Thursday, September 8, 2011

जयपूर-अत्रोली गानपरंपरेतील गायक उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) यांचे अलीकडेच निधन झाले. त्यानिमित्ताने.. भारतीय शास्त्रीय संगीताचे खास वैशिष्टय़ असे की, भारतीय संगीतात ‘गायक’, ‘गवैया’ आणि ‘वृंदवादन दिग्दर्शक’ असे तीन प्रकार आहेत. त्यापैकी ज्याच्याजवळ बंदिशींचा आणि रागांचा विपुल प्रमाणात संग्रह आहे, तो केवळ प्रगल्भ शिष्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्याला नायक म्हणून संबोधले जाते. याचाच चांगला उपयोग करून घेत जो शिष्यांना गाणेही शिकवितो तो ‘गायक’, तर ‘गवैया’ हा मैफलीचा कलाकार. उस्ताद अजिजुद्दीन खाँ (बाबा) हे दुसऱ्या प्रकारचे विद्वत्ता असलेले असे व्यक्तिमत्त्व होते. उस्ताद भुर्जी खाँ साहेबांचे सुपुत्र आणि संगीत सम्राट खाँ साहेब अल्लादियाँ खाँ यांचे नातू असलेले बाबा, जयपूर-अत्रोली घराण्याच्या गौरवशाली परंपरेतून, रक्ताच्या नात्यामधून आजच्या आघाडीच्या कलाकारांना मुक्त हस्ते दुर्मिळ रागातील बंदिशी शिकविण्यापासून, ‘घराण्याचे खलिफा’ या उपाधीपर्यंत जाऊन पोहोचले होते. बाबांचा जन्म ७ फेब्रुवारी १९२१ रोजी राजस्थानमधील उनियारा येथे झाला. अगदी लहान वयातच बाबांना अल्लादियाँ खाँ साहेबांचे बंधू हैदर खाँ यांनी एकतारीवर स्वरसाधना करायला लावली. १९३० नंतर वडील भुर्जी खाँ यांनी आपल्या तरुण मुलाला आपल्या पंखाखाली घेतले. बाबांची शैक्षणिक प्रगतीही त्याचवेळी सुरू होती. १९३६ मध्ये आजोबा अल्लादियाँ खाँ साहेबांनी बाबांना मुंबईत वास्तव्यासाठी बोलावून घेतले. या वर्षांपासून ते खाँ साहेबांच्या निर्वाणापर्यंत म्हणजे १९४६ पर्यंत बाबांना खाँ साहेबांचा सहवास, तालीम, अप्रचलित रागांचे आणि बंदिशींचे भांडार संपादन करण्याचे भाग्य लाभले. बाबांना चुलते नसिरूद्दीन खाँ (बडेजी) यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळाले. त्यांना विविध रागातील अनेक बंदिशी अवगत होत्या. alt‘तोडी’, ‘भैरव’, ‘बिलावल’, ‘गौरी’, ‘श्री’, ‘कल्याण’,‘केदार’, ‘नट’, ‘कानडा’, ‘बहार’, ‘मल्हार’ यांचे अनेक प्रकार व बंदिशी याची बाबांना तालीम मिळाली होती. ‘सुनवंती’, ‘लाजवंती’, ‘विराट’, ‘मेघावली’,‘बिलावली’, ‘हिंडोली’ अशी अनवट दुर्मिळ रागरत्ने केवळ बाबांच्याच खजिन्यात होती.
वैद्यकीय कारणास्तव बाबा मैफलीत गाऊ शकले नाहीत, तरी बाबांनी आपल्याजवळ असलेले हे स्वरसंचित अनेकांना देण्यात धन्यता मानली. पं.मल्लिकार्जुन मन्सूर, पं.वामनराव सडोलीकर, पं.आनंदराव लिमये, पंडिता धोंडुताई कुलकर्णी, पं.मधुसूदन कानेटकर, पं.जितेंद्र अभिषेकी, श्रुती सडोलीकर-काटकर, श्रअरुण कुलकर्णी, पं.पंचाक्षरी मत्तीकट्टी या साऱ्यांचे गुरू होते बाबा. ही शिष्यमंडळी अखेपर्यंत बाबांकडे हक्काने येत व अलोप अनवट रागातील बंदिशी चिजा त्यांच्याकडून घेत. एक गुरू म्हणून बाबा अमरच राहणार आहेत. कारण इतक्या शिष्यांकडून प्रसृत झालेली जयपूर गायकी अमरच आहे. केवळ गुरू म्हणूनच नव्हे, तर एरवीही बाबांच्या वागण्या-बोलण्यात एक मर्यादाशील सभ्यता होती. कलाकार कितीही छोटा असला तरी त्या कलाकाराचे गाणे शेवटपर्यंत थांबून ऐकत व त्याला प्रोत्साहन देत. त्यामुळे बाबांची मैफलीतली उपस्थिती ही एक आदरयुक्त शान असे. गायन समाज देवल क्लबवर तर बाबांचे अलोट प्रेम होते. १२५ वर्षांच्या देवल क्लबच्या अंगा-खांद्यावर वाढल्याची त्यांची भावना होती. प्रकृती साथ देत नसतानाही गेल्याच महिन्यामध्ये संस्थेच्या रंगमंदिराच्या उद्घाटनासाठी केवळ बाबा याच भावनेने उपस्थित होते. बाबांनी खाँ साहेबांकडून वारसा हक्काने विद्याधन तर मिळविलेच; पण खाँ साहेबांच्या शेवटच्या तीन वर्षांत त्यांना एकांत मिळाला तेव्हा खाँ साहेबांकडून त्यांच्या जीवनातही अनेक घटना, पूर्वजांविषयी माहिती, त्यांचे पराक्रम या संबंधीची माहिती मिळविली आणि खाँ साहेबांच्याच शब्दांत ती लिहून ठेवली. या माहितीचा अनुवाद इंग्रजी भाषेमध्ये mylife या नावाने पुस्तक रूपात प्रकाशित झाला आहे. अशा बाबांच्या जाण्याने अल्लादियाँ खाँ साहेबांच्या जयपूर-अत्रोली गान परंपरेतील शेवटचा शिलेदार, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, गेली जवळपास ५० वर्षे ज्ञानदान करणारं एक गुरुछत्र काळाच्या पडद्याआड गेलं आहे. ===============================================================
सदर लेख बुधवार, सोमवार, ४ सप्टेंबर २०११ च्या लोकसत्ताच्या 'लेख' मालिकेतला आहे. लोकसत्ताचे आभार.