आणि नातू प्रथमेशसुद्धा टाळ वाजवतो़  महोत्सवात भजनाची सुरुवात झाली की, माऊली रंगमंचावर अवतरत आणि लोक  खास त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडात करीत होत़े.

======================================================================= सदर लेख रविवार, २१ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार. 

Monday, October 8, 2012

पं. यशवंतबुवा जोशी

महाराष्ट्रात अभिजात संगीताची गंगोत्री आणणाऱ्या बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांची गायकी त्याच दिमाखात आणि त्याच लयीत परंपरेने टिकवून ठेवणाऱ्या यशवंतबुवा जोशी यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एका संपन्न परंपरेतला एक तेजस्वी तारा निखळला आहे. गायकी शिकायची तर ती अंगात मुरवावी लागते. ती नुसती स्वरांच्या अंगाने म्हणजे बंदिशीची स्वररचना मुरवून चालत नाही, तर लयीत घोळलेल्या स्वरशब्दांसह मुरवावी लागते.
यशवंतबुवांनी पुण्यात पं. मिराशीबुवा यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची जी तालीम घेतली, ती त्यांच्यासाठी आयुष्याची शिदोरी ठरली. मिराशीबुवांनी थेट बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून ही गायकी आत्मसात केली आणि ती त्यांनी त्यांच्या शिष्यांपर्यंत इतक्या सहजपणे पोहोचवली, की त्यामुळे ग्वाल्हेर घराण्याचे मूळ स्वरूप त्यातील सगळय़ा सौंदर्यखुणांसह यशवंतबुवांनी ती अधिक सशक्तपणे आणि सर्जनशीलतेने रसिकांपर्यंत पोहोचवली. अंगकाठी किडकिडीत, पण आवाजात ताकद अशी की भलेभले थक्क व्हायचे. लयीच्या दुनियेतले यशवंतबुवा हे एक अतिशय सृजनशील कलावंत होते. तालातील मात्रांचे वजन सांभाळत, आलापी आणि बोलबढत करताना यशवंतबुवा जी करामत करायचे, ती फार सुंदर असे. पं. जगन्नाथबुवा पुरोहितांकडे गाणे शिकायला सुरुवात केल्यानंतर यशवंतबुवांना लयीकडे बघण्याची नवी दृष्टी मिळाली. त्यामुळे त्यांच्या गायनाला परिपूर्णता लाभली. मैफलीत यशवंतबुवांच्या आवाजाची फेक, त्यांची तान आणि त्यांची लयीवरची हुकमत चटकन ध्यानात येत असे. त्यामुळे त्यांच्या गाण्यात रटाळपणा कधीच जाणवत नसे. रागाचा रसपरिपोष करण्यासाठी अंगी प्रतिभा असावी लागते. ती त्यांच्याकडे होती. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे मूळ स्वरूप सांभाळताना ती सतत नवरसनिर्मिती कशी करत राहील, याचा ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला. घराणेदार गायकीचा अभिजात अनुभव देणारे यशवंतबुवा हे उत्तम गुरू होते. गाणे शिकवायचे, म्हणजे केवळ राग आणि बंदिश शिकवायची नसते, तर घराणेदार गायकी त्यांच्यामध्ये मुरवायची असते, याचे भान त्यांनी त्यांच्या गुरूंप्रमाणेच ठेवले. त्यांचे निधन संगीतासाठी आणि ग्वाल्हेर घराण्यासाठी चटका लावून जाणारे आहे.
 ========================================================================
सदर लेख सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Friday, October 5, 2012

डॉ. अबान मेस्त्री
‘पहिल्या पूर्णवेळ (प्रोफेशनल) महिला तबलावादक’ म्हणून डॉ. अबान मेस्त्री यांची नोंद लिम्का बुकाने घेतली होती खरी; पण हे कौतुक सामान्यजनांना.. ‘भाजे येथील २३०० वर्षांपूर्वीच्या (इसवी सन पूर्व २००) लेण्यात तबलासदृश वाद्य वाजविणाऱ्या एका महिलेचे उत्थितशिल्प दिसते’ हे अबान मेस्त्री यांनीच प्रबंधात नमूद केले होते! अबान यांची गेल्या ५० वर्षांची सांगीतिक कारकीर्द केवळ तबल्याच्या तालाने नव्हे, तर सतार आणि कंठसंगीत, तसेच हिंदी व संस्कृतच्या विद्यापिठीय अभ्यासाने बहरली होती, हे संगीताच्या जाणकारांना अधिक महत्त्वाचे वाटते.
तबल्याचा घरंदाजपणा टिकवणाऱ्या थोडय़ांपैकी अबान होत्या, त्या केवळ एखाद्या घराण्याच्या वृथाभिमानामुळे नव्हे, तर अभिजाततेची चतुरस्र जाण  मिळवल्यामुळे. ‘तबला आणि पखवाजाची घराणी व परंपरा’ या विषयात त्यांनी पीएच. डी. (गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ पदवी) मिळवली, तेव्हा गेल्या ५०० वर्षांतील ३० महान वादकांनी कोणकोणती भर घातली, याचा धांडोळा त्यांनी घेतला होता.  ‘तबले की बंदिशें’ या  पुस्तकातून त्यांनी सप्रयोग (सीडीसह) तालतत्त्वाचे महत्त्व विशद केले. पंडित केकी एस. जिजिना, पं. लक्ष्मणराव बोडस आणि उस्ताद आमीर हुसेन खान या तिघा गुरूंपैकी जिजिनांच्या त्या पट्टशिष्या. या गुरूसह त्यांनी ‘स्वर साधना समिती’ ची स्थापना १९६१ मध्ये केली. अर्थात, ‘सूर सिंगार संसदे’सारख्या अन्य संस्थांच्या संमेलनांतही अबान यांचा सहभाग असे. पं. जिजिना,  फिरोज दस्तूर आदींनी लखलखीत केलेली पारसी समाजातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायन-वादनाची, सध्या अस्तंगत होत चाललेली परंपरा अबान यांनी जागती ठेवलीच, पण ग्रंथबद्धही केली. अबान यांचे निधन गेल्या रविवारी झाल्यामुळे हा दुवा निखळला आहे. देशभरातील  संगीत संमेलनांत जाणकारांची, तसेच विदेशातही श्रोत्यांची दाद मिळवणारी, देशभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांत अध्यापन करणारी आणि ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ सारख्या पुस्तकात मानाचे स्थान मिळवणारी ही ‘वादिका’ भारत सरकारच्या पुरस्कारांपासून वंचितच राहिली. परंतु शोकसभेऐवजी येत्या शनिवारी गायन-वादनाची बैठक होणेच उचित ठरावे, इतकी अविरत, अम्लान संगीतसेवा अबान यांनी केली होते.
==========================================================================
 

Monday, September 10, 2012

बाबुल मोरा... काही नावाजलेल्या गायकांच्या माध्यमातुन...







पं. मनोहर चिमोटे
भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे. ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे. ===============================================================
सदर लेख सोमवार, १० सप्टेंबर २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, January 23, 2012

रसिकवंत!


ज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये असे भीमसेन होते. सगळ्या समाजाशी भीमसेन जोशी यांचा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच. भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. २४ जानेवारी २०११.
वेळ : रात्री साडेअकरा- बाराची.
भीमसेनजींच्या घरात दिवसभर हजारो माणसांनी अंत्यदर्शनासाठी रीघ लावली होती. पण रात्र तशी सुनी सुनी होती. घरात एखादा दिवा जळत होता. रात्रीच्या अशावेळी कार्यालयातून घरी जाताना त्यांच्या घरावरून जावंसं वाटलं. तिथं पोहोचलो, तर दाराशी एक मोठी गाडी येऊन उभी राहिलेली. पटापटा त्यातून सात-आठ माणसं उतरली. घर बंद होतं. दाराशीच उभी राहिली. सगळ्यांनी हात जोडले आणि नमस्कार केला. त्यातल्या काहीजणांना अश्रू आवरत नव्हते आणि हमसाहमशी रडणंही! दिवसभर भीमसेनांचं शेवटचं दर्शन घेणाऱ्यांपैकी अनेकांचे चेहरे रडून थकलेले दिसत होते. त्यातल्या कितीजणांना पंडितजी प्रत्यक्षात भेटले असतील, त्यांच्याशी गप्पा मारल्या असतील, कोण जाणे. ज्यांच्या वाटय़ाला पंडितजींच्या आयुष्यातला एखादा क्षणही आला, त्यांचं जगण्ां भीमसेनांशी जोडलं गेलं होतं. पण जे त्यांना भेटलेही नाहीत, त्यांच्याही मनातली भावना जणू आपल्या घरातला, अगदी हृदयाजवळचा कुणी गेल्याची.
भीमसेनांचा समाजाशी असलेला हा जो संबंध होता, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता. पण भारतीय अभिजात संगीतासाठी त्याने एक अतिशय वेगळं परिमाण मिळवून दिलं. कोणताही कलावंत बेटावर राहून कला सादर करू शकत नाही. निदान परफॉर्मिंग आर्टमध्ये तर ते अशक्यच वाटावं. तरीही भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत कलावंतांचं समाजाशी असलेलं नातं नाटकातल्या नटांएवढंच होतं. नाटक संपलं, रंग उतरले, की जो- तो कलाकार आपापल्या विश्वात आणि प्रेक्षकही त्याला त्यापलीकडे आपल्या आयुष्यात वेगळं स्थान देण्याच्या भानगडीत न पडणारे. कलावंत आणि रसिक यांचा हा संबंध केवळ नाटय़गृहापुरताच. संगीताच्या बाबतीत तर गेल्या काही शतकांमध्ये भारतात जेवढय़ा दंतकथा निर्माण झाल्या असतील, तेवढय़ा अन्य कोणत्याच कलेच्या वाटय़ाला आल्या नसतील. गायक जरासे तिरसट असायचे. सहजी कुणाला भेटायचे वगैरे नाहीत. आणि भेटले, तरी फार समाधान वाटेल अशी स्थिती नाही. ते सारे आपल्याच धुनीत.. तंद्रीत. आपला संबंध फक्त कलेशी. तीच आपलं सर्वस्व. बाकी सारं क्षणभंगुर- अशी ती भावना होती.
स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत अशा दिग्गजांची गाणी ऐकायला मिळणं दुरापास्त असायचं. ती सर्वाना ऐकता येतील, अशी शक्यता नसे. एकतर ती दरबारात होत. तिथं सामान्यांना प्रवेशच नसे. ‘अदाकारीचं गाणं’ ऐकण्याची ठिकाणं सर्वसामान्यांना जाता येतील अशी नसत. त्यामुळे भुकेल्या रसिकांना कलावंतांचं दर्शनही दुर्लभ असे. त्यातून त्या काळातील अनेक कलाकार स्वभावानं विक्षिप्त असत. त्यांच्या शिष्यांनाही त्यांची भीती वाटावी, असा स्वभाव. रसिकांची तर बातच सोडा. पण त्यांच्याजवळ असलेली प्रतिभा आणि सर्जनशीलता रसिकांना वेड लावणारी असे. मैफलीत मंचावर एकदा बैठक घातली, की मग तासन् तास आपला गळा सहजगतीने फिरवत ठेवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असे. समोरच्यांना दीपवून टाकावं, या ईष्र्येनं जे गाणं व्हायचं, ते समोर कुणी इतर घराण्याचा कलावंत असेल तरच. आपण बरं की आपली कला बरी, अशी ही समजूत बराच काळ होती.
प्रत्यक्ष मैफलीशिवाय रसिकांपर्यंत जाण्याचं अन्य कोणतंच माध्यम त्याकाळी अस्तित्वात नसल्यानं विसाव्या शतकापर्यंत कलावंत आणि रसिक यांचं नातं दूरचंच असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटक निर्माण झालं आणि हे अभिजात संगीत वेगळ्या रूपात रसिकांसमोर जाऊ लागलं. त्या नाटकांमध्ये नट होण्यासाठी अभिनय येण्यापेक्षा गाणं येणं आवश्यक असे. बालगंधर्वासारख्या नटाला त्या काळात जी अफाट लोकप्रियता मिळाली, ती त्यांच्यातील अतिशय मधुर आणि अभिजात गायकीमुळे. महाराष्ट्रात पहिल्यांदा ‘हिरोवर्शिप’ मिळणारा कलावंत म्हणजे बालगंधर्व. विसाव्या शतकात ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञान विकसित झालं आणि गाणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची संधी निर्माण झाली. परंतु हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आणि गाणं परिपक्व अवस्थेत- अशी काहीशी स्थिती. त्यामुळे बऱ्याच दिग्गज कलावंतांनी आपणहून ध्वनिमुद्रणाकडे पाठ फिरवली. गाणं ऐकवायचं तर ते मैफलीतच, असा जणू चंगच बांधला त्यांनी. मात्र, तंत्रज्ञानानं (नभोवाणीचं भारतातील आगमनही साधारण त्याच सुमाराचं!) घराण्यांचा कोट हळूहळू गळून पडायला लागला होता. ब्रिटिशांच्या राजवटीचाही तो परिणाम होताच. मुक्तता आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा उद्घोष होण्याचा काळ होता तो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अभिजात संगीताच्या प्रांतात फारच उलथापालथी झाल्या. राजाश्रय संपला होता. लोकाश्रय मिळेल, अशी आशा होती. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीमधली त्रिसूत्री वेगवेगळ्या रूपांत स्पष्ट होऊ लागली होती.
.. अशा काळात भीमसेनांचा संगीताच्या क्षितीजावर उदय झाला. पारंपरिक घराण्याची चौकट न मोडता त्यात नवनवे प्रयोग करण्याची अचंबित करणारी सर्जनशीलता त्यांच्याकडे असल्यानं आणि भवतालचं वातावरणही अशा प्रयोगांना अनुकूल होण्याची शक्यता असल्यानं भीमसेनांनी एका नव्या प्रयोगाला सुरुवात केली. ‘सा रे ग म’ कंपनीने प्रकाशित केलेल्या ध्वनिमुद्रणाच्या संचामध्ये पंडितजींचे अगदी सुरुवातीचे ध्वनिमुद्रण आहे. त्यात त्यांच्या गाण्यावर सवाई गंधर्वाची इतकी छाप आहे, की क्षणभर विचार करावा. पण त्या गाण्यातही त्यांनी आपलं वेगळेपण शोधण्याचा केलेला प्रयत्न लक्षात राहतो. नंतर ते गाणं अधिकाधिक वेगळं होत गेलं. त्यात अनेक हिऱ्या-मोत्यांची भर पडली. ते श्रीमंत झालं. गायनकलेचा समाजाशी जवळचा नातेसंबंध जोडण्याचं व्रतच जणू पंडितजींनी घेतलं होतं. हे सगळं जाणूनबुजून, बुद्धिपुरस्सर होतं की नाही, ठाऊक नाही. पण गाणं अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं, आणि असं करताना त्याचा दर्जा कुठंही पातळ होऊ द्यायचा नाही, असं हे व्रत होतं.
चित्रपट बोलायला, नव्हे गायला लागूनही बराच काळ झाला होता आणि ललित संगीतातील भावगीतासारखे प्रयोगही यशस्वी होत होते. अशा काळात अभिजात संगीत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड मोठं काम भीमसेनांनी केलं. विष्णू दिगंबर पलुस्करांनी त्याआधीच्या काळात भारतीय संगीत सामान्यांपर्यंत नेण्यासाठी जे वेगवेगळे प्रयोग केले, त्याच्या पुढची पायरी भीमसेनांनी गाठली. ललित संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर जात असतानाच्या काळात उत्तम अभिजात संगीताची गोडी लोकांना लावण्यासाठी भीमसेनजींनी देशभर जो प्रवास केला, तो आजच्या काळातही चकित करायला लावणारा आहे. वाहनांची सोय नाही, राहण्याची सुविधा नाही, खाण्यापिण्याची खात्री नाही, बिदागी मिळण्याची शाश्वती नाही, अशा कठीण परिस्थितीत भीमसेनांनी गाणं सगळीकडे पोहोचवण्यासाठी जे काही केलं, त्याला तोड नाही. गाणं असं करायचं, की पुन्हा निमंत्रण मिळायला हवं. मग तिथं शे-दोनशे रसिक असले म्हणून काही बिघडत नाही. त्या प्रत्येकाशी आपल्या गाण्यानं नातं जोडण्याची जी हातोटी त्यांना प्राप्त झाली होती, ती दैवी म्हणावी अशीच.
गेल्या वर्षभरात भीमसेनजींचं स्मरण करणारे अनेक कार्यक्रम देशात अनेक ठिकाणी झाले. तिथल्या प्रत्येकाला या कलावंताबद्दल कमालीची आपुलकी होती.. जिव्हाळा होता.. प्रेम होतं. हा कलावंत आपल्या कलेतून थेट आपल्या हृदयात पोहोचतो, याचं आश्चर्य वाटावं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. ज्यांच्याशी थेट जाऊन बोलायची जराही भीती वाटू नये, असं. सगळ्या समाजाशी त्यांचा हा जो ‘कनेक्ट’ होता, तो त्यांच्या आधीच्या पिढीतल्या कलावंतांकडे जवळजवळ नव्हताच.
किराणा घराण्याचे अध्वर्यु अब्दुल करीम खाँसाहेबांबद्दल एक दंतकथा सांगितली जाते, की ते जेव्हा बडोद्याहून म्हैसूरच्या दरबारात राजगायक म्हणून रुजू होण्यासाठी गेले, तेव्हा तिथं त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. भीमसेनजींना हाच मान भारतात सगळ्या प्रांतांत सतत मिळत राहिला. त्यांच्या गाण्याचं नाणं इतकं खणखणीत होतं, की कुणाशी लांगुलचालन करण्याची गरज त्यांना पडली नाही. त्यांचा स्वभावही तसा नव्हता. तरीही समोरच्या प्रत्येकाबद्दल मनात कळवळा असणारा हा एक वेगळाच कलावंत होता. भीमसेनांना देशात आणि जगभरात एक श्रेष्ठ कलावंत म्हणून भरभरून लौकिक मिळाला. पण त्याहीपेक्षा त्यांना कोटय़वधींच्या हृदयात जे स्थान मिळालं, ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अलौकिकाची झळाळी देणारं होतं. त्यांच्या निधनानंतरच्या काळात तर हे अधिकच जाणवलं. कलावंत म्हणून भारतीय अभिजात संगीत घरोघरी पोहोचवत असताना त्या घरातल्या प्रत्येकाला कलावंत आणि कला याबद्दल आत्मीयता वाटेल, यासाठी त्यांनी केलेलं कार्य म्हणूनच अधोरेखित करायला हवं. हजारो रसिकांना ते जाऊन वर्ष झालं, तरीही त्यांचं स्मरण व्याकुळ करतं, हे अचंबित करणारं आहे आणि भीमसेनांच्या कर्तृत्वाची झळाळी अधिक उजळवणारंही आहे.
=======================================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, रविवार २२ जानेवारी २०१२ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.