Thursday, January 28, 2010

पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष

नमस्कार मंडळी,
भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच. तर करू या सुरुवात.
========================================================================
पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोषआजचा आपला विषय आहे, पं. श्री. पन्नालाल घोष यांच्याविषयी.
पन्नालाल घोष ऊर्फ अमोल ज्योती घोष. एक अतिशय प्रतिभावान कलाकार. प्रतिभावान अश्यासाठी की पन्नालालजींना बासरींच शिक्षण देण्यासाठी वयाच्या ३६ व्या वर्षांपर्यंत कोणी गुरुच नव्हता. पन्नालालजींचा जन्म आताच्या बांगलादेशातल्या बारीसाल ह्या गावी झाला. त्यांच्या जन्माबद्दल बरीच गडबड आहे असं खुद्द पन्नालालजी सांगायचे. पण इतिहासकारांनी ज्या तारखा सांगण्यात आल्या त्यातील ३१ जुलै हा दिनांक व १९११ हे वर्ष ठरवलं. पन्नालालजींचा जन्म सांगितीक घरातच झाला. त्यांचे आजोबा हरिकुमार घोष हे प्रख्यात धृपदिये व पखवाज वादक होते. पन्नाबाबुंनी स्वरांचे काही ज्ञान आजोबांकडुन लहानपणीच घेतलं होतं. पन्नाबाबुंचे वडिल अक्षयकुमार घोष हे प्रख्यात सितारिये होते. त्यांनी ढाक्याचे प्रख्यात सतार वादक गुरु भगवान चंद्रदास ह्यांच्याकडून विद्या मिळवली होती. पन्नाबाबुंची आई सुकुमारी ह्या प्रख्यात गायिका होत्या तर काका भवरंजनजी हे संगीतकार होते.
पन्नाबाबूंबाबत दोन आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पन्नाबाबू ९ वर्षांचे असताना शाळेतून येताना गावाबाहेर पडक्या मंदिरामध्ये एक साधु त्यांना मुरली वाजवताना दिसला. पन्नाबाबूंचं ते ऐकताना भान हरपलं. तो साधु भानावर आला पण पन्नाबाबू तसेच होते. साधुला मोठं कौतूक वाटलं. म्हणुन त्याने मग पन्नाबाबुंना ती बासरी भेट दिली. दुसरी आख्यायिका अशी की पन्नाबाबू गंगेकाठी फिरायला गेले असताना त्यांना गंगेत काहीतरी वहात येताना दिसले. म्हणुन पन्नाबाबूंनी गंगेत बुडी मारुन जाऊन पाहीलं तर ती एक बासरी होती. गंगेचा प्रसाद म्हणुन ती बासरी त्यांनी ठेऊन घेतली आणि तेव्हाच ठरवलं की आता जीवन बासरीसाठी अर्पण करायचं.
पन्नाबाबूंनी ३६ व्या वर्षांपर्यंत स्वतःच रियाज करुन विद्या मिळवली होती. त्यांची प्रतिभाइतकी होती की बडे बडे लोक त्याचवेळी त्यांना ओळखू लागले होते. ह्याचं एक कारण हेही होतं की तोपर्यंत बासरीवादन इतकं मागे पडलं होतं की अभिजात संगीतामध्ये तीचं अस्तित्वच राहिलेलं नव्हतं. पन्नाबाबूंमूळे तिला परत संजिवनी मिळाली आणि लोकांनी पन्नाबाबूंचं बासरीवादन पाहून लोकांनी तोंडात बोटं घातली. शिवाय ह्याला आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे पन्नाबाबूंचं उमदं, सात्त्विक, निरहंकारी, प्रेमळ व्यक्तिमत्व कारणीभूत होतं. ते म्हणायचे सुद्धा की आयुष्याच्या उत्तरार्धात ही कला परमेश्वरासाठीच अर्पण करणार.
पन्नाबाबूंना व्यायामाची खूप आवड होती. ते म्हणायचे सुद्धा कलाकारानं नेहमी व्यायामाकडे लक्ष दिले पाहीजे. ते स्वतः लाठीकाठी, बॉक्सिंग व मार्शल आर्टचे खेळाडू व प्रशिक्षक राहिले आहेत.
मंडळी, पन्नालाल घोष हे पहिले शास्त्रीय संगीतकार आहेत की जे १९३८ साली युरोप दौर्‍यासाठी गेले होते. पण जागतिक युद्धामूळे त्यांना दौरा अर्धवट टाकुन परतावे लागले. त्यानंतर १९३६ पासून पन्नाबाबूंनी 'न्यु थिएटर' चे रायचंद्र बोराल यांच्या बरोबर काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिल बिस्वास यांची बहीण 'पारुल घोष' ह्या पन्नाबाबूंच्या पत्नि होत. चलत/बोलत चित्रपटांच्या त्या पहिल्या गायिका होत.
त्यानंतर पन्नाबाबू मुंबईला स्थायिक झाले व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी काम करु लागले. मुंबईमध्येच त्यांनी प्रख्यात 'बॉम्बे फिल्म स्टुडियो' मध्ये काम करायला सुरुवात केलेली. प्रसिद्ध 'बसंत','आंदोलन','पोलिस' सारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.
पन्नाबाबू १९४६ साली पहिल्यांदा प्रसिद्ध सितारवादक उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब यांना भेटले. उस्ताद अल्लाऊद्दिन खाँसाहेब हे पं. रविशंकर यांचे गुरु. पन्नाबाबूंनी मग खाँसाहेबांना (बाबांना) विनंती केली पण बाबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणत होते की तुम्ही आधिच इतके मोठे आहात तुम्हाला गरज नाही. पण पन्नाबाबूंनी पाठपुरावा केल्यावर मानले आणि मग पन्नाबाबूंनी बाबांच्या बरोबर ६ महिने कठोर शिक्षण घेतलं आणि पन्नाबाबूंचं तेज लखलखीत झालं. त्यानंतर पन्नाबाबू दिल्ली आकाशवाणी साठी काम करु लागले. एक खास गोष्ट म्हणजे पन्नाबाबूंवर उस्ताद करीम खाँसाहेब यांचा मोठाच प्रभाव होता.
पन्नाबाबूंनी बरेच प्रयोग केले. ३२ इंच लांबीची लांब बांबूची बासरी बनवून घेतली. त्यांना त्यातुन घनगंभीर स्वर हवे होते. म्हणुन मग पन्नाबाबूंनी बासरीला ७ वे भोक पाडून घेतले व एक नवा अध्याय लिहीला. याशिवाय ६ तारी तानपुरा, तीव्र स्वरांची तानपुरी व सुरपेटी यांचा पण शोध लावला. या व्यतीरिक्त त्यांनी दीपावली, पुष्पचंद्रिका, हंसनारायणी, चंद्रमौळी व आपल्या लाडक्या मुलीच्या मृत्युच्या दु:खाने व्यथित होउन तिच्या नावाने तिची आठवण म्हणुन 'नुपुरध्वनी' अश्या रागांची रचना केली. पन्नाबाबूंच्या ज्या संस्मरणीय मैफिली झाल्या त्यातली संगीतमार्तंड पं. ओंकारनाथ ठाकुर यांच्याबरोबरची एक. त्यावर्षी कलकत्याच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पं. ओंकारनाथ ठाकुरांबरोबर संयोजकांनी जुगलबंदी ठेवलेली. पण पन्नाबाबूंनी पंडितजींच्या घनगंभीर आवाजाला शोभेल अशी ३६ इंच लांबीची लांब बांबूची बासरी काढली आणि सगळी सभा विस्मयात बुडाली. पण पुढच्याच वेळात पंडितजींच्या बरोबर पन्नाबाबूंची मुरली सुद्धा ताना सही सही घेऊ लागली आणि सगळी सभा आश्चर्याचे एक एक धक्के खाऊ लागली. मैफिलीनंतर खुद्द संगीतमार्तंडांनी पाठीवर शाबासकी देऊन गौरव केलेला. असा हा अजातशत्रु, अतिशय धार्मिक, सात्त्विक, प्रेमळ व लिजंड्री कलाकार २० एप्रिल १९६० ला अवघ्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराचा झटका येऊन ह्या विश्वातून निघुन गेला. पण जाताना ह्या दुनियेला बासरी देऊन गेला व अगणित शिष्य परिवार देऊन गेला.
अश्या ह्या मोठ्या कलाकाराला व मोठ्या माणसाला शतशः प्रणाम !!!

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार. पन्नाबाबूंच्या काही चिजा इथे ऐकता येतील.
१९२२ साली ओंकारनाथजींच लग्न श्रीमती इंदिरादेवींसोबत झालं. इंदिरादेवी, शेठ प्रल्हादजी दलसुखराम ह्या धनवान शेठजींच्या कन्या. १९२४ साली नेपाळचे राजे महाराज चंद्र समशेर जंग बहादुर यांच्या आमंत्रणावरुन त्यांनी अतिकठीण असा नेपाळ दौरा केला. त्यांना तेव्हा अमाप धन व प्रतिष्ठा मि़ळाली. स्वतः राजाने त्यांना ५००० रु. रोख व अगणित मौलिक अलंकार दिले. ह्याच वेळेस महीना ३००० रु. अशी घसघशीत दरबार गायकाची नोकरीसुद्धा देऊ केली. पण ओंकारनाथजींना घरी परतण्याचे वेध लागलेले. कधी एकदा घरी आईच्या पायावर सगळी संपत्ती घालतो असं त्यांना झालेलं. त्यांच ते कित्येक वर्षे जपलेलं स्वप्न होतं. म्हणुन त्यांनी ती नोकरी धुडकावून लावली.
ह्याच सुमारास ओंकारनाथजींना विविध शास्त्रांचा अभ्यास करण्याचा छंद लागला. शिवाय ते एक सच्चे देशभक्तही होते. ओंकारनाथजींनी भडोच काँग्रेस कमिटी व गुजरात काँग्रेस कमिटी वरही काम केले. दैवाचे आभार मानावे तितके थोडेच की ते तिथे अडकले नाहीत. १९३० साली ओंकारनाथजींना परत नेपाळ दौरा घडला. ह्या वेळेस त्यांनी सगळी संपत्ती गुरु पलुस्करांच्या पायावर अर्पण केली. पलुस्करांचा आनंद गगनात मावेना. ह्यानंतर ओंकारनाथजींचे हैद्राबाद, म्हैसुर व बंगालचे दौरे झाले. हैद्राबादमधे त्यांनी मालकंस रागात अशी काही मैफल जमवली की स्वतः गुरुने पं. पलुस्करांनी त्यांना भर बैठ्कीत मिठी मारली व आपल्या आसवांचा आशीर्वाद दिला.
आपल्या पुर्व आयुष्यात ओंकारनाथजींनी जैन मंदिरासाठी काम करत असताना जैन भाषा अवगत करुन घेतली. ह्याशिवाय त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू व नेपाळी भाषांवर प्रभुत्व होतं.
१९३२ साली पं. पलुस्करांचा मृत्यु झाला. त्यानंतर २ वर्षे ओंकारनाथजी दु:खात होते. १९३३ साली जागतिक संगीत संमेलनाचे त्यांना निमंत्रण मिळाले म्हणुन ते इटलीला फ्लॉरेन्समधे गेले. इटलीची त्यांची एक कथा खुप प्रसिद्ध आहे. त्यांनी सरळ जाऊन मुसोलिनीच्या व्यक्तिगत सचिवास मुसोलिनीला फक्त ५ मिनीटे गाणं ऐकवण्याची गळ घातली. केवढं ते धैर्य. पण फक्त ५ मिनीटांच्या बोलीवर तो तयार झाला. तशी मुसोलिनीसाठी त्यांनी 'तोडी' गायला. ५ मिनीटांनी ओंकारनाथजी थांबले. तर मुसोलिनीने त्यांना खुणेनेच गात राहायला सांगितले. अर्ध्यातासाने शेवटी सचिवाने गाणं थांबावायची सुचना केली. जाताना मुसोलिनी डोळे पुसत एवढच म्हणाला की ' हे संगीत मी पुन्हा ऐकणार नाही. माझं हृदय असं विरघळलेलं चालणार नाही. मी हुकुमशहा आहे. मला कठोरच रहायला हवं. पुन्हा हे संगीत मला ऐकवू नकोस. तुझी बिदागी सन्मानपुर्वक घे. तुझं संगीत चालू राहु दे पण इथे नाही तुझ्या देशात..'. मंडळी, अशी जादु आहे आपल्या भारतीय अभिजात संगीताची आणि ओंकारनाथजींच्या आवाजाची होती. नंतर ओंकारनाथजींनी संपुर्ण युरोप दौरा केला. त्यांनी शेख अमानुल्ला ह्या अफगाणिस्तानमधल्या राजासमोरही गायन केलं. त्यांच्या मित्रांनी त्यांना लंडनमध्ये असताना किंग जॉर्ज (पाच) ह्याच्यासामोर गायला परवानगी मिळावी म्हणुन प्रार्थना कर असं तेव्हा ओंकारनाथजींनी स्वाभिमान ठेऊन ते साफ धुडकावून लावली.
ओंकारनाथजी रशियाकडे जात असताना आपल्या लाड्क्या पत्नीचं बाळंतपणात मृत्यु झाल्याचं कळलं. त्यांना हा जबरदस्त आघात होता. इतका की त्यांनी दौरा अर्धवट सोडलाच पण त्यांना अल्पकाळासाठी स्मृतीभ्रंश झाल्यासारखं झालं. ओंकारनाथजींच्या बोलण्यात नेहेमीच आपल्या एकनिष्ठ, प्रेमळ व वात्सल्यपुर्ण पत्नीबद्दल आदरभाव असे. ते म्हणत की इंदिराजींशिवाय त्यांना इथपर्यंत पोहोचताच आलं नसतं. कलकत्याच्या मोठ्या संगीत सभेत रसिकांनी एकदा त्यांना 'निलांबरी' राग गाण्याची फर्माइश केल्यावर विनयपुर्वक नाही असे सांगितल्यावर कारण काय तर ते म्हणाले की 'इंदिराजींचा हा आवडता राग. जर गायला बसलो तर इंदिराजींच्या आठवणीने गाता येणार नाही.' केवढं हे निस्सीम प्रेम. परत लग्न कर अशी आईने गळ घातली तरी त्यांनी परत लग्न केलं नाही व उत्तरादाखल ते म्हणाले की 'माझ्या रामाच्या वचनाप्रमाणेच मीही एकपत्नीव्रत राहणार'. केवढी ही निष्ठा...
पत्नीच्या मृत्युनंतर जरी ओंकारनाथजींच गाणं सुरु राहिलं तरी त्यात एक प्रकारची करूण छटा असे. पंडितजींनी ह्यानंतर कटु आठवणींमुळे भडोच सोडलं व मुंबईमधे 'संगीत निकेतन' चालु केलं. पं मदनमोहन मालवीय ह्यांची एक इच्छा होती की बनारस हिंदु विश्वविद्यालयात त्यांना पंडितजींच्या देखरेखीखाली संगीत विभाग चालु करायचा होता. पण पं. मालवियांचा मृत्यु झाला. नंतर हे काम पं. गोविंद मालविय यांनी पुरे केलं. तेव्हा ओंकारनाथजींनी (पंडितजींनी) 'डिन' म्हणुन अतिशय चोख काम पार पाडलं. त्यांनी बरेच शिष्य तयार केले जसे डॉ. प्रेमलता शर्मा, यशवंत राय पुरोहीत, बलवंत राय भट, डॉ. राजम, राजबाबू सोनटक्के, फिरोझ दस्तुर, अतुल देसाई, पि. न. बर्वे असे कितीतरी. त्यातील डॉ. राजम ह्या त्यांच्याबरोबर अखेरपर्यंत व्हायोलीन साथीदार होत्या. ज्या ज्या वेळेस डॉ.राजम ह्यांना गुरुची आठवण येत असे त्या त्या वेळेस त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. त्यांच्या बोलण्यात नेहेमीच गुरुची भक्ती, त्यांचा प्रेमळ स्वभाव, कडक शिस्त येत असे.
पंडितजींना जे जे पुरस्कार मिळाले त्यात
१९५५ साली 'पद्मश्री',
'संगीत प्रभाकर' , - पं मदनमोहन मालवीय,
'संगीत मार्तंड' - कलकत्ता संस्कृत महाविद्यालय - १९४०,
'संगीत महामहोदय' - नेपाळ नरेश - १९४० हे विशेष नमूद करण्यासारखे.
१९५४ साली ओंकारनाथजींना पहिला हृदयविकाराचा पहिला झटका बसला. १९६५ साली त्यांना अर्धांगवायुचा (पॅरॅलिसीस) झटका बसला. त्यानंतर ते फक्त ३ वर्षे होते. तोपर्यंत त्यांचे बंधु, आई, बहिण सगळेच गेलेले त्यामुळे ओंकारनाथजींजवळ कुणीच नसे.
डॉ. राजम लिहीतात की गुरुंकडे ह्या काळात बघवत नसे. ६५ वर्षी गुरु स्वतः घर साफ करत असत. एकदा पुर्णपणे अंथरुणाला खिळल्यानंतर खुपच कमी शिष्यांना त्यांची सेवा करता आली. बलवंत राय भट हे त्यांच्यासोबत शेवटपर्यंत (२९ ऑक्टो. १९६७) होते.
अश्या ह्या प्रखर, प्रेमळ, सात्त्विक, शिस्तप्रिय व संगीत मेरुमणीला शतशः प्रणाम !!!!
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार. ओंकारनाथजींच्या काही चिजा इथे ऐकता येतील.

संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... भाग -१

नमस्कार मंडळी,
भारतीय अभिजात (शास्त्रीय) संगीताच्या आपल्या परंपरेत अनेक उत्तमोत्तम दिग्गज कलाकार होउन गेले. काही कलाकार समाजापुढे आले तर काही आले नाहीत वा येऊ शकले नाहीत. त्याबद्दल नंतर कधीतरी. जे समोर आले त्यातील काही कलाकारांची थोडीशी ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न. नुकतेच पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचे 'स्वरांची स्मरणयात्रा' हे पुस्तक वाचनात आले आणि त्यापासून स्फुर्ती घेऊन आपणही चार शब्द लिहावेत असं वाटून गेलं आणि त्यामुळे हा प्रपंच. तर करू या सुरुवात.
=======================================================================
संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर... संगीत मार्तंड पंडित ओंकारनाथ ठाकुर
एकदा ओंकारनाथजींच गाणं ऐकुन गांधीजी म्हणाले होते की "जे तुमच्या एका गाण्याने होऊ शकते ते माझ्या कित्येक भाषणांमधुन होऊ शकत नाही."
तर कोण होते हे पंडित ओंकारनाथजी ठाकुर. तर मंडळी आज आपण पंडित ओंकारनाथजी ठाकुर यांच्या बद्दल जाणुन घेऊया...
ओंकारनाथजींचा जन्म २४ जुन १८९७ साली भंडारण जिल्ह्यातील जहाज या गावी पं. गौरीशंकर व झवेरबा यांच्या पोटी झालेला. त्यांना दोन भाऊ (बाळकृष्ण व रविशंकर) व एक बहिण (पार्वती) होती. ओंकारनाथजी चौथे व शेवटचे अपत्य. ओंकारनाथजींच बाल आयुष्य अतिशय कष्ट, गरिबी व हालअपेष्टांनी भरलेलं होत.
त्यांचे आजोबा पं. महाशंकर ठाकुर व वडिल पं. गौरीशंकर हे नानासाहेब पेशवे व महाराणी जमनाबाई यांचे पदरी शुर वीर लढवय्ये होते. परंतू, 'अलोनीबाबा' नावाच्या एका योग्याच्या सानिध्यात आल्यानंतर गौरीशंकरांचे जीवनविषयक सार पुर्णपणे बदलले. त्यामूळे त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ 'ओम' अथवा प्रणव साधनेत खर्च करण्यात घालवला. ह्याच सुमारास त्यांच्या चौथ्या मुलाचा जन्म झाल्याने त्यांनी त्याचे नाव 'ओंकारनाथ' ठेवले. जरी गौरीशंकरांनी आपले आयुष्यांत घर उभारणीला मदत केली तरी त्यांचे मन सतत प्रणव साधनेत होतं. त्यामूळे झवेरबांना नेहेमीच प्रतारणा, घृणा व अपमानाला सामोरं जावं लागल. गौरीशंकरांच्या मोठ्या भावाने झवेरबांना खुप त्रास दिला. शेवटी मोठ्या दिराने झवेरबां व ह्या ४ छोट्या लहानग्यांना एक दिवस कठोरपणाने सगळे कपडे व दागदागिने घेऊन घराबाहेर काढले.
पण झवेरबां अतिशय कष्टाळु, मानसिकरित्या भक्कम व संतुलित होत्या. त्यांनी धुणी-भांडी करण्याची चार कामं लगेच धरली. मुलं मोठी होत होती. सगळच विपरित असताना त्यांनी कधी हिंमत सोडली नाही आणि कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. आईचा धीरोदात्त स्वभाव, अतिशय प्रखर स्वाभिमान ह्यांचा ओंकारनाथजींच्या मनावर व व्यक्तिमत्वावर चांगलाच खोल ठसा उमटलेला होता.
ओंकारनाथजींनी मोजक्या कलाकरांसारखंच स्वतःच्या शारीरिक क्षमतेवर पण बरेच लक्ष केंद्रित केलं होतं. आयुष्यातल्या अतिशय कठोर शिस्तीशिवाय ओंकारनाथजी स्वतः रोज भरपूर व्यायाम करायचे. अन्न वाया घालवण्याच्या ते एकदम विरोधात होते. त्यांच्या व्यायाम प्रकारात ते सुर्यनमस्कार, पोहोणे याशिवाय 'गामा' ह्या त्यावेळच्या नावाजलेल्या मल्लाकडुन ते मल्लविद्याही शिकलेले होते. त्यांच्या पन्नाशीनंतरही त्यांनी हा व्यायाम चालू ठेवला होता.
आपल्या आई-वडिलांकडून मिळालेल्या प्रणव साधना, धर्माबद्दल आस्था व संकटाना तोंड देण्याची वॄत्ती ह्या सगळ्या गोष्टी व वडिलांपुढे जाऊन 'नाद-उपासना' किंवा अज्ञाताची संगीतातून केलेली भक्ती हे ओंकारनाथजींमध्ये ओतप्रोत भरलेली होती. जेव्हा गौरीशंकरांनी संन्यास घेतला तेव्हा ओंकारनाथजींची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झालेली. एकीकडे आपली कष्टाळू आई जिच्याबद्दल त्यांना प्रेम व चिंता होती तर दुसरीकडे नर्मदेच्या काठावर संन्यासी वडिल ज्यांच्याबद्दल ओंकारनाथांना अतिव आदर होता.
अशाच तरुण वयात ओंकारनाथांनी स्वयंपाक शिकुन घेतला व एका वकिलाच्या घरी आचारी म्हणून काम करू लागले. असं करणं त्यांना क्रमप्राप्त होतं कारण आईच्या एकटीच्या पगारावर घर चालेना. हे सगळं करताना त्यांची खुप दमछाक होई. एकीकडे नर्मदेच्या काठावर वडिलांची झोपडी साफ करावी, त्यांना पाण्याचे हंडे भरून द्यावेत, त्यांची व्यवस्था लावावी व नंतर ४-५ मैल पळत जाऊन कामाला लागावं व स्वयंपाक करावा. मंडळी, आज हे सगळं लिहीताना हात थरथर कापताहेत आणि डोळ्यांत आसवांनी घर केलय. ज्यांनी हे भोगलय त्यांनाच ते कळणार.
हे सगळं करत असताना ओंकारनाथजींनी एका मिलमधे मील कामगार म्हणूनही काम केलं. तेथेही मिल मालक ह्या छान दिसण्यार्‍या, कष्टाळू व हुशार मुलाकडे इतका आकॄष्ट झाला की त्याला वाटलं की ह्या मुलाला आपण दत्तक घ्यावं. परंतु ओंकारनाथजींच्या वडिलांनी हे साफ धुडकावून लावलं व म्हणाले की 'माझ्या मुलाला साक्षात सरस्वतीचा आशिर्वाद आहे. तिच्या जोरावर तो पैसा, प्रसिद्धी मिळवेल. पण कोणा श्रीमंताच्या घराचा दत्तक मुलगा म्हणुन नाही'.
ओंकारनाथजी नेहेमी सांगायचे की त्यांच्या वडिलांकडे बर्‍याच गुढ विद्या होत्या. त्या आधारे त्यांनी आपला मृत्यू बराच आधी सांगितला होता. १९१० साली आपल्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या लाड्क्या मुलाला ओंकारनाथजींना जवळ बोलावून त्यांच्या जीभेवर अतिशय दुर्मिळ व अमुल्य मंत्र लिहीलेला होता.
याच्या बरीच वर्ष असलेलं ओंकारनाथजींच संगीत प्रेम उफळुन आलेलं होतं. अश्याच वेळी एक दानशूर व्यक्ती शेठ शहापुरजी डूंगाजी मंचेरजी त्यांच्यासाठी देवदुतासारखे ऊभे राहिले. शेठजींनी ओंकारनाथजींना मुंबईच्या पंडित विष्णु दिगंबर पलुस्करांच्या संगीत महाविद्यालयात प्रवेश मिळवुन दिला. हा क्षण ओंकारनाथजींच्या आयुष्यातला सोनेरी क्षणच म्हणावा लागेल. ह्याच वेळेस ओंकारनाथजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पंडितजींच्या प्रेमळ मार्गदर्शन व तालीम ह्यांनी ओंकारनाथजींच एका उत्कृष्ट संगीतकारात रूपांतर झालं.
त्या ६ वर्षांच्या काळात ओंकारनाथजींनी एका अस्सल एकनिष्ठ शिष्याप्रमाणे गुरुची सेवा करून गुरुकडुन सगळी संगीत विद्या मिळविली. पलुस्करांची त्यांच्यावर इतकी मर्जी बसली की जेव्हा पलुस्करांनी लाहोरमधे गांधर्व महाविद्यालय चालु केलं तेव्हा ओंकारनाथजींना त्यांनी मुख्याध्यापक केलं. तेव्हा ओंकारनाथजींच वय अवघ २० वर्ष होतं. त्यावेळेस ओंकारनाथजींचा दिवस काहीसा असा असायचा, ६ तास झोप, १८ तास विद्यालयात स्वतःचा रियाझ व विद्यार्थांना शिक्षण. ते अतिशय शिस्तबद्ध व सात्त्विक आयुष्य जगले. १९१७ साली जेव्हा बडोद्याला संगीत परीक्षक म्हणुन पाठवले गेले तेव्हा बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व दिवाण मोनुभाईंवर त्यांची चांगलीच छाप पडलेली होती. त्याच साली त्यांना अतिशय प्रसिद्ध जालंधरच्या श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाण्याचं आमंत्रणही मिळालेलं. त्याकाळी श्री हरिवल्लभ मेळ्यामध्ये गाणं गायला मिळणं ही एक अतिशय पर्वणी असे. अनेक मोठे मोठे कलाकार तिथे आपली कला सादर करीत. असं म्हटल जातं की त्यावर्षी तरूण ओंकारनाथजी व वयोवृद्ध भास्करबुवा बखले यांनी अशी काय मैफल सजवली की लोकांनी दागदागिने व धनसंपत्तीची खैरात दोघांवर केली.
ह्या सगळ्या गोष्टींमधे जवळजवळ २५ वर्षे (१९२६-१९५१) ओंकारनाथजींनी श्रीरामाचे 'रामचरित मानस' चे वाचन, मनन व अभ्यास रोज नियमित चालू ठेवला होता. त्याचबरोबर व्यायाम व आपल्या गुरुप्रमाणे रामधुन व रामनाम संकिर्तन चालू ठेवलं होतं.
पुढे....भाग -२ पहा

 

गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...(१८४९-१९२६) मंडळी, आज मी तुम्हाला अश्या एका संघर्षरत, दिव्य व अस्सल 'खरा सोना' ज्याला म्हणतात अश्या थोर आचार्यांची ओळख करुन देत आहे. मंडळी, माझी फक्त एकच विनंती की या महात्म्याला लाख लाख दुवे व नमस्कार मनातून तरी करा ज्यानं आपल्या मराठी लोकांना एक शान दिली. तर सुरु करु या...भाग -१ वरुन
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर..पुढे....एकदा पंगतीत बुवांनी एक श्लोक म्हटला नी त्याच पंगतीत बसलेले ग्वाल्हेरचे जयाजीराव महाराज बुवांच्या आवाजाने एकदम प्रभावित झाले. (मंडळी, पंगतीत श्लोक म्हणण्याची मजा ज्यांनी घेतली असेल त्यांनाच ते कळणार. आजकालच्या टेबल-खुर्ची जेवणात त्याचा अंशही नाही.) त्यांनी चौकशी केल्यावर जेव्हा गाणं शिकण्याकरता ह्या मुलानं घरदार सोडलं आहे तेव्हा त्यांना बुवांच खुप कौतुक वाटलं. त्यांनी बुवांना बोलावून विचारलं की तुझी सोय दरबार गायक हद्दु खाँ यांच्याकडे करु का? तेव्हा बुवा नम्रतेने म्हणाले
"जोशीबुवांकडची सर्व विद्या मला आली की मी जरुर हद्दु खाँकडे गाणं शिकेन". ह्याला म्हणतात गुरुनिष्ठा. नाहीतर आजकाल जरा संधी मिळतीय म्हटल्यावर काही येईना का जो तो धावतो. पण त्याआधीच दुर्दैवाने हद्दु खाँसाहेब गेले.
ग्वाल्हेरचं शिक्षण पुर्ण झाल्यावर बुवा मुंबईला आले. तेव्हा एके ठिकाणी महंमदखाँचं गाणं होतं. महंमदखाँ हे प्रसिद्ध उस्ताद ख्यालगायक रहमतखाँ ह्यांचे मोठे बंधु. महंमदखाँ व रहमतखाँ हे हस्सु खाँचे चिरंजीव तर हद्दु खाँसाहेब यांचे पुतणे. हस्सु खाँसाहेब व हद्दु खाँसाहेब हे बंधु होत. तर मंडळी, या महंमदखाँची बैठक होतं मुंबईला. तेव्हा गाण्याला रंग चढावा म्हणुन त्यांना लोकांनी भरपुर दारु पाजली. परीणामी महंमदखाँना गाणं जमेना. तेव्हा त्याच जलशात महंमदखाँच्या परवानगीने बाळकृष्णबुवांनी तानांचा अक्षरक्षः पाऊस पाडला. त्यांच गाणं ऐकुन खुद्द महंमदखाँसुद्धा चकित झाले. दुसर्‍याच दिवशी त्यांनी बुवांना बोलावुन घेतलं. त्यांच्याशी बोलल्यानंतर खाँसाहेबांनी वासुदेवबुवांना पत्र लिहीलं व परवानगी मागितली कशाला तर बाळकृष्णबुवांना शिष्य म्हणुन ठेऊन घेण्याची. वासुदेवबुवांनी आनंदाने परवानगी दिली. दैव पहा कसं असतं ज्या बाळकृष्णबुवांना एकेकाळी कोणी गुरु ठेऊन घेत नव्हता त्याच बुवांना आता एक एक बडे बडे गुरु, शिष्य म्हणुन मागत होते.
त्याकाळी बुवांचा दिनक्रम साधारण असा असायचा, पहाटे साधारण ४.०० - ४.३० वाजता बुवा खाँसाहेबांच्या घरी पोहोचत व तंबोरा जुळवून छेडण्यास सुरुवात करत. नंतर खाँसाहेब येऊन बसत. नंतर हे गुरु शिष्य सर्वसाधारण ११ तास रियाझ करत. महंमदखाँ नंतर बाळकृष्णबुवांनी वासुदेवबुवांबरोबर बरेच दौरे केले. कलकत्ता व नेपाळचा दौरा विशेष ठरला. नेपाळ नरेशांनी बाळकृष्णबुवांना दरबार गायक म्हणुन नोकरीही देऊ केली होती. पण बुवांनी ती नम्रपणे नाकारली. नेपाळहुन परतल्यावर वासुदेवबुवा अतिसाराने अंथरुणाला खिळले. बाळकृष्णबुवांनी त्यांची अखेरपर्यंत खुप सेवा केली. शेवटी जाताना वासुदेवबुवांनी बाळकृष्णबुवांना आर्शिवाद दिला दिला की "आजवर कोणालाही दिला असा आर्शिवाद मी तुला देणार आहे. तुझ्या गाण्याचा कधीही बेरंग होणार नाही". मंडळी हे लिहीताना हर्षवायुनं एकीकडे मन उचंबळुनही आलयं आणि डोळ्यात पाणीही. कारण बुवांना या क्षणी आपल्या आयुष्याचं सार्थक असणार नक्की. यानंतर वासुदेवबुवा गेले.
नंतर मुंबईहुन बाळकृष्णबुवा हवामान मानवेना म्हणुन मिरजेला आले व स्थायिक झाले. मिरजकर महाराजांच्या दरबारी ते दरबार गायक म्हणुन राहिले.
रहमतखाँ, अल्लादियांखाँसाहेब, अब्दुल करीम खाँसाहेब(आपल्या अण्णांचे गुरु सवाई गंधर्व यांचे गुरु), भास्करबुवा बखले, वझेबुवा या सगळ्यांनी बाळकृष्णबुवांचा अतिशय आदर केला आहे. दरबारात जेव्हा बाळकृष्णबुवा येत तेव्हा संपुर्ण दरबार उठुन उभा रहात. म्हणुन बाळकृष्णबुवा हे गायनातील भीष्माचार्य समजले जातात.
बाळकृष्णबुवांमुळे ही संगीताची गंगा महाराष्ट्रात आली. नाहीतर कशी आली असती? त्यांच्यामुळे विष्णु दिगंबर पलुस्कर घडले. त्यांच्याचमुळे गुंडुबुवा, अनंत मनोहर जोशी(औंध), निळकंठबुवा जंगम, वामनबुवा चाफेकर, मिराशीबुवा व त्यांचा स्वतः मुलगा अण्णाबुवा इचलकरंजीकर घडले. हे सगळे शिष्य एका फौजेसारखे होते.
मंडळी, गुरुंचे शाप, नि:र्भ्यस्तना, आर्शिवाद, प्रेम ह्या सगळ्यांतुन तेजाकडे नेणार्‍या या तेजपूंज स्वराला शतशः प्रणाम !!!
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार.
विशेष सुचना : मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व.

हा लेख इथेही पाहु शकता...

गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...भाग-१

गायनाचार्य/भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर...(१८४९-१९२६) मंडळी, आज मी तुम्हाला अश्या एका संघर्षरत, दिव्य व अस्सल 'खरा सोना' ज्याला म्हणतात अश्या थोर आचार्यांची ओळख करुन देत आहे. मंडळी, माझी फक्त एकच विनंती की या महात्म्याला लाख लाख दुवे व नमस्कार मनातून तरी करा ज्यानं आपल्या मराठी लोकांना एक शान दिली. तर सुरु करु या...
बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरअमरावतीजवळ चंदूर गाव आहे. तेथील रामभट व त्यांची पत्नी यांचा मुलगा बाळकृष्ण. स्वतः रामभट हे गवई व भिक्षूक होते. त्यांनी स्वतः सातार्‍याच्या बाळाजीबूवांकडे तालीम घेतली होती. त्यामुळे त्यांना असं वाटे की बाळकृष्णबुवांनी गवई व्हावं. पण आईला वाटे की बाळकृष्णबुवांनी भिक्षूकी करावी. पण स्वतः बाळकृष्णबुवांना लहानपणापासुन वडिलांच गाणं खुप आवडे व वाटे की आपणही गवई व्हावं. शेवटी बुवा घरातुन पळाले. ते पळाले ते सरळ म्हैसाळच्या हरीदास म्हणजे विष्णुबुवा जोगळेकरांपाशी आले. विष्णुबुवांनी त्यांना आश्रय दिला. विष्णुबुवांनी बाळकृष्णबुवांच्याकडुन किर्तनात पदं म्हणता येतील इतकी तयारी करुन घेतली व परत जत संस्थानात वडिलांकडे आणुन सोडलं. त्यानंतर बुवांना स्वत: वडिलांनी गाणं शिकवायला सुरुवात केली. पण बुवांच्या वडिलांच अचानक निधन झालं. परत बुवांच्या संगीत आराधनेत खंड पडला. मग जतच्या अधिपतींनी खुद्द अलिदातखाँना बुवांना गाणं शिकवायला सांगितलं व पोटगीही दिली. पण अलिदातखाँनी त्यांना एक अवाक्षरही शिकवलं नाही. मग बुवा भाऊबुवा कागडकरांकडे गेले. थोडे दिवस गुरुसेवा केली पण कागडकरबुवांना चिलीम पिण्याची सवय व ते बाळकृष्णबुवांच्या खांद्यावर दिलेलं. एक दिवस चिलीम भरुन द्यायला उशिर झाला म्हणुन कागडकरबुवांनी "ह्याला गाणं येण्यासारखं नाही, म्हणुन मी गाणं शिकवणार नाही" अशी बुवांची बोळवण केली. तेव्हा बाळकृष्णबुवांनी झालेल्या अपमानाच्या रागाच्या भरात सांगितलं "गाणं येईल त्याच दिवशी तोंड दाखवीन". असाच पण जरा जास्तच भयानक अनुभव बुवांना आला. त्याकाळी रावजीबुवा गोगटे म्हणुन अजुन एक गवई फार प्रसिद्ध होते. बुवांना त्यांच घर म्हणजे संगीताची पंढरी वाटे. बरीच मुलं त्यांच्याकडे शिकत. त्यांच्याकडे बाबुराव सनई चौघडा वाजवत तर नारायणबुवा हे थोर किर्तनकार येत. शिवाय केशवबुवा व बच्चाका हेही होते. या सगळ्या मुलांच्या बरोबर बुवाही गाणं शिकायचे. पण रावजीबुवांना बहुतेक ते पसंत पडलं नसावं. एकदा रावजीबुवांनी बुवांचा उपहास केला, म्हणाले "श्राद्धान्न झोडणार्‍या भटांची पोरे जर गवई होऊ लागली तर गाढवांनाही गंधर्व समजुन मान्यवरांच्या पंगतीत बसवावे लागेल". झालं, बुवांना हे फार लागले आणि संगीत अध्ययन थांबले. नंतर धारच्या देवजीबुवांकडे अध्ययन चालु होतं. पण गुरुपत्नीला ते आवडत नसे. एकदा गुरुमाता अंगावर पेटता काकडा धावली व घराबाहेर काढलं आणि बुवांच संगीत अध्ययन थांबले.
शेवटी बुवा फिरत फिरत मोंगीर गावापाशी असलेल्या विक्रमचंडी देवळात आले. इथे देवळात बुवांनी तपाला सुरुवात केली. बुवा चार आठवडे फक्त बेलाची फळे व पाने खाऊन राहिले. ह्या उद्देशाने की आता देवालाच दया येईल व मला तोच मार्ग दाखवील. शेवटी देवीला दया आलीच. फिरत फिरत बुवा ग्वाल्हेरला आले आणि बुवांची भेट प्रसिद्ध गवई वासुदेवबुवांशी झाली. वासुदेवबुवा हे खुद्द हद्दु - हस्सु खाँ चे शिष्य. वासुदेवबुवांनी आपल्या बुवांना विचारलं की आधी कुठं गाणं शिकलायस का? तेव्हा देवजीबुवांच नाव ऐकुन म्हणाले, "तु देवजीबुवांचा शिष्य ना, मग मी नाही शिकवणार". तेव्हा का कोण जाणे बुवांना अंतप्रेरणा झाली आणि त्यांनी वासुदेवबुवांना म्हटले "बुवा तुम्हीच मला शिकवाल" !!!
बुवाचे शब्द अक्षरक्षः खरे ठरले. ग्वाल्हेरहुन निघुन बुवा फिरत फिरत काशीला आले. तेथे परत बुवांची भेट वासुदेवबुवांशी पडली. ही भेट म्हणजे बाळकृष्णबुवांचा सोनेरी क्षण होता. ह्या वेळेला वासुदेवबुवा म्हणाले, "मागं झालं ते झालं. आता मी तुला गाणं शिकवणार". बाळकृष्णबुवांनी गुरुसेवाला लगेच प्रारंभ म्हणुन तानपुरा जुळवला आणि "श्रीरामा लवकर तारी" या पदानं गुरुसमोर मागणं मागितलं. वासुदेवबुवा आपल्या शिष्यावर खुष झाले. सतत वीस दिवस बाळकृष्णबुवांनी वासुदेवबुवांची मनोभावे सेवा करुन गुरुला बेहद्द खुष केलेच पण आता वासुदेवबुवांचा त्यांच्यावर जीव जडला. त्यांनी एकच अट घातली ती म्हणजे ख्याल गायकीकरता आवाजाला विशिष्ट वळण यावं लागतं तेव्हा आपल्या बुवांनी टप्पे गायचे नाहीत. येथील वाचकाकरता, टप्पा गायकी ही पंजाबी ढंगाची गायकी आहे हे सांगावेसे वाटते. शेवटी बुवा व वासुदेवबुवा ग्वाल्हेरला जायला निघाले पण दोघांच्या भाड्याएवढे पैसे नव्हते. तेव्हा बुवांना मागे ठेऊन वासुदेवबुवा पुढे गेले. शेवटी कसे तरी करुन मजलदरमजल करीत बुवा ग्वाल्हेरला पोहोचले व बुवांच्या आयुष्याला एक वळण लागलं.
पुढे पहा..भाग -२
=======================================================================
तळटिप : हिंदुस्तानी संगीतामधल्या कलाकारांची एक आठवण म्हणुन हा एक प्रयत्न. काही त्रुटी राहील्यास नक्की सांगा. आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडेल.
छायाचित्र : जालावरून साभार.
विशेष सुचना : मला बाळकृष्णबुवांच्या चिजा कुठेच मिळत नाहियेत. खुप प्रयत्न केला. त्यामुळे ह्या सदरात त्यांच्या चिजांची सुची देऊ शकत नाहीये त्या बद्द्ल क्षमस्व.
किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...
सप्रेम नमस्कार मंडळी..
आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात..
किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला. त्यामुळं ह्या घराण्याला नावं 'किराणा घराणं' असं पडलं. हे कधी झालं याची काही माहीती मिळत नाही. त्यानं पुढे जाऊन 'इस्लाम' धर्माचा स्विकार केला होता असं मानलं जातं.
गोपाल नायकांपासुन किराण्याच्या ४ उपशाखा निघाल्या त्या अशा..
                                                                                                              गोपाल नायक
                                                                                                                      |
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
|                                                                           |                                                            |                                                   |
१.                                                                          २.                                                         ३.                                                ४.             
१.१ उस्ताद अजीम खाँ                    २.१ उस्ताद बंदे अली  खाँ                           ३.१ उस्ताद गफुर खाँ                         ४.१ मेहेबूब बक्ष
१.२ मौला बक्ष                                 २.२  उस्ताद नन्हे खाँ                                  ३.२ उस्ताद वाहीद खाँ                       ४.२ रेहमान खाँ
१.३ अब्दुल घानी खाँ                       २.३ उस्ताद काले खाँ                                  ३.३ शकुर खाँ                                    ४.३ अब्दुल माजीद खाँ
                                                        २.४ उस्ताद अब्दुल करीम खाँ                   ३.४ मशकूर अली                             ४.४ अब्दुल हमीद खाँ
                                                                                                                           ३.५ मुबारक अली                             ४.५ अब्दुल बशीर खाँ
                                                                                                                                                                                             ४.५.१ नीयाज़ अहमद खाँ
                                                                                                                                                                                             ४.५.२ फैयाज़ अहमद खाँ
एक आपले लोकप्रिय उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब सोडले तर बाकीच्या शाखा एक तर काळाच्या ओघात नाहीश्या झाल्या किंवा विविध कारणांमूळे पुढे येऊ शकल्या नाहीत.
आता बघुयात उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचा शिष्य परीवार..
१. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व,
२. रोशनाआरा बेगम़,
३. बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी,
४. बेहेरेबुवा,
५. उस्ताद अब्दुल रेहमान उर्फ सुरेशबाबु माने, (खाँसाहेबांचे मोठे चिरंजीव),
६. हिराबाई बडोदेकर, (खाँसाहेबांची मोठी मुलगी)
बघा, वर एकसे एक नावं. एका नाव झाकावं आणि दुसरं उघडावं अशी एक एक नावं आणि अशी त्यांची कारकिर्द..
आता सवाई गंधर्वांचे शिष्यगण बघुयात,...
१. गानतपस्विनी गंगुबाई हनगल,
२. पं. भीमसेन जोशी (अण्णा),
३. पं. फिरोज़ दस्तुर,
४. डॉ. प्रभा अत्रे,
५. पं. संगमेश्वर गुरव,
पं. संगमेश्वर गुरव यांच गाणं ऐकण्याचा योग कधी आला नाही पण आपण सगळेच जण बाकीच्या वरील मोठ्या लोकांचे गाणं भरभरुन ऐकत आहोत. वरील ह्या मोठ्या गुरुंच्या शिष्यांपैकी खालील शिष्य जे किराण्याची पताका धरुन आहेत किंवा होते असे,
१. कै. कृष्णा हनगल (गंगुबाई हनगल यांची मुलगी),
२. श्रीकांत देशपांडे,
३. माधव गुडी,
४. नारायणराव पटवर्धन,
५. मिलींद चित्तल,
ह्या सगळ्यांनी आपापली गायकी सिद्ध केलेली आहेच.  ह्या सगळ्यांना ही लक्षवेधक लोकप्रियता मिळाली कारण किराण्याची एका विशिष्ठ पद्धतीने विकसित होत जाणारी ख्याल व आलापीची पद्धत. आणि त्यातून विकसित होत जाणारा प्रत्येक स्वर.
उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांनी घराणेदार पेशकश करताना त्यात निरनिराळ्या दक्षिण भारतीय पद्धतीच्या सरगमांचा अलंकारी प्रयोग केला होता. खाँ साहेबांनी अजुन एक नोंद घ्यावी असा छान केलेला प्रयोग म्हणजे किराणा घराण्याच्या भरदार गायकीत भावपुर्ण, आर्त, सुंदर अशा प्रणयप्रिय चिंजाचा अंतर्भाव. मंडळी, खाँ साहेबांचा स्वःताचा आवाज अतिशय नादमय आणि नाजूक होता त्यामूळे त्या चिजा अजुनच खुलत असत. खाँ साहेब स्वःत अतिशय जागरुक असत आपला आवाज जपण्यासाठी बरंका.
किराण्याची गोष्ट चालू असताना पं. भीमसेन (अण्णा) यांच्या शिवाय हा लेख पुर्ण होऊच शकत नाही, इतकं त्यांच कार्य मोठं आहे. अण्णांच्या गायकीनं किराणा घराणं चांगल्या पद्धतीने बदलाला सामोरं गेलं. आजच्या काळात ते किराण्याचे मुख्य आधारस्तंभ आहेत तर बाकीचे बिनीचे शिलेदार.
अहोरात्र केलेला रियाझ, अखंड असलेली गुरुभक्ती, प्रचंड विचार व विद्वत्ता ह्या आणि अश्या असंख्य कारणांनी किराणा घराणं कायम लोकप्रिय राहिलेलं आहे आणि तसच राहु दे अशी प्रार्थना करुन इथेच थांबतो.

हा लेख इथेही पाहु शकता...