Wednesday, April 27, 2011

माधव गुडी

किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित माधव गुडी यांचे अकाली निधन होणे ही संगीताच्या आणि विशेषत: किराणा घराण्याच्या दृष्टीने दु:खकारक घटना आहे. ‘कर्नाटक भीमसेन’ म्हणून माधव गुडी यांनी आयुष्यभर संगीताची सेवा केली. गुरू भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर असलेली त्यांची भक्ती हा भारतीय संगीत संस्कृतीमधील एक आदर्श म्हणावा असा अध्याय आहे. जगात फक्त भारतीय संगीतातच नवनवोन्मेषी प्रतिभेला प्रत्यक्ष सादरीकरणात महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कला सादर करत असताना जे सुचते, ते तिथेच व्यक्त करण्याची मुभा कोणत्याही कलावंतासाठी आव्हानात्मक असते. आपली प्रतिभा सतत जागती ठेवणे आणि तिला सतत वृद्धिंगत करणे हे भारतीय संगीतातील प्रत्येक कलावंताचे कर्तव्यच समजले जाते. त्यामुळेच या कलेच्या प्रांतात गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण असते. माधवराव गुडी यांनी आपल्या गुरुच्या चरणी आपले सारे सर्वस्व अर्पण केले आणि त्यामुळे त्यांना संगीतात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करता आले. सततचे दौरे आणि मैफली यामुळे मैफली गवयांना शिष्य तयार करण्यास वेळ मिळत नाही. समोर बसवून तालीम घेण्याएवढी फुरसत मिळत नसल्यामुळे शिष्याला गुरूच्या सहवासातून मिळवावे लागते. गुडी यांनी भीमसेनजींचे शिष्यत्व पत्करल्यापासून ते त्यांच्यासोबत सावलीसारखे राहिले. माधव गुडी यांनी भीमसेनी शैलीचा नीट अभ्यास करून ती आत्मसात केली आणि आपल्या गायकीवर भीमसेनी मोहोर उमटविण्यात यश मिळवले. भीमसेनजींनीच ‘शिष्योत्तम’ अशी पदवी देऊन माधवरावांचे कौतुक केले होते. सरळ मनाचा आणि सतत स्वरात डुंबलेला हा कलावंत आयुष्यभर अजातशत्रू राहिला. भारतीय संगीतात उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक अशा संगीताच्या दोन समांतर परंपरा आहेत. या दोन्ही परंपरांना देदीप्यमान असा इतिहास आहे. कर्नाटकात राहून तेथील कर्नाटक संगीत शैलीचे अनुकरण न करता उत्तर हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याची शैली आत्मसात करण्याच्या माधव गुडी यांच्या प्रयत्नांना सवाई गंधर्व, गंगुबाई हनगळ आणि भीमसेन जोशी यांची परंपरा होती. वडील कीर्तनकार असल्याने माधव गुडी यांच्यावर स्वरांचा संस्कार लहानपणीच झाला. भीमसेनजींकडे गायन शिकायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शैलीतील सारे बारकावे सूक्ष्मतेने टिपले आणि आपल्या गळ्यात उतरवले. पंडितजींबरोबर सारा देश हिंडणाऱ्या शिष्यांमध्ये माधवराव अग्रेसर होते. कर्नाटक कला तिलक, गायन कला तिलक, गानभास्कर, अमृता प्रशस्ती, संगीत साधक, संगीत रत्न, यशवंतराव चव्हाण पुरस्कार असे अनेक पुरस्कार माधव गुडी यांना मिळाले. भारतातील अनेक संगीत परिषदांमधून त्यांचे सतत गायन झाले. अलीकडच्या काळात गळा रुसला असला, तरीही माधवरावांनी आपली संगीत साधना सुरूच ठेवली होती. भीमसेनजींच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य श्रीकांत देशपांडे आणि आता माधव गुडी यांच्या निधनाने किराणा घराणे शोकाकुल होणे स्वाभाविकच आहे.
===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, २५ एप्रिल २०११ च्या लोकसत्ताच्या 'व्यक्तिवेध' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

Monday, March 21, 2011

मारवा


मी वसंताचा पेटीवाला. अनेक वर्षे साथ केली आहे. असंख्य मैफली आठवतात. नागपूरला रात्रभर गाणे झाले. सकाळी बाबूरावजी देशमुखांकडे चहा घेऊन अकराची गाडी गाठायची म्हणून गेलो. गाडीला दोन तास अवकाश होता म्हणून तंबोरे जुळवले, संध्याकाळी सहा वाजता मैफली संपली. तोडीने सुरू झालेली मैफल पुरिया धनाश्रीने संपली. तोपर्यंत नागपूरची गाडी मुंबईअच्या अर्ध्या वाटेवर पोहोचली होती. पार्ल्याला तर आम़च्या आणि आमच्या स्नेह्यांच्या घरी वसंताच्या अनेक बैठकी झाल्या. वातावरण गार झाले. वसंत बापट, नंदा नारळकर, माझे बंधू, शरू रेडकर अशी वसंताला आज अनेक वर्षे गवई मानणारी मित्र मंडळी होती. पुन्हा गवसणीतले तंबोरे निघाले आणि तीन वाजता भटियारा सुरु झाला. मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग! हा राग वसंता अति आत्मीयतेने गातो. एक जागा पुन्हा नाही असली अचाट विवीध. गझल गायला तर बेगम अखतर सलाम करुन दाद देतात. थिरखवासाहेब 'गवय्या' मानतात. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, त्याच्या गुणावर लुब्ध. विद्याहरणातली अभिजात गायकीवर रचलेली गाणी एखाद्या नवख्या विद्द्या्र्थींची नम्रतेने स्वत: ज्योत्स्नाबाई भोळे शिकतात. चंपुताईंच्या घरची मैफल वसंताशिवाय सजत नाही. इतकेच कशाला पण आमच्या सारख्यांच्या आग्रहामुळे त्याने गांधर्व महाविद्यालयाची संगीतातली सर्वोच्च पदवी मिळवली. वसंता आता डॉ. देशपांडे आहे. पण आकाशवाणीला त्याचे हे खानदानी संगीतातले स्थान मान्य नाही.
वसंत देशपांड्याचा आकाशवाणी वर अभिजात संगीत गाणारा कलावंत होण्याचा प्रश्न बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नासारखा कधीपासून लोंबतो आहे. ज्या अधिकार्‍यांनी तो सोडवायचा त्यांनी कोणाच्या भीतीने तो डावलला आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांच्या गल्लीत ताल नाही आणि मोहल्ल्यांत सूर नाही असे गायक-गायिका आकाशवाणीवर नित्य नियमाने राग-रागिण्या नासत बसलेल्या असतात आणि वसंतराव देशपांड्यांना मात्र तिथे स्थान नाही. ह्याचे मला वाटते एकच मुख्य कारण की वसंताला घराण्याचा टिळा नाही. वसंताचे दुर्दैव हे की की तान गळ्यात यायला बर्‍याच लोकांना तास तास घासत बसावे लागते ती वसंताला क्षणात येते. स्वर टिपण्याच्या बाबतीतली त्याची धारणा किती अलौकिक आहे ह्याची साक्ष महाराष्ट्रातले सगळे म्युझिक डायरेक्टर्स देऊ शकतील. अनवट राग असो, लावणी असो, वसंतराव ब्लॉटिंग-पेपरसारखी सुरावट टिपतात. वसंताचा एकच मोठा दोष की संगीतात हिंदूही नाही यवनही नाही. 'न मी के पंथाचा' म्हणणार्‍या केशवसूतांसारख्या सूरांच्या साकल्याच्या प्रदेशातला हा पांथस्थ आहे. कारकुनाच्या मर्यादशीतलेने घरगिरस्ती चालवणारा वसंता दोन तंबोर्‍यांच्या मध्ये मात्र स्वत:च्या खयाले चालवणारा आहे. तिथे त्याची कलंदरी दिसते. समोरच्या श्रोत्यांवर प्रेम जमले की गंमत म्हणून वसंता नकला करील. नाना गमती करील, पण तिथेही ह्या विदुषकीमागे दडलेली विद्वत्ता लपत नाही.

Wednesday, February 23, 2011

एकवार पंखावरुनी...बाबुजी..

आज परत तो दिवस उगवला..आणि माझ्या आठवणींमधली एक एक गाणी मनात रुंजी घालू लागली...एवढ्यातच अण्णांच आपलं पृथ्वीतलावरचं घरटं देहरुपानं सोडुन गेले तेव्हा मनात दुखा:शिवाय काहीही नव्हतच, त्यातच माझं अत्यंत आवडतं गाण समोर आलं नी माझे ढसाढसा अश्रु ओघळु लागले...

केवढा तो अर्थ. गदिमांचा परिसस्पर्श झालेलं हे गाणं आणि बाबुजींचा टिपेला पोहोचलेला स्वर...क्या केहने..

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात |
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात ||

काय म्हणतो बघा हा कवी....देवा, एकदा तरी तुझा मायेचा हा हात माझ्या पाठीवरुन फिरु दे..
मला माहीत आहे की माझं शेवटचं घरटं हे तुझ्याच अंगणात असणार आहे... ह्या रुपकाला काय दाद द्यायची..?

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो|
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात ||

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही |
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात ||

कवी म्हणतो..देवा संपुर्ण जग फिरलो...कितीतरी प्राणी,पक्षी मित्र केले पण शेवटी काळजात तुझ्याशिवाय कुणीच नव्हते. सगळीकडे तुझीच सोबत होती. कितीतरी ऊनपावसाचे खेळ पाहिले आणि झेलले तरी तुझा सहवास सिटला नाही..देवा आतातरी जवळ घे..

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी |
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत ||

ह्यापुढे कवी काय म्हणतो बघा...जेव्हा सर्वांग सुंदर मोर पिसांचा पसार करुन वनात तुझ्यासमोर नाचतो तेव्हा त्या भाग्यवंतांना सुद्धा तुझा सहवास लाभला आहे....देवा आता मला कधी रे तुझा सहवास मिळणार?

शेवटच्या आर्त ओळीतर गदिमांच्या प्रतिभेचा अत्युच्च बिंदुच म्हणला पाहिजे...

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ? |
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात ||

ते म्हणतात, ह्या अथांग आणि असीम जगात जेव्हा फक्त सगळ्यांना सुंदर, सुस्वरुप, उत्तम वाणी आणि हुशार लोक जवळ हवे असतात तेव्हा तिथे माझ्यासारखा दुर्बळ तुझ्या नजरेस पडेल का रे? कारण, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काम करावं लागेल ते करताना माझ्या हातुन कुठलीही लहानशी सुद्धा चुक, पाप घडु देऊ नकोस, देवा..नाहीतर त्या मलीन झालेल्या तन-मनाने शेवटी तुझ्या दारात, मंदिरात तरी कसा येऊ रे?

मित्रहो, आपले गदिमा आणि बाबुजींची ही कलाकृती हृदयात जपुन ठेवावी अशीच....

त्याच जोडीला रमेश देव आणि सीमा देव यांचा नुसत्या चेहरा आणि डोळ्यांचा सुरेख अभिनय...बाजुला असलेले विवेकानंदाची मुर्ती आणि साईबाबांचा फोटो हे ह्या गीताला साजेसं साधं वातावरण...

एकंदरीत मित्रहो, भट्टी जमली. ही भट्टी शेवटी सहजतेनं आणि कुठलाही भपकेबाज नसलेली आहे त्यामुळे त्याला मरण नाही....
===============================================================

Friday, February 18, 2011

पंडित भीमसेन जोशीं


‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’
शास्त्रीय संगीतातले गायक आणि फिल्मी दुनियेतले पाश्र्वगायक यांच्यात जेव्हा चित्रपटासाठी जुगलबंदी होते तेव्हा बाजी मारणारे मोहम्मद रफी आणि मन्ना डे असतात आणि मात खाणारे अमीरखॉं किंवा भीमसेन जोशी असतात, असं गमतीनं म्हटलं जातं. कारण काय असेल ते असो, पण पडद्यावरच्या नायकाला (वा नायिकेला) ज्याचा आवाज असतो तोच गायक (वा गायिका) जिंकणार हा जणू अलिखित नियम असावा. म्हणून तर ‘केतकी गुलाब जूही’ (बसंत बहार) या गाण्यात पंडित भीमसेन जोशींना मन्ना डेसमोर हार पत्करावी लागते, ‘बाट चलत नयी चुनरी रंग डारी’ (रानी रूपमती) या भैरवीमध्ये कृष्णराव चोणकरांना मोहम्मद रफीसमोर पराभूत व्हावं लागतं आणि ‘तिनक तिन तानी .. दो दिन कीजिंदगानी’ (सरगम) या लता मंगेशकरांसोबतच्या गाण्यात सरस्वती राणे यांना ‘विनोदी गायिके’ची भूमिका स्वीकारावी लागते. असो. शास्त्रीय संगीत आणि चित्रपट संगीत यांच्यात अढी निर्माण व्हायला हे असले प्रकार कारणीभूत ठरले असावेत. ‘बैजू बावरा’मधल्या जुगलबंदीसाठी एके काळी नौशाद यांना नकार देणाऱ्या बडे गुलामअली खॉँ यांनी पुढे ‘मुगल-ए-आझम’साठीही किती आढेवेढे घेतले आणि मग पाश्र्वगायनाला तयार होताना आपली किंमत कशी वसूल करून घेतली, त्याचे किस्से सर्वश्रुत आहेत. चित्रपटांतल्या गाण्याविषयी कोणताही आकस न ठेवता वा स्वत:चा बडेजाव न मिरवता पूर्णपणे समर्पित होऊन गायन करणारे दोन गायक जुन्या पिढीत होऊन गेले. पहिले उस्ताद अमीर खॉँ आणि दुसरे पंडित भीमसेन जोशी.
‘बसंत बहार’ (१९५६) हा चित्रपट शंकर जयकिशन या जोडीला मिळाला तेव्हा त्यांच्यासमोर नौशाद यांच्या ‘बैजू बावरा’चं आव्हान होतं. ‘बैजू बावरा’ मध्ये तानसेन आणि बैजनाथ यांच्यातल्या ‘आज गावत मन मेरो’ या जुगलबंदीसाठी उस्ताद अमीर खॉँ आणि डी. व्ही. पलुस्कर यांनी पाश्र्वगायन केलं होतं. ‘बसंत बहार’साठी तशीच एक जुगलबंदी करण्याची वेळ आली तेव्हा शंकर जयकिशन यांनी शास्त्रीय संगीतात नव्यानंच तळपू लागलेल्या भीमसेन जोशींना पाचारण केलं आणि त्यांचा मुकाबला ठेवला तो मन्ना डे यांच्याशी. भीमसेन जोशी यांनीच ऐकवलेल्या एका जुन्या बंदिशीवरून शंकर यांनी या गाण्याची चाल बनवली. त्यावर शैलेंद्र यांनी लिहिलेले शब्द होते-
केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
ॠतु बसंत अपनो कंत गोरी गरवा लगाए
झूलना में बैठ आज पी के संग झूले..
भीमसेन यांच्यापेक्षा दोन वर्षांनी ज्येष्ठ असूनही हे गाणं गायच्या नुसत्या कल्पनेनंच मन्ना डे यांची कशी घाबरगुंडी उडाली आणि भीमसेनना ‘हरवायचं’ आव्हान मन्ना डे यांनी कसं पेललं ते सर्वश्रुत असल्यानं पुनरावृत्ती नको. मात्र, आवर्जून सांगायला हवं ते भीमसेन जोशी यांच्या दिलदार वृत्तीबद्दल. आपला आवाज नायकावर नव्हे तर एक खलपात्रावर चित्रित होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला हरावं लागणार आहे, ही बाब भीमसेन यांनी कोणत्याही तक्रारीविना मान्य केली. एवढंच नव्हे, तर रेकॉर्डिग झाल्यावर मन्ना डे यांना ‘तुमची तयारी चांगली आहे, तुम्ही शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात का येत नाही,’ अशा शब्दांत दादही दिली.
‘बसंत बहार’ नंतर भीमसेनजींचा स्वर हिंदी चित्रपटांत पुन्हा एकदा जोरकसपणे उमटला तो अमोल पालेकर दिग्दर्शित ‘अनकही’ (१९८४) मध्ये. यातली दोन भजनं गाण्यासाठी भीमसेन यांना कसं बोलावण्यात आलं, याविषयी पालेकर यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. या चित्रपटाची नायिका मानसिकदृष्टय़ा रोगी असते आणि तिचे वडील शास्त्रीय संगीतातले फार मोठे गायक असतात. अनिल चटर्जी साकारत असलेल्या या भूमिकेसाठी दोन भजनं करावीत असं अमोल पालेकर आणि संगीतकार जयदेव यांच्यात ठरलं. ही भजनं कोणा गायकाकडून गाऊन घ्यावीत यावर खल सुरू असताना जयदेव म्हणाले, ‘‘या व्यक्तिरेखेचा विचार करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखाच गायक हवा.’’
भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा तर मग भीमसेनच का नकोत? झालं, पालेकरांनी जयदेवजींची अनुमती घेऊन थेट पंडितजींना फोन लावला. ‘पंडितजी, एका कामासाठी भेटायला यायचंय. कधी येऊ?’ सुदैवानं पंडितजींचा अमोल पालेकरांवर विलक्षण लोभ होता. ‘‘तुम्हाला भेटायला परवानगी कशाला हवी? असं करू, उद्या मी दौऱ्यावर जाणार आहे. मुंबईला विमानतळावरच थोडा वेळ भेटू या,’’ पंडितजी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी विमानतळावरच्या पार्किंगमध्ये पालेकरांच्या मोटारीत या दोघांची भेट झाली. ‘एक सिनेमा करतोय ‘अनकही’ नावाचा. तुम्ही त्यासाठी दोन भजन गावीत एवढीच विनंती आहे..’ पालेकरांनी विषयाला हात घातला. कथा, व्यक्तिरेखा ऐकून घेतल्यानंतर पंडितजींनी विचारलं, ‘म्युझिक कोण देतंय?’ पालेकरांनी ‘जयदेव’ असं सांगताच कानाच्या पाळीला हात लावत पंडितजी उद्गारले, ‘फार मोठा संगीतकार आहे. मी जरूर गाईन. फक्त माझी एक अट आहे. जयदेवजींनी मला गाणं नीट शिकवायला हवं. माझी नीट तालीम त्यांनी करून घ्यावी.’
पालेकरांनी या भेटीचा वृत्तान्त सांगितला तेव्हा जयदेवजींच्या डोळ्यांत पाणीच तरारलं. तेही तयारीला लागले. ‘रघुवर तुमको मेरी लाज’ आणि ‘ठुमक ठुमक पग’ ही दोन भजनं भीमसेन यांच्यासाठी त्यांनी बनवली. गाण्यांची तालीम पालेकर यांच्याच घरी झाली. ‘मी तुमचा नवखा शिष्य आहे, असं समजून मला शिकवा. गाण्यातली प्रत्येक जागा न जागा मला समजावून सांगा,’ असं पंडितजींनी जयदेवजींना निक्षून सांगितलं. जवळजवळ दोन तास तालीम चालली.
प्रत्यक्ष रेकॉर्डिगच्या दिवशी भीमसेनजी ठरल्या वेळी स्टुडिओमध्ये आले. ‘अनकही’साठीच आशा भोसले यांच्या आवाजातल्या एका गाण्याचं रेकॉर्डिग नुकतंच संपलं होतं. त्या दोघांची समोरासमोर भेट झाली तेव्हा आशाताईंनी पंडितजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सुरू झाली भीमसेन यांच्या रेकॉर्डिगची तयारी. ‘मी उभा राहून गाऊ शकत नाही, बसूनच गाईन’ असं त्यांनी सांगितल्यानं स्टुडिओमध्ये त्यांच्यासाठी तशी बैठक तयार करण्यात आली. वादक मंडळींमध्ये शिवकुमार शर्मा (संतूर), हरिप्रसाद चौरसिया (बासरी), झरीन दारूवाला (सरोद) अशा नामवंतांचा समावेश होता. वादक आणि गायक या सर्वाचं एकत्रिपणे रेकॉर्डिग करण्याचा तो काळ होता. पंडितजींनी दोन्ही भजनं तन्मयतेनं गायली. रेकॉर्डिग संपल्यानंतर भीमसेनजी म्हणाले,‘‘तुमच्या मनासारखं झालं ना गाणं? नाही तर पुन्हा एकदा करू.’’ जयदेवजी आणि पालेकर यावर काय बोलणार? दोघेही भारावून जाण्यापलीकडच्या अवस्थेत होते.
‘अनकही’ला त्या वर्षीचे दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. एक जयदेव यांना, तर दुसरा अर्थातच भीमसेनजींना. अभिनंदनाचा स्वीकार करताना पंडितजी पालेकर यांना म्हणाले,‘‘खूप छान वाटलं या गाण्यामुळे. एक वेगळं पारितोषक तुम्ही मला मिळवून दिलंत.’’
===============================================================
सदर लेख बुधवार, रविवार ३० जानेवारी २०११ च्या लोकसत्ताच्या 'लोकरंग' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.

केसरबाई-१०

मी त्यांचे शेवटले गाणे 1966 साली ऐकले. त्यांचीही मला वाटते ही शेवटलीच जाहीर मैफिल . तो प्रंसगही एक पर्व संपल्याचे सुचवणाराच होता . पेडर रोडवर श्री. भाऊसाहेब आपट्यांचा प्रासादतुल्य बंगला होता. आपट्यांच्या मुलीवर माईंचा खूप जीव. क्रिकेटर माधव आपटेची ही बहीण. ह्या आपट्यांच्या बंगल्याच्या जागी आता अनेक दुमजी ` वुडलँड्रस अपार्टमेंट ' उभे राहणार होते. मूळ वास्तूला कृतज्ञतेने निरोप देण्याचाच जणू काय तो प्रसंग होता.
जुन्या मुंबईतील एक जुनी वास्तु दिवसा - दोन दिसृवसांत दृष्टीआड होणार होती. पुरातन असूनही सतेज राहिलेला तो वृध्द प्रासाद आणि वार्धक्यातही सुरांची तेजस्विता न गमावलेली ही वृद्धगानसम्राज्ञी. वाड्याला वास्तुपुरूष असतात अशी जुन्या लोकांची एक श्रध्दा आहे . त्या वाड्याच्या वास्तुपुरूषालाही असल्या तपःपूत सुरांनी बांधलेली आपली उत्तरपूजा आवडली असेल . त्या गाण्याला मुंबईतल्या नामवंत गायक - गायिकांप्रमाणे , सत्येनभाईसारख्या केसरबाईंची गाणी ऐकण्याचा रेकॉर्ड मोडणाऱ्या रसिकापासून अनेक आमंत्रित रसिकांची हजेरी होती. शिवाय अनेक अनाहूत. त्या प्रशस्त हॉलमध्ये , जिन्यात, खालच्या अंगणात ही गर्दी . कुणीतरी आणून मायक्रोफोन ठेवला.
" हा उचला आधी. "" बाईंनी हुकूम दिला . त्यांना टेपरेकॉर्डिंगची शंका आली होती.
" माझं गाणं ऐकायचं असेल तर माझं गाणं ऐकण्याचे कायदे पाळून ऐका." हे त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता आयुष्यभर सांगितले होते . त्यांची त्या सांगतील ती बिदागी देऊन गाणी करणारेही `माझ्या गाण्याला अमकेतमके दिसता कामा नयेत. ' ही त्यांची अटदेखील मान्य करीत असत असे म्हणतात. खरेखोटे देव जाणे. पण केसरबाईंनी संगीतात असे काही विलक्षण स्थान मिळवले होते की , माझ्या गाण्याला सर्व पुरूषांनी डोक्याला टोपी किंवा पगडी घालूनच आले पाहिजे अशी अट त्यांनी घातली असती तरीही ती मान्य झाली असती . हे का होऊ शकले याला माझ्यापाशी उत्तर नाही . सगळ्याच गोष्टींना तर्कसंगती लावून उत्तरे सापडत नसतात . मायक्रोफोनचा प्रकार त्यांतलाच .
" मायक्रोफोन असू द्या. खाली गर्दी आहे . ऐकू जाणार नाही."
" ऐकू जाणार नाही ? खाली काय बाजार भरलाय ? माझं गाणं कुठपर्यंत ऐकू जातं ते मला बरोबर ठाऊक आहे. हा मायक्रोफोन माझा आवाज खातो. उचला. "
रात्री एक वाजेपर्यंत गाणे झाले. माणसे त्या सुरांना खिळून बसली होती . वार्धक्याचा त्या गळ्याला आणि सुरांना जरा कुठे स्पर्श झाला नव्हता. आवर्तना - आवर्तनाला प्रदक्षिणा घालून येणारी तशीच अखंड तान. श्रीपाद नागेशकर तबल्याला होते . मधूनच एक सुरेल तुकडा लावायची त्यांनी हिंमत केली. जागच्या जागी मी घाबरलो होतो. पण तानेच्या योग्य अंदाजाने आलेल्या त्या तुकड्यानंतर त्यांनी श्रीपादाकडे कौतुकाने पाहिले त्यात श्रीपादाला आपण शिकलेल्या विद्येचे चीज झाल्यासारखे वाटले असेल . त्या मेफिलीत केसरबाईंना पुष्पहार देण्याचा मान मला मिळाला.
"हा . कर तुझं भाषण. "" केसरबाईंनी तेवढ्यात मला चिमटा काढला . त्या दिवशी केसरबाईंच्या गाण्यातल्या त्या वाहत्या प्रकाशमान धवलतेला उद्देशून मी म्हणालो होतो की, " अल्लादियाखांसाहेबांना बॅरिस्टर जयकरांनी. भारतीय संगीताचे
गौरीशंकर म्हटलं होतं. संगीतातल्या त्या गौरीशंकराच्या कृपेने आम्हांला लाभलेल्या सुरांच्या धवलगंगेत आमची मनं न्हाऊन निघाली. - तेव्हा पहिलं वंदन अल्लादियाखांसाहेबांना आणि दुसरं केसरबाईंना."

गणेशचतृर्थीच्या दिवशी केसरबाई गेल्या. 13 जुले 1893 साली गोव्यातल्या केरी नावाच्या सुदंर खेड्यात त्यांचा जन्म झाला होता. गोव्याच्या मातीने भारतीय संगीताला अर्पण केलेल्या देण्यांतले हे फार मोठया मोलाचे देणे. ज्या मुबंईनगरीला त्यांच्या सुरांचे स्नान घडले होते त्या मुंबईतल्या दादरच्या समुद्रतीरावर त्यांच्या पार्थिव देहावर ऋषिपंचमीच्या दिवशी अग्निसंस्कार झाला. भारतीय संगीतातल्या ऋषींचे ऋण आजन्म संगीतव्रती फेडणाऱ्या केसरबाईसारख्या गानतपस्विनीचा ऋषींच्या मालिकेतच कृतज्ञतेने अंतर्भाव करायला हवा.
त्यांच्या निधनाची वार्ता रात्री आठच्या सुमाराला मुंबईहून त्यांच्या नातवाने मला फोनवरून सांगितली. सात - सव्वासाताच्या सुमाराला त्या अलौकिक दमश्वासातला शेवटला श्वास टाकून इथली मेफिल केसरबाईंनी संपवली होती. माझा चेहरा उतरलेला पाहून मला भेटायला आलेला माझा एक मित्र म्हणाला, " काय झालं ? "
मनात म्हणालो : " एका तेजःपुजं स्वराचा अस्त. "
त्याला सांगितलं, " केसरबाई गेल्या."

केसरबाई-७

मला एक कथा आठवली : भर दरबारात राजाच्या एका लाडक्या कवीने कविता म्हटली त्यातल्या एका ओळीत ` शीतं बाधते ' ऐवची ` बाधति ' असे त्याने म्हटले . दरबारातल्या एका वेय्याकरण्याला राजाने विचारले , "" कविता कशी वाटली ? " कवी राजाचा लाडका आहे हे ठाऊक असूनही व्याकरणशास्त्री म्हणाले ` बाधति बाधते . ' त्या कवितेत आत्मनेपदी क्रियापदाला परस्मेपदी प्रत्यय लावल्याचे त्या व्याकरणशास्त्रांना बाधले होते . त्यांची भाषाविषयक तालीमच निराळी . आपल्या मताने राजा रागवेल याची भीती त्यांना नव्हती .
असली माणसे लौकिकार्थाने गोड , मनमिळाऊ राहूच शकत नाहीत . आपल्यालाला इष्ट वाटेल ते साधण्यासाठी कलेत मानला गेलेला एखादा नियम जाणीवपूर्वक मोडण्यात एक मिजास असतेही . पण अज्ञानामुळे नियम मोडणे निराळे , आणि कलेच्या सौंदर्यात मी भर घालीन ह्या आत्मविश्वासाने नियम मोडणे निराळे . खुद्द अल्लादियाखांसाहेबांच्या तरूणपणात ध्रुपदियांचा एवढा मोठा दबदबा असताना , त्यांनी , ज्याला विद्वान अंतःपुरातले गाणे म्हणून नाके मुरडीत अशा ख्यालगायकीचाही दबदबा निर्माण केलाच की . याचे कारण त्यांना ध्रुपदाचे सामर्थ्य आणि ध्रुपदाच्या मर्यादा ह्या दोन्हींचे पक्के ज्ञान होते . आंधळेपणाने नियम पाळण्याला कोणीच किंमत देत नसतात . केसरबाईच्या मतात आग्रह असेल पण आंधळेपणा नव्हता .
अशाच एका कुठल्याशा संस्थानिकाच्या दरबारात संगीतोत्सव होता . केसरबाईना संस्थानिकांनी नाटकातले पद म्हणायची फर्माइश केली . केसरबाईंनी त्या महाराजांना सांगितले , " थांबा , आपल्याला नाटकातलं पद कसं म्हणतात ते ऐकायचं आहे ? इथे
कृष्णामास्तर आले आहेत . ते म्हणतील . माझ्या गळ्याला त्या गाण्याची तालीमनाही. " त्या काळी काही संस्थानांत लग्नसमारंभांत ठिकठिकाणच्या गुणीजनांची गाणीबजावणी असायची. मेहेरबानीचा स्वीकार करायचे. " एकदा सकाळी माझ्या खोलीत हे बदामपिस्ते - मिठाईचं ताट आलं . मी म्हटलं , हे कुणी सांगितलं होतं ? तो दरबारी नोकर म्हणाला , हे सगळ्या गाणेबजावणेवाल्यांना वाटतात . मी म्हणाले , घेऊन जा ते ताट . असली दानं माझ्याकडे आणायची नाहीत . " केसरबाईचा हा खानदानीपणा ज्यांना कळला नाही त्यांना त्या गर्विष्ठच वाटल्या असणार . ज्या गायकीच्या महात्मतेने त्यांच्या जीवनातले आनंदनिधान त्यांना सापडले होते , त्या महात्मतेला लोकप्रियतेसाठी किंवा आर्थिक अभ्युदयासाठी बाधा आणणे , बदलत्या अभिरूचीचा अंदाज घेऊन गाणे बदलणे त्यांना मानवतच नव्हते . कालिदासात रमणाऱ्या रसिकाला ` तुम्ही सिनेमातल्या गाण्यांचा पद्यावल्या का वाचीत नाही ? ' असे कोणी विचारीत नाही .
काळ बदलला आहे , अभिरूची बदलली आहे , हे काय त्यांना कळत नव्हते ? त्यांच्या घरातली नातवंडे ` विविध भारती ' वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद मानीत . केसरबाईंची ऐकमेव कन्या सुमन आणि तिचे यजमान दोघेही डॉक्टर आहेत . मुले आधुनिक जमान्यातली आहेत . एकदा आम्ही बसलो असताना आत मुलांनी सिनेमातली गाणी लावून धुमाकूळ घातला होता .
" ऐक. " हसत हसत माई म्हणाल्या , " दिवसरात्र डोकं उठवतात. "
" माई , तुम्हांला नाही मजा वाटत ? "
" अरे , त्यांच्याएवढी आज मी असते तर मीही हेच केलं असतं . त्यांना ऐकू नका म्हटलं तर काय माझं ऐकणार आहेत ? रस्त्यातून वरातीचे ब्याडं वाजत जातात . त्या ब्यांडवाल्यांना काय ख्याला वाजवा म्हणून सांगायचं ? "
पुतळ्याचे काम पुरे झाले आणि आमच्या नशिबातले ते भाग्यशाली दहाबारा दिवस संपले . त्यानंतर कानी यायच्या त्या माईच्या वाढत्या आजाराच्याच बातम्या . याच सुमाराला मीही मुंबई सोडून पुण्याला स्थायिक झालो . त्यांना भेटून आलेले लोक सांगायचे , माईकडे पाहवत नाही . अंथरूणाला खिळून आहेत . वर्षा - दीडवर्षांनंतर शर्वरी पुतळा घेऊन त्यांच्या घरी गेला . प्लॅस्टरमधला तो अर्धपुतळा त्याने केसरबाईमा अर्पण केला . त्या वेळी त्या बिछान्यावरच होत्या . शर्वरीला त्या अवस्थेत म्हणाल्या, " शर्वरी , जेवायला थांबायला पाहिजे . तू आज येणार म्हणून डाळीच्या वरणात घालायला कारली आमली आहेच . "दीड - दोन वर्षांपूर्वी मी सहज म्हणालो होतो की कारली घातलेले डाळीचे वरण आणि भात हे ह्या शर्वरीचे जेवण . चहा नाही ,
कॉफी नाही , विडीकाडी काही नाही . शरपंजरी पडलेल्या माईंनी आईच्या मायेने शर्वरीचे कारली घातलेले वरण लक्षात ठेवले होते . दूरदूर गेलेले सूर पाहत बसलेल्या गानसम्राज्ञीचा तो पुतळा . शर्वरीची ओळख करून दिली त्या दिवशी माईंनी विचारले होते , "तुझे गुरू कोण ? "
शर्वरीने आपल्या शिल्पकलेतल्या गुरूचे नाव सांगतानादेखील हात जोडले होते . हा गुरूपंरपरा असलेला , खानदान असलेला शिल्पकार आहे याची खात्री पटल्यावरच माई पोज द्यायला तयार झाल्या होत्या.

केसरबाई-६

असल्या सहज चालणाऱ्या गप्पांतून त्यांची संगीताविषयीची मते कळायची . अभिजात संगीताच्या सहजसाध्येवर , सुलभीकरणावर त्यांची अजिबात श्रध्दा नव्हती . विद्यालये - बिद्यालये सब झूट . गाणारा जाऊ दे , ऐकणाऱ्यालाही ह्या कलांचा आस्वाद , जाता जाता , सहजपणाने घेता येईल हे त्यांना मान्य नव्हते . निदिध्यासाचा , नित्य अभ्यासाचा , चांगल्या गुरूकडून कठोरपणाने होणाऱ्या चिकित्सेचा ज्ञानमार्गच त्यांना मान्य होता . एक ज्ञानी गुरू आणि ` रियाझाचे घंटे ' किती झाले ते न मोजणारे दोन किंवा तीन गुणी हुशार शिष्य एवढेच गाण्याचे शिक्षण असेच झाले पाहिजे . त्यांच्या बोलण्यात ` बुध्दी पाहिजे ' हे बऱ्याच वेळा आलेले मी ऐकले होते . मेफिलीत उडत उडत कानी येणाऱ्या चिजा ऐकून गाणाऱ्यांचा त्यांना तिटकारा होता . परंपरेच्या आग्रहामागे कलावंताने आपल्या मनाला लावून घेण्याचा शिस्तीचा आग्रह होता . आणि शिस्त कुठली आणि आंधळे अनुकरण कुठले ह्यांतला फरक कळण्याइतकी तीक्ष्ण बुध्दी त्यांना होती . त्यांच्यापूर्वीच्या पंरतु एका निराळ्या घराण्याच्या प्रख्यात गायिकेच्या
गाण्याविषयी मत देताना म्हणाल्या, " तिचा आवाज मोकळा होता , सुरीली होती , पण ख्यालाचे पाढे म्हणत होती. " उगीचच सर्वांमुखी मंगल बोलवावे म्हणून ` आपपल्या जागी सगळेच चांगले ' वगेरे गुळगुळीत बोलणे नसे . अप्रियतेची त्यांना खंत नव्हती . त्यांच्या मतांमुळे त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात कटुता उत्पन्न व्हायची . पण त्यांच्या विलक्षण दृष्टीचा प्रत्यय यायचा . गुण सांगताना पटकन वेगुण्याकडेही लक्ष वेधायच्या . "" बडे गुलामअली चांगला गायचा . मूळचा सारंगिया . असेना का , पण गवई झाला. "

अजिबात दोष न काढता जर पेकींच्या पेकी मार्क कुणाला त्यांनी दिले असतील तर ते भास्करबुवा बखल्यांना. थोरले खांसाहेब तालीम द्यायला येताना कधीकधी भास्करबुवांना सोबत घेऊन यायचे . एखादी पेचदार तान कशी निघाली पाहिजे ते बुवांकडून गाऊन घेऊन दाखवायचे . मी विचारले, " माई , भास्करबुवांचं मोठेपण कशात होतं , असं तुम्हांला वायतं ? "
" अरे , काय सांगू तुला ? भास्करबुवा त्यांचं जे गाणं होतं तेच गायचे , पण मैफलीतल्या प्रत्येकाला वाटायचं की बुवा फक्त माझ्यासाठी गातायत. असा आपलेपणा वाटायला लावणारा गवई पाहायला मिळणार नाही . . . मोठा माणूस , मोठा माणूस . . . . "
माईंचे ते ` फेड आउट ' होत गेल्यासारखे मोठा माणूस . . . मोठा माणूस ' हे श्बद आजही माझ्या कानांत आहेत. केसरबाईंची मान आदराने लवली नाही असे नाही, पण `साहेबी पाहोनि नमस्कारानें ' ह्या समर्थवचनाला अनुसरून लवली . ` साहेबी ' म्हणजे देवत्व .
एकदा गुरूमुखातून मिळणाऱ्या विद्येबद्दल बोलत होतो . मी म्हणालो, " आता टेपरेकॉर्डर निघाले आहेत . टेपवर , समजा , अस्ताई - अंतरे बरोब्बर रेकॉर्ड केले तर त्यावरून तालीम घेता येणार नाही का . ? "
" नाही . "" माईंचे उत्तर ठाम होते .
" का नाही ? "" मी विचारले . त्यावर त्या काही बोलल्या नाहीत . मला वाटले , विषय संपला .
पण तो प्रश्न माईंच्या मनात घोळत होता . काही वेळ इतर गोष्टी झाल्या आणि त्या एकदम मला म्हणाल्या, " हे बघ , टेपरेकॉर्डरवरून चीज ऐकल्यावर ती गळ्यावर बरोबर चढली की नाही हे काय तो टेपरेकॉर्डर सांगणार ? "
" आपण पुन्हा रेकॉर्ड करावी आणि तुलना करून पाहावी . "
"अरे , आपलंच गाणं परक्यासारखं ऐकता आलं असतं तर काय पायजे होतं ? रेडिओवर आता टेपरेकॉर्डरच वाजवतात ना ? स्वतःचं गाणं स्वतः बसून ऐकतात . सुधारतात ?
तुझ्यासारखे त्यांचे दोस्तही कधी त्यांना त्यांच्या चुका सांगणार नाहीत . कशाला उगाच वाईटपणा घ्या ? . . . काय ? "
" बरोबर. "
"म्हणून डोळ्यांत तेल घालून शागिर्दाचं गाणं पाहणारा, चुकला तर त्याचा कान पिळणारा गुरू लागतो . अरे, आठ - आठ दिवस तान घासली तरी खांसाहेबांच्या तोंडावरची सुरकुती हलायची नाही. वाटायचं, देवा, नको हे गाणं . . . "
शिकवणी टिकवायला शिष्येचीच नव्हे तर तिच्या आईबापांचीही तारीफ करणारे अनेक गुरू माझ्या डोळ्यांपुढून तरळून गेले . शिष्यांना वाट दाखवण्याऐवजी त्यांची वाट लावणारे गुरू काय कामाचे ?
" माझी शिस्त परवडत असेल तर शिकवीन " म्हणणारे गुरू आमच्या विश्वविद्यालयात राहिले नाहीत तिथे गायनमास्तरांना काय दोष द्यायचा !
आणि मग तालमीशिवाय, बंदिशीतली दमखम गळ्यावर नीट चढवल्याशिवाय एक चीज गाणाऱ्या एका गायिकेची त्यांनी मला गोष्ट सांगितली . " कलकत्त्याला लालाबाबूंची कान्फरन्स होती . ह्या बाईंचं गाणं सुरू झालं . उगीच कान खराब करायला जाऊन बसायची मला सवय नव्हती . तसाच कोणी फेय्याझखांबिय्याझखांसारखा असला तर मी जायची . मजा करायचा फैय्याझखां. लालाबाबूंनी आग्रह केला होता म्हणून गेले होते . बाईंनी ` रसिया होना ' सुरू केलं .
आता ती काय त्यांच्या घराण्याची चीज नाही . तिला तालीम कशी मिळणार ? आणि मग , `अरे रसिया, हे रसिया, ओ रसिया - ' सुरू झालं . माझ्या शेजारी चंपू . मी म्हटलं , `ऊठ , जाऊ या.' ती भित्री . ती म्हणते, `माई , बरं दिसत नाही.' मी उठले आणि हालच्या बाहेर आले .
लालाबाबू धावत आले मागून . मला म्हणतात , `केसरबाईजी, कहॉचली आप ? ' मी म्हणाले
`ओ बाईजीका रसिया किधर खो गया हे - ओ रसिया , अरे रसिया करके चिल्लाती हे , सुना नहीं ? उसका रसिया धुंडनेको जा रही हूँ . - ' "