Monday, March 21, 2011

मारवा


मी वसंताचा पेटीवाला. अनेक वर्षे साथ केली आहे. असंख्य मैफली आठवतात. नागपूरला रात्रभर गाणे झाले. सकाळी बाबूरावजी देशमुखांकडे चहा घेऊन अकराची गाडी गाठायची म्हणून गेलो. गाडीला दोन तास अवकाश होता म्हणून तंबोरे जुळवले, संध्याकाळी सहा वाजता मैफली संपली. तोडीने सुरू झालेली मैफल पुरिया धनाश्रीने संपली. तोपर्यंत नागपूरची गाडी मुंबईअच्या अर्ध्या वाटेवर पोहोचली होती. पार्ल्याला तर आम़च्या आणि आमच्या स्नेह्यांच्या घरी वसंताच्या अनेक बैठकी झाल्या. वातावरण गार झाले. वसंत बापट, नंदा नारळकर, माझे बंधू, शरू रेडकर अशी वसंताला आज अनेक वर्षे गवई मानणारी मित्र मंडळी होती. पुन्हा गवसणीतले तंबोरे निघाले आणि तीन वाजता भटियारा सुरु झाला. मारव्याने तर मी वसंताकडून इतक्या तर्‍हेचे स्वरुप पाहिले आहे की त्याला तोड नाही. वसंताला मारवा सर्वात अधिक रुचावा हे मला मोठे सूचक वाटते.ष्‌डज पंचमाला म्हणजे अत्यंत आवश्यक आधाराचा पाठिंबा नसलेला तो राग. वसंतानी जीवनही असेच काहीसे. लहानपणी हक्काच्या घराला मुकलेला. गायक म्हणुन असामान्य असूनही घराण्याचा पंचम पाठिशी नाही. आर्त, अदास, आक्रमक, विचित्र पण अत्यांत प्रभावी असा प्रकाशाच्या झोतला पारखा असलेला हा संधीकालातला समोर फक्त अंधार असलेला हा राग! हा राग वसंता अति आत्मीयतेने गातो. एक जागा पुन्हा नाही असली अचाट विवीध. गझल गायला तर बेगम अखतर सलाम करुन दाद देतात. थिरखवासाहेब 'गवय्या' मानतात. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, त्याच्या गुणावर लुब्ध. विद्याहरणातली अभिजात गायकीवर रचलेली गाणी एखाद्या नवख्या विद्द्या्र्थींची नम्रतेने स्वत: ज्योत्स्नाबाई भोळे शिकतात. चंपुताईंच्या घरची मैफल वसंताशिवाय सजत नाही. इतकेच कशाला पण आमच्या सारख्यांच्या आग्रहामुळे त्याने गांधर्व महाविद्यालयाची संगीतातली सर्वोच्च पदवी मिळवली. वसंता आता डॉ. देशपांडे आहे. पण आकाशवाणीला त्याचे हे खानदानी संगीतातले स्थान मान्य नाही.
वसंत देशपांड्याचा आकाशवाणी वर अभिजात संगीत गाणारा कलावंत होण्याचा प्रश्न बेळगाव महाराष्ट्राला देण्याचा प्रश्नासारखा कधीपासून लोंबतो आहे. ज्या अधिकार्‍यांनी तो सोडवायचा त्यांनी कोणाच्या भीतीने तो डावलला आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांच्या गल्लीत ताल नाही आणि मोहल्ल्यांत सूर नाही असे गायक-गायिका आकाशवाणीवर नित्य नियमाने राग-रागिण्या नासत बसलेल्या असतात आणि वसंतराव देशपांड्यांना मात्र तिथे स्थान नाही. ह्याचे मला वाटते एकच मुख्य कारण की वसंताला घराण्याचा टिळा नाही. वसंताचे दुर्दैव हे की की तान गळ्यात यायला बर्‍याच लोकांना तास तास घासत बसावे लागते ती वसंताला क्षणात येते. स्वर टिपण्याच्या बाबतीतली त्याची धारणा किती अलौकिक आहे ह्याची साक्ष महाराष्ट्रातले सगळे म्युझिक डायरेक्टर्स देऊ शकतील. अनवट राग असो, लावणी असो, वसंतराव ब्लॉटिंग-पेपरसारखी सुरावट टिपतात. वसंताचा एकच मोठा दोष की संगीतात हिंदूही नाही यवनही नाही. 'न मी के पंथाचा' म्हणणार्‍या केशवसूतांसारख्या सूरांच्या साकल्याच्या प्रदेशातला हा पांथस्थ आहे. कारकुनाच्या मर्यादशीतलेने घरगिरस्ती चालवणारा वसंता दोन तंबोर्‍यांच्या मध्ये मात्र स्वत:च्या खयाले चालवणारा आहे. तिथे त्याची कलंदरी दिसते. समोरच्या श्रोत्यांवर प्रेम जमले की गंमत म्हणून वसंता नकला करील. नाना गमती करील, पण तिथेही ह्या विदुषकीमागे दडलेली विद्वत्ता लपत नाही.