Tuesday, July 30, 2013

'श्रुती' रंगी रंगले... भाग-२

कही दिल लगायाँ है?
एकदा मी बाहेरगावहून नुकतीच परतले होते. घराचं दार उघडून आत शिरतेय तेवढय़ात फोन वाजला. फोनवरून विचारणा झाली, 'श्रुतीजी है.. मैं बेगम अख्तर बोल रही हँू..',  माझ्या हातातून फोन फक्त पडायचाच बाकी राहिला होता. यांचा फोन मला कशाला, असा विचार मनात आला. त्या मला म्हणाल्या, हमने आपके आवाज की बहुत तारीफ सुनी है. तो हमें आपका गाना सुनना है. कब सुनाऐंगी..'. मी त्यांना म्हटलं की आत्ताच घरी आले आहे. उद्या ऐकवले तर चालेल का? त्यावर 'नहीं नहीं कल मैं लखनौ जा रही हूँ.. तो हमें आपका गाना आज ही सुनना है,' असे म्हणत त्या माझ्या गुरूंबरोबर घरी आल्या. जून महिन्यातला असाच भरपूर पाऊस होता. इतक्या भिजल्या होत्या त्या.. पण, तरीही 'तुम्ही गा' म्हणाल्या.. 'कपडे आपोआप सुकतील', असं त्यांनी सांगितल्यावर मी गायला सुरुवात केली. मग त्याही गायल्या. त्या दिवशीचं त्यांचं गाणं मी रेकॉर्ड करून ठेवलंय, कारण माझ्यासाठी तो प्रसाद होता. गाऊन झाल्यावर त्यांनी मला हळूच विचारलं, 'श्रुतीजी कहीं दिल लगाया है?' त्यांच्या त्या प्रश्नावर मी पुरती गोंधळून गेले होते. समोर घरातली सगळी मंडळी, गुरू सगळेच होते. माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून त्यांनी सांगितलं, 'नहीं..नहीं..हम किसी का नाम नहीं पूछ रहे है.' मला काय बोलायचं कळेना. मग त्या म्हणाल्या, 'देखिए.. दिल है. खूब लगाईए.. दिल ही है. तुट जाएगा. बार बार तुटेगा. जितनी बार तुटेगा उतना दर्द बढेगा. और वोह दर्द जब आपकी आवाज में उतरेगा तो आपकी आवाज तो सोने पे सुहागा बन जाएगी.'  
भातखंडे विद्यापीठाची कुलगुरू होणं सहजसोपं नव्हतं
२००८ मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून मी रूजू झाले आणि २००९ मध्ये उत्तरप्रदेशच्या राज्यपालांनी माझी भातखंडे संगीत विद्यापीठाची कुलगुरू म्हणून थेट नियुक्ती केली. पण, मी उत्तरप्रदेशमध्ये गेल्या गेल्याच तुम्ही इथे येऊ नका, तुमचा काही फायदा होणार नाही, असं ऐकवण्यात येऊ लागलं. विद्यापीठातल्या काही लोकांना माझ्यासारखी सरळ व्यक्ती तिथे येणं सोयीचं नव्हतं.  मी गेल्या दिवसापासून माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मी तिथे येऊ नये म्हणून तिथल्या लोकांनी माझ्याविरोधात संप करणे, माझे पुतळे जाळणे, वर्तमानपत्रातून टीका करणे, अगदी माझ्यावर खुनाचा आळ घेण्यापर्यंत विरोधी कारवाया करून पाहिल्या. पण, नंतर काय करायचं हे त्यांच्या लक्षात येईना. कारण काही केल्या मी तिथून जात नव्हते. शेवटी मी त्यांना बजावून सांगितलं की, तुमचे हे हीन प्रकारचे चाळे आहेत त्याला उत्तर देण्यासाठी मला तुमच्या पातळीवर खाली यावं लागेल. कुलगुरूची ही खुर्ची त्यासाठी नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचे असेल ते करा. मी कुठल्याही प्रकोरे तुम्हाला उत्तर देणार नाही. पण, कायद्याने त्यांचा जो काही बंदोबस्त करायचा होता तो मी केला. त्यांची सगळी बंडं मी मुळातून मोडून काढली.
कर्नाटकी संगीतातला बंदिस्तपणा आणि ख्याल गायकीतलं स्वातंत्र्य
कर्नाटक संगीतात एक बंदिस्तपणा आहे. त्यांची ती बांधीलकी आहे. म्हणजे बंदिशीमध्ये त्यांच्या ज्या कृती आहेत, त्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला एका मर्यादेपर्यंतच वाव देऊ शकता. त्याउलट, उत्तर हिंदुस्थानी संगीतात ध्रुपद धमार मागे पडून ख्याल जास्त प्रचारात आले. कारण, ख्यालामध्ये स्वत:च्या कल्पनाशक्तीलासुद्धा वाव मिळाला, त्यामुळे ही गायकी जास्त प्रचारात आली. इथेही घराणेशाहीची एक चौकट आखून दिलेली आहे. ही मर्यादा घालून दिलेली आहे.. रागाचा विस्तारही तुम्ही या एवढय़ा मर्यादेत करायचा. पण, ही बंधनं पाळूनसुद्धा त्या गायकीत एक स्वातंत्र्य आहे. ख्याल गायकी म्हणजे काय तर बंधनातलं स्वातंत्र्य. हे बंधनातलं स्वातंत्र्य ज्या ज्या गायकीतील घराण्यांनी दिलं, ज्या विचारप्रणालींनी दिलं, त्या विचारप्रणाली जास्त प्रसृत झाल्या. तसं दाक्षिणात्य संगीतात होत नाही. त्यांचा बंदिस्तपणा आहे तसाच आहे. तुम्ही बघाल तर त्यांच्या गायन महोत्सवात कोणी एखादा व्यासपीठावर गात असेल तर तो जसा मांडीवर हाताने ताल धरतो तसाच ताल समोर बसलेल्या श्रोत्यांनीही धरलेला असतो. ते सगळे ती कृती गात असतात. म्हणजे त्यांच्या कृतीतलं जे एक बंदिस्तपण आहे तेच त्यांच्या प्रसारासाठी एक प्रकारे मारक ठरलं.
उत्तर पैदा करती है, दख्खन दाद देती है..
उत्तर भारतात कलांचा जन्म झाला पण प्रसार मात्र दक्षिणेत जास्त झाला. खाँसाहेब म्हणायचे, उत्तर पैदा करती है.. दख्खन दाद देती है. मी उत्तरेत बराच प्रवास केलेला आहे. उत्तरेत ज्या गोष्टीत पटकन यश मिळत नाही, त्या गोष्टींवर काम करायला आज तिथे कोणी तयार नाही. शिवाय, उत्तरेतली भौगोलिक परिस्थितीत आणि निर्माण झालेली ऐतिहासिक-राजकीय परिस्थिती यामुळे लोकांच्या मनात असुरक्षितता असायची आणि तिथे प्रचलित असलेल्या संगीतप्रकारामुळे कलाकारांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली होती. कलाकार होणे म्हणजे तुम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत अशी परिस्थिती होती. दुसरी गोष्ट अशी झाली की विद्येसाठी आणि अभ्यासासाठी पोषक असं स्वास्थ्य, तशी मनोभूमी दक्षिणेकडे जास्त होती. आपल्याकडे उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी-कर्नाटक संगीत असे दोन संगीतप्रवाह निर्माण झाले. दक्षिणेकडे घरटी एक कुठले वाद्य वाजवले जाई, एखादा नृत्यप्रकार शिकवला जाईल नाही तर गाणे तरी गायले जाईल. म्हणजे घरटी कोणीतरी कलेची ओळख असलेला कलाकार तुम्हाला सापडेल. तसे उत्तरेत होत नाही, कारण त्यांच्यासाठी आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे ध्येय झालेले आहे आणि अशा ठिकाणी कला कधीच रुजत नाही, तिचे संवर्धन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. मानसिंग तोमर वगैरे मंडळी होती, त्यांनी कलेची जपणूक आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पण, त्यांच्या काळातही त्यांना जी शिष्य मंडळी मिळाली ती तुम्ही बघाल तर दक्षिणेकडची होती, महाराष्ट्रातील होती.
आणखी एक म्हणजे संगीतात घराणेशाही होती, त्या घराणेशाहीत माझी विद्या माझ्या रक्तातील माणसाकडेच गेली पाहिजे अशी पूर्वी भावना असायची. माझी विद्या माझ्या घरातच राहिली पाहिजे, असा एक दंडक होता. बरं विद्येची शान तर अशी की, लग्नामध्ये जावयाला हुंडा म्हणून मी २५ राग दिले, शंभर राग दिले किंवा २०० बंदिशी दिल्या. याचा अर्थ असा की त्या २०० बंदिशी, ते २५ राग मी आयुष्यात कधीही गायचे नाहीत. म्हणजे घराणेशाहीतही विद्येवरची निष्ठा ही अशी होती. आणि ही विद्येची निष्ठा प्राणपणाने जपली गेली ती कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा अगदी मध्य प्रदेशातही कृष्णराव पंडितांसारखी जी मंडळी होती, त्यांनी विद्या ही आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठं धन मानले. हा विद्येबद्दलचा पूज्यभाव उत्तरेत असूनसुद्धा तिथे कलेची संवर्धन होण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे मग ही मंडळी दक्षिणेकडे आली.
संगीत हे प्रेमासारखे असतं..
व्याकरणात संगीत नोंदलं गेलं म्हणजे ते कमी दर्जाचं होतं, असं नाही. संगीतात कलाकाराची आंतरऊर्मी असते.. म्हणजे मला जेव्हा एखादा कॅनव्हास देऊन त्यावर काम करायला सांगितलं जातं तेव्हा त्या कॅनव्हासपुरतं मर्यादित होण्याचा प्रयत्न मी करते. पण, मला माहिती असतं की जर मला आणखी एक कॅनव्हास त्याच्या शेजारी मिळाला असता तर माझा जो स्ट्रोक आहे तो मला पूर्णत्वाला नेता आला असता. आता या एकाच कॅनव्हासमुळे माझ्या त्या स्ट्रोकची गती थांबल्यासारखी होते, ही जी संकल्पना आहे त्याचा ख्यालामध्ये उपयोग होतो.
आपण प्रत्येक वेळी जेव्हा मोझार्टच्या सिंफनी ऐकतो तेव्हा प्रत्येक जण आपापल्यापरीने अर्थ लावत असतात. ते नुसतेच लिहिलेले नोटेशन वाजवत नसतात. त्याचा जो प्रत्येकाला उलगडणारा गर्भितार्थ आहे तो महत्त्वाचा असतो. कुठलंच संगीत हे कमी दर्जाचं नसतं. संगीत हे प्रेमासारखे असतं. जसं लहानपणी केलेलं प्रेम हे त्या वेळेला तितकंच शंभर टक्के खरं असतं. तसंच मोठेपणी समजून घेऊन, आयुष्यातलं सत्त्व बरोबर घेऊन मग आलेलं प्रेमही तितकंच खरं असतं. मग ते प्रेम नुसतंच दैहिक असेल असं नाही. तर ते वाचनाचं प्रेम असेल, वस्तूवरचं प्रेम असेल, आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांवरचं प्रेम असेल. ते कोणत्याही वयात असलेलं प्रेम हे तितकंच खरं असतं. अगदी तसंच संगीताचं आहे.
राग हे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे
शास्त्रीय संगीताला घराणेशाहीची चौकट असली तरी त्या त्या घराण्यांची सौंदर्यपूर्ण वैशिष्टय़ आहेत. घराण्यामुळे दृष्टी संकुचित होणार नाही, याची काळजी घेत गात राहिले. तसंच गाण्याचं वैशिष्टय़ स्वरांच्या लगावात आहे. म्हणूनच प्रत्येक वेळी यमन ऐकला तरी त्याचा कंटाळा येत नाही. गाताना तो प्रत्येकाच्या लगावाच्या दृष्टीने बदलत जातो, त्या लगावात गोडवा आहे. वैशिष्टय़ आहे. शास्त्रीय संगीतातल्या रागांचही तसंच आहे. राग म्हणजे नुसतं व्याकरण नाही. ते एक्स्प्रेशन आहे. म्हणणं आहे.
पं. पलुस्करांमुळे संगीत मध्यमवर्गीय घरात आलं
पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची केलं होतं. शास्त्रीय संगीताचा प्रसार, प्रचार आणि शिक्षण हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. सभ्य घरांतील लोक त्या काळात संगीताकडे हिणकस नजरेने बघत. गाणं-बजावणं चांगलं नाही, ही त्या काळी ठाम समजूत होती. पं. पलुस्करांनी तत्कालीन समाजाला या मन:स्थितीतून बाहेर काढण्याचा जणू विडाच उचलला होता. माझ्या वडिलांचे ते गुरू! वडील शालेय शिक्षणात पाचवीपर्यंतच शिकले. मात्र पं. पलुस्करांकडे त्यांचे सर्वच बाबतीतील शिक्षण झालं. आपल्याकडे असलेल्या मुलांचा सगळा वेळ कामात किंवा अभ्यासात जावा, याकडे बुवांचं काटेकोर लक्ष असायचं. अल्लड वयातील मुलांना बरोबर घेऊन संगीताची दीक्षा देणं, हे त्याही वेळी कठोर काम होतं. पण बुवांनी या मुलांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी त्यांना इंग्रजी, गणित, संस्कृत आणि हिंदी या विषयांच्या शिकवण्याही लावल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच माझ्यासारख्या अनेक गायिका पुढे मुक्त कंठाने गाऊ शकल्या. कोणतीही कला ही एक शास्त्र, विद्या असते, ही शिकवण कदाचित बाबांना त्यांच्याकडूनच मिळाली. पुढे बाबांनी माझ्यावर त्याचप्रमाणे संस्कार केले. संगीताचा सखोल अभ्यास, त्याकडे पाहण्याची दृष्टी, ती कला म्हणजे विद्या आहे, तिला विद्येचे अधिष्ठान आहे, वगैरे सगळ्या गोष्टींचा आवाका वडिलांनीच समजावून दिला.
=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

'श्रुती' रंगी रंगले... भाग-१

व्हिवा लाउंजमध्ये सोमवारी ज्येष्ठ गायिका श्रुती सडोलीकर- काटकर यांनी रसिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या 'रामरंगी रंगले'च्या स्वरांनी प्रभादेवीचं पु. ल. देशपांडे मिनि थिएटर भारलं गेलं. श्रुतीताईंच्या स्वरांबरोबरच त्यांच्या विचारांनीही उपस्थित भारावून गेले.
श्रुती या नावातच संगीत!
शास्त्रीय संगीतात श्रुती या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वरांबरोबर येणाऱ्या श्रुतीही सांभाळून गाणाऱ्या गायकाला या क्षेत्रात खूप मान आहे. तोच धागा पकडून श्रुती सडोलीकर-काटकर यांना त्यांच्या नावाबद्दल विचारले असता, त्यांनी त्यांचे गुरू व वडील वामनराव सडोलीकर यांची आठवण सांगितली. वामनरावांना एकदा कोलकातामध्ये एका माणसानं विचारलं होतं की, तुमच्या मुलीचे नाव श्रुती कोणी ठेवले आणि का ठेवले? त्यावर वामनरावांनी त्यांना उत्तर दिले होते, 'श्रुती हे नाव मीच ठेवले आहे. माझी मुलगी गाणार याची मला खात्री होती आणि ती सर्व श्रुती सांभाळून गाणार, याची पूर्ण खात्री होती.'
हिंदुस्थानी संगीतातलं जयपूर-अत्रौली घराणं कठीण गायकीसाठी ओळखलं जातं. याच घराण्यातल्या श्रुती सडोलीकर-काटकर यांनी मात्र आपल्या आर्त स्वरांनी शास्त्रीय संगीत एकदमच हृदयाला भिडवलं. 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर त्यांनी संगीताबद्दलची आपली मतं आत्मीयतेनं मांडली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमात आपल्या गुरूंबद्दल बोलताना त्या भावविवश झाल्या. श्रुतीताईंचे गानविचार आणि एकूणच आयुष्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन या गप्पांतून ऐकायला मिळाला. वेळ संपली तरी श्रुतीताईंशी संवाद संपलेला नव्हता. गुरूंनी भरभरून दिलं, हे सांगणाऱ्या श्रुतीताईंना ऐकताना प्रेक्षकांचीही अवस्था घेता किती घेशील दो कराने, अशीच झाली होती.
अति कौतुक घातकच
सध्या रिअ‍ॅलिटी शोजच्या नावाखाली टीव्हीवर जे काही चालले आहे, ते संगीतासाठी मारक आहे. रिअ‍ॅलिटी शोमधून तुम्हाला चांगले गायक मिळू शकतात. मात्र संगीत ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. शिकणं ही मनाची अवस्था आहे. रिअ‍ॅलिटी शोजमधून मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे 'बन चुके' ही भावना मनात निर्माण होते. अशा शोजमधून चमकलेल्या मुलांचे पालक त्यांचं अति कौतुक करतात. या मुलांच्या वयात हे कौतुक  हवंहवंसंच वाटतं, पण हे अति कौतुकच त्यांच्या प्रगतीसाठी घातक ठरतं. या मुलांच्या अंगात गुण नक्कीच असतात, पण त्या गुणांना खतपाणी घालण्याची गरज आहे. नाहीतर चौथ्या वर्षीचं गाणंच ते १४ व्या वर्षी गात राहतात. त्या वयात पडती प्रतिष्ठा सहन होत नाही. म्हणून या मुलांना अधिकाधिक अभ्यास करू दे. पैसा त्यांना नंतरही मिळेल. पण हे वय अधिकाधिक शिकण्याचं आहे. त्यांच्या कलेला विद्येचं अधिष्ठान मिळणं गरजेचं आहे. या सगळ्यात पालकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. माझ्या सुदैवाने माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर कधीच माझे कौतुक केलं नाही. गुरूंनीही माझ्या पाठीवर शाबासकीची थाप खूप उशिराच मारली. वडील तर नेहमी म्हणायचे की, लहान मुलं टीपकागदासारखी असतात. घरात संगीत आहे त्यामुळे श्रुती लहान वयात गाते, हे काही फार आश्चर्य नाही. ज्या दिवशी ती स्वतचं म्हणून गाणं गाईल त्या दिवशी तिला बोलवा, असं ते सांगायचे.
करडय़ा शिस्तीचे संस्कार
गाण्याच्या बाबतीतील शिस्तीचं महत्त्व वडिलांनी मला खूप लहानपणी समजावून दिलं. अगदी अडीच-तीन वर्षांची असल्यापासून मी अत्यंत अनवट राग, मिश्र राग वगैरे गात होते. मात्र कधी कधी कंटाळा यायचा. वडिलांकडे मी कधी शिकायला म्हणून बसले नव्हते. मात्र त्यांच्याकडे एक मुलगी शिकायला येत असे. ती चुकली की मग पुढे काही गातच नसे. तिची भीड चेपावी म्हणून वडिलांनी मलाही तिच्याबरोबर शिकायला बसवले. गाताना मांडीवर हाताने ताल देणे, हे माझ्यासाठी खूपच कंटाळवाणे होते. एकदा मला खूपच कंटाळा आला होता म्हणून मी हात दुखत असल्याचा बहाणा केला. वडिलांच्या ते लक्षात आले. मात्र ओरडणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. त्यामुळे त्यांनी मला अगदी लाडाने जवळ बसायला बोलावले. 'माझ्या बाबाचा हात दुखतोय, अरेरे', असं म्हणत त्यांनी स्वत:च्या हाताने माझ्या मांडीवर जोरजोरात ताल द्यायला सुरुवात केली. बाबांचा हात खूप लागत होता, पण मीदेखील हट्टाने काही न बोलता तशीच गात राहिले. शिकवणी संपल्यानंतर तशीच दुखऱ्या पायाने खेळायलाही गेले. मात्र रात्री आईबाबांचा संवाद ऐकला आणि डोळ्यांत पाणी आलं. माझे बाबा त्या रात्री जेवले नव्हते. आईने त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले, 'ज्या हाताने मी माझ्या मुलीला मारलं, त्या हाताने मी आज कसा जेवू? पण या वेळी तिला शिस्तीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं होतं. नाहीतर पुढे तिलाच त्रास झाला असता.' या एका प्रसंगाने गाण्यातलीच नाही, तर एकंदरीत आयुष्यातही शिस्तीचं महत्त्व पटलं.
गुरुंचा विश्वास माझी पुण्याई
शास्त्रीय संगीताचे शिक्षण वडिलांकडे सुरू करण्याआधीपासूनच मला अनेक बंदिशी मुखोद्गत होत्या. त्यामुळे वडिलांचे अनेक स्नेही घरी येऊन मला एखाद्या रागातील बंदिश, तानापलटे वगैरे गायला सांगत. असेच गुलुभाई जसदनवाला वडिलांकडे आले. त्यांनी मला गाताना ऐकलं व म्हणाले, 'माझ्याकडे भरपूर विद्या आहे, पण ती विद्या मी द्यावी असा शिष्य काही सापडला नाही. तुमची मुलगी गाते, तर तिला माझ्याकडे गाणं शिकवायला पाठवाल का?' वडिलांनी हरकत घ्यायचा प्रश्नच नव्हता. माझं शिक्षण गुलुभाईंकडे सुरू झालं. गुलुभाई म्हणजे जबरदस्त असामी होते. ते केवळ संगीतातील गुरूच नव्हते, तर बडे व्यावसायिक होते. त्यांच्या पदरी रेसचे घोडे होते, भाताची शेती, बांधकाम वगैरे सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे होत्या. १६ ऑगस्ट १९६८ रोजी मी त्यांच्याकडे पहिला राग शिकायला सुरुवात केली. तो राग होता 'भूपनट'! त्या वेळी संगीतातील काहींनी त्यांच्यावर टीका केली होती. अनेकांना त्यांच्याकडे शिकायचे होते, मात्र त्यांनी कधीच कोणाला शिकवण्याचा विडा उचलला नाही. माझ्यासाठी ते खूप लोकांशी भांडले. त्यांनी मला १२ वर्षे सातत्याने शिकवले. जाण्याआधी त्यांनी मला शेवटच्या वेळी भेटायला बोलावले होते. त्या वेळी ते म्हणाले की, 'बाबा, आप हमारी जिंदगीमें बहोत देरसे आये. २५ साल पहले मिलते तो बहोत कुछ सिखाता था. अब अगली जिंदगी में मिलेंगे.' त्यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात त्याही वेळी पाणी आलं होतं. खरंच, माझी पुण्याई म्हणून मला असे गुरू लाभले. पुढल्या जन्मीही तेच गुरू म्हणून लाभावेत, अशी प्रार्थना करतेय.
सुशिक्षित कलाकार होणं महत्त्वाचं
शिक्षणानंतर माझ्या आईनेही एका चित्रपटात काम केले. मात्र आईचा भर शिक्षणावर होता. ती नेहमी म्हणायची की, अशिक्षित कलाकार होण्यापेक्षा सुशिक्षित कलाकार होणे मला जास्त आवडेल. कुरुंदवाडच्या सीताबाई पटवर्धन हायस्कूलात जाणारी ती पहिली मुलगी होती. विशेष म्हणजे त्या वेळी शाळेत आईशिवाय सगळी मुलंच शिकत होती. मात्र आईच्या मॅट्रिकचा रिझल्ट लागला, तेव्हा संपूर्ण शाळेमधून ती एकटीच पास झाली होती. १९७४मध्ये आई गेली. १९७६ला शाळेचा सुवर्णमहोत्सव साजरा करायचा होता. त्या वेळी त्या शाळेतील काही ज्येष्ठ शिक्षक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितले की, त्या वर्षी तुमच्या आई पास झाल्या नसत्या, तर शाळा बंद झाली असती. वडिलांमुळे गाण्याची शिकवण, तर आईमुळे शिक्षणाची परंपरा आमच्या घरात आली. वडील पलुस्कर आाणि भुर्जी खाँसाहेब यांचे शिष्य! उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांनीही त्यांना पुढे तालीम दिली. त्यामुळे दोन्ही घरांमध्ये खानदानीपण आणि संस्कार ठासून भरले होते. वडिलांचं शिक्षण फार झालं नव्हतं. मात्र त्यांचं वाचन दांडगं होतं.  मला आठवतं की, घरी एखादी गोष्ट बांधून आणलेला कागदही ते टाकून देण्याआधी वाचत असत.
गळ्यात 'शुगर' पण फॅक्टरी नाही
श्रुती सडोलीकर-काटकर यांचे वडील कोल्हापूरातील एका साखर कारखान्याचे मालक होते, असा उल्लेख इंटरनेटवरील एका संकेतस्थळावर त्यांच्याबद्दलच्या माहितीत केला आहे. पण हे खरं नाही, असं स्पष्टीकरण श्रुतीताईंनी 'व्हिवा लाउंज'च्या मंचावर केलं. श्रुतीताईंचे वडील कोल्हापूरचे. त्या काळात कोल्हापूरमध्ये संगीत, नाटय़ आणि चित्रपट या कलांना प्रोत्साहन होते. कोल्हापूरमध्ये राममोहन लोहिया यांचा कोल्हापूर साखर कारखाना होता. लोहिया हे स्वत: नाटय़प्रेमी होते. त्यामुळे त्यांनी साखर कारखान्यात 'जीवन कल्याण' नावाचा एक विभाग सुरू केला होता. या विभागामार्फत नाटके बसवली जात. बहुतांश वेळा ती बसवण्याचे किंवा संगीत दिग्दर्शनाचे काम श्रुतीताईंचे वडील करत असत. त्यामुळे त्यांचा संबंध या साखर कारखान्याच्या मालकीशी जोडला गेला असावा, असा कयास श्रुतीताईंनी व्यक्त केला. गळ्यात थोडीफार मिठ्ठास असली, तरी साखर कारखान्याची मालकी वगैरे श्रीमंती घरात नव्हती, असं त्या म्हणाल्या.
संस्कारांची श्रीमंती वारसाहक्काने
माझा जन्म कुरुंदवाडला झाला. माझ्या आईचं माहेर कुरुंदवाड! त्या गावात ज्या घरात माझा जन्म झाला त्या घरासमोरील घरात उस्ताद रहिमतखाँ राहायचे. त्या घराच्या कट्टय़ावर बसून ते रियाज करायचे. आमच्या घरी आई आणि वडील हे दोघेही शास्त्रीय संगीताचे चाहते होते. वडील तर पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्या पहिल्या काही शिष्यांपैकी एक! त्यामुळे गाण्याचे संस्कार जन्माच्याही आधीपासून होत होते. आईच्या आणि वडिलांच्या दोघांच्याही घरांत संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य यांना पोषक वातावरण होते. आईची एक बहीण, आम्ही तिला तानीबाई म्हणायचो, ती उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांची शिष्या. एका आजारामुळे ती लवकर गेली. त्या वेळी उस्तादजी म्हणाले होते की, 'आज अल्लादियाँ गुजर गया है.. केसरको (केसरबाई केरकर) हमनें अपनी गायकीका चार आना भी नहीं दिया. लेकीन तानी हमारी गायकीका सोला आना लेके चली गयी.' सांगायचा मुद्दा, संगीताचे संस्कार गर्भावस्थेत होते, तेव्हापासूनच होत होते. प्रभात कंपनीतही आमचे शेअर्स होते. प्रभात कंपनीच्या चार-पाच मालकांपैकी एक म्हणजे केशवराव धायबर! ते म्हणजे माझ्या आईच्या आत्याचे पती! माझी एक मावशी वासंती म्हणजे पहिली बाल सिनेतारका! 'कुंकू', 'धर्मात्मा' वगैरे चित्रपटांत तिने काम  केलं होतं.

=======================================================================
सदर लेख शुक्रवार, २६  जुलै २०१३ च्या लोकसत्ताच्या 'व्हिवा' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार

Monday, July 22, 2013

रागदारी आणि वसंत देसाई


वसंत देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता ९ जूनरोजी आहे. त्या निमित्ताने, चित्रपट संगीतात देसाईंनी आणलेल्या अनवट मिश्र रागांचा, रागदारी संगीताचा चित्रपटातील समूहगानासाठी वापर करण्याच्या प्रयोगाचा आणि अनेक अभिजात गायक-वादकांना उपयोजित संगीताकडे वळवण्याच्या वसंत देसाईंच्या कर्तृत्वाचा हा मागोवा..
जुन्या जमान्यातले दिग्गज गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे 'मियाँ की मल्हार' हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. ज्या काळात तबकडय़ा नुकत्याच बाजारात येऊ लागल्या होत्या. त्या काळात वझेबुवांनी 'बोले रे पपीहरा' ही 'मियाँमल्हार' रागातली रचना ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने प्रसृत केली. वझेबुवांच्या या ध्वनिमुद्रिकेत खटका, गमक आणि मीड हे रागदारी संगीतात अत्यावश्यक समजले गेलेले आवाजाचे लगाव आहेत आणि त्यातूनच 'मियाँमल्हार' रागाचं रूप अधिकाधिक खुलत जातं. ही रचना चित्रपटगीताच्या रूपाने जनप्रिय करण्याचं श्रेय मात्र वसंत देसाईंना द्यायला हवं. 'गुड्डी' या चित्रपटासाठी वाणी जयराम यांच्या आवाजात देसाईंनी ती स्वरबद्ध केली. नाही म्हटलं तरी वझेबुवांची रचना आणि तिची लोकप्रियता रागदारी संगीताच्या श्रोतृवर्गापर्यंतच मर्यादित होती. वसंत देसाईंमुळे 'बोले रे पपीहरा' ही बंदिश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचली.
 वसंत देसाईंच्या जन्मशताब्दीचं वर्ष सुरू झालं आणि संपूनही जाईल. या वर्षांत वसंत देसाईंच्या संपूर्ण कारकीर्दीची झलक दाखविणारं आणि त्यांच्या प्रकाशित आणि अप्रकाशित चित्रपटगीतांच्या खजिना मोकळा करणारं संकेतस्थळ (www.vasantdesai.co) २२ डिसेंबर या त्यांच्या स्मृतिदिनी सुरू करण्यात आलं, एवढीच वर्षभरातली रसिकांची 'मिळकत'. वसंत देसाईंनी मराठी चित्रपटांना संगीत तर दिलंच पण ते तिथे अडकून राहिले नाहीत. सी. रामचंद्रानी ज्याप्रमाणे िहदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळात आपल्या वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या ठसा उमटविला, तसाच वसंत देसाईंनीही 'झनक झनक पायल बाजे', 'गूंज उठी शहनाई' किंवा 'दो आँखे बारह हाथ' आणि 'गुड्डी' यासारख्या चित्रपटांच्या घवघवीत यशात आपल्या सुरेल संगीताद्वारे मोठीच भर घातली.
'पंडितराज जगन्नाथ' या नाटकाला वसंत देसाईंनी संगीत दिलं त्यातून 'कलावती' हा कर्नाटक संगीतातला राग महाराष्ट्राला परिचित झाला. प्रसाद सावकारांच्या खडय़ा आवाजातील 'जय गंगे भागीरथी' हे पद वास्तविक 'कलावती' आणि 'बसंत' या दोन रागांच्या मिश्रणातून वसंतरावांनी निर्माण केले आहे. परंतु त्यातला अधिक लक्षात रहातो तो राग 'कलावती'. त्यानंतर हा राग महाराष्ट्राच्या मातीत रुळला आणि भावगीतांमधूनही तो प्रकट होऊ लागला. 'स्वयंवर झाले सीतेचे' या चित्रपटासाठी त्यांनी भीमसेन जोशींच्या आवाजात 'रम्य ही स्वर्गाहून लंका' हे गीत गाऊन घेतले होते. हे गाणे अत्यंत लोकप्रिय झाले आणि रागदारीचा गंधही नसणारा श्रोता ते आपुलकीने गुणगुणत असे. वास्तविक हे गाणे 'िहडोल बहार' या रागावर आधारित आहे. 'िहडोल' हा मुळात कठीण मानण्यात येणारा राग आहे. कारण त्यात फक्त चार स्वर लागतात. त्यात 'बहार' मिसळून हा राग जुन्या काळात उस्तादांनी बनवला. भीमसेन जोशी हे सिद्ध रागांचे बादशहा होते. त्यांच्या उमेदीच्या काळात तर ते सहसा 'मिश्र' अथवा 'अछोप' रागांच्या वाटेला जात नसत. पण वसंत दसाईंनी हे गाणं त्यांच्याकडून गाऊन घेतले आणि ते जनमानसात थेट जाऊन बसले.
'देव दीनाघरी धावला' या नाटकासाठी वसंत देसाईंनी कुमार गंधर्वाकडून 'उठी उठी गोपाळा' ही भूपाळी गाऊन घेतली. 'अमरभूपाळी' या मराठी चित्रपटातली 'घनश्याम सुंदरा' ही भूपाळी पंडितराव नगरकर आणि लता मंगेशकर यांनी गायली होती. सुमारे साठ वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रित झालेली ही भूपाळी आजही तितक्याच भक्तिभावाने आणि चवीने ऐकली जाते. 'भूपाळी' म्हणजे 'घनश्याम सुंदरा' असे जणू समीकरणच बनले आहे. तरीही याच संगीत दिग्दर्शकाने रचलेल्या 'उठी उठी गोपाळा' या भूपाळीची लज्जत काही औरच म्हटली पाहिजे. वसंत दसाईंनी भीमसेन जोशी आणि कुमार गंधर्वाप्रमाणेच अमीर खान या रागदारी संगीताच्या क्षेत्रातल्या महान कलाकाराच्या आवाजाचा उपयोग आपल्या संगीताची शान वाढविण्यासाठी केला. 'झनक झनक पायल बाजे'चे बहुचर्चित शीर्षक गीत अमीर खान खाँसाहेबांनी गायले आहे. मुळात हे गाणे अमीर खान खाँसाहेबांच्या मंद्र सप्तकात चनीत विहार करणार्या आवाजाला अनुरूप अशा 'दरबारी' रागात ध्वनिमुद्रित झाले होते. व्ही. शांताराम वगळता सर्वाना ते अतिशय पसंत पडले होते. पण शांतारामांचे मत लक्षात घेऊन वसंतरावांनी ते पुन्हा ध्वनिमुद्रित करायचे ठरविले. मात्र यावेळी 'दरबारी' मंद्रप्रधान रागाऐवजी 'अडाणा' हा उत्तरांगप्रधान राग निवडला आणि अमीर खान खाँसाहेबांनी जलद तानांची बरसात करून या गीताचे सोने केले.
दिग्गज गायकांप्रमाणे अत्यंत प्रतिभावान वादकांनाही त्यांनी आपल्या संचात गोवले. 'गूंज उठी शहनाई'मधून बिस्मिल्ला खान खाँसाहेबांची शहनाई अक्षरश घराघरात पोचली. त्यांचे वादन समारोहामधून होत असे तेव्हा सामान्य श्रोते 'गूंज उठी'ची फर्माईश करीत आणि खाँसाहेबही ती मान्य करीत असत. सतारनवाझ अब्दुल हलीम जाफर खान यांनीही 'झनक झनक' च्या पाश्र्वसंगीतातला संपन्न करण्यात मोठी भूमिका बजावली. या चित्रपटाने गर्दीचे सर्व उच्चांक मोडले होते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी खेळानिमित्ताने 'लिबर्टी' चित्रपटागृहात हलीम जाफर खान यांचे सतारवादन अहमदजान थिरकवाखाँसाहेबांच्या तबला संगतीसह आयोजित करण्यात आले होते असे जाणकार सांगतात. शिवकुमार शर्मा आणि सामताप्रसाद हे वादकही 'झनक'मुळे प्रथम चमकले.
रागावर आधारित रचना आणि तीही समूहगानाच्या रूपाने साकार करणे हा वसंत देसाईंचा हातखंडा होता. 'केदार' रागातली 'हमको मन की शक्ती देना' ही रचना ('गुड्डी' :  वाणी जयराम आणि इतर) इतकी लोकप्रिय झाली की शाळाशाळांमधून प्रार्थना म्हणून ती गायली जाऊ लागली. 'दो आँखे बारह हाथ' मधले 'ऐ मालिक तेरे बंदे हम' या प्रार्थना गीताला 'मालकंस' रागाचा आधार आहे. या गीताने तर सीमेपलीकडच्या पाकिस्तानातही लोकप्रियता मिळविली. भारतातीलच नव्हे तर पाकिस्तानातील तुरुंगांमध्येही प्रार्थना गीत म्हणून गाणं गायले जाऊ लागले. रागदारी संगीताला लोकाभिमुख करण्याबाबत वसंत देसाईंनी जे योगदान दिले आहे त्याची उचित गांभीर्याने दखल घ्यायला हवी.
=======================================================================
सदर लेख रविवार,  ९ जुन २०१३ च्या लोकसत्ताच्या 'विशेष' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार